Friday, April 29, 2022
वसुबारस २०२१
सच्च्या शिवसैनिकाचं भांडण असं, चाले त्याच्याच मनात
भार व्हा (गारवा विडंबन)
Monday, September 20, 2021
Resilience
Resilience हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो. Flexibility, Plasticity, Elasticity असे त्याचे बरेच अर्थ सांगितले जातात. मराठीत लवचिकता वगैरे याचे अर्थ होतात. पण या पर्यायी शब्दांतून Resilience चा नेमका अर्थ लागत नाही. मला या शब्दाची लागलेली व्याख्या म्हणजे "एखाद्याची कितीही प्रतिकूल परिस्थितीतून पुन्हा सामान्य होण्याची जी असामान्य क्षमता असते" तिला Resilience म्हणतात.
डेव्हिड ऍटनबरो आजोबांच्या एका डॉक्युमेंट्रीमध्ये हा शब्द आला.. आणि साक्षात्कारासारखा कळाला, त्याची ही गोष्ट!
२६ एप्रिल १९८६ ला चेर्नोबिल येथे जगातील सर्वात विनाशकारी अणुऊर्जा अपघात झाला. चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्राच्या ४ क्रमांकाच्या अणुभट्टीमधील एका चाचणीदरम्यान भयानक स्फोट झाला आणि अण्विक गळती सुरू झाली. आजूबाजूच्या मोठ्या भागामध्ये हे प्रदूषण पसरलं. ही गळती थांबवण्याच्या व त्यामुळे लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये ५६ कर्मचारी व कामगारांचा मृत्यू झाला. याशिवाय किरणोत्सर्गाच्या संसर्गातून झालेल्या कर्करोगामुळे चार हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले असावेत.
यानंतर हा पूर्ण परिसर कायमचा प्रदुषित घोषित केला गेला. एकूण साडेतीन लाख नागरिकांचे स्थलांतर केलं गेलं. या सगळ्या घटनेमुळे सुमारे ६८ अब्ज डॉलरचा खर्च झाला. या दुर्घटनेनंतर काही तासांतच तिथून आणि आजूबाजूच्या परिसरातून कर्मचारी, नागरिक यांना सुरक्षित जागेवर हलवलं. स्फोट आणि त्यानंतरचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात रशिया, युक्रेन आणि बेलारूस या देशांमध्ये पसरले. त्याहून कमी प्रमाणात प्रदूषण हे अन्य १० देशांमध्येही पसरले. एकूण १ लाख ९१ हजार वर्ग किलोमीटर्स एवढ्या भागात हे प्रदूषण पसरलं. यातील १० हजार वर्ग किलोमीटर्स एवढा भाग हा मानवी वस्तीसाठी अयोग्य ठरवला गेला. पुढील चार वर्षात या भागात जे प्राणी जन्मले त्यांच्यात जन्मतःच अनेक व्यंगे होती आणि ते लगेच मृत्यू पावले. या सर्व घटनेमुळे या मोठ्या भागातून माणूस नावाचा प्राणी दूर गेला आणि मग निसर्गाने आपलं काम सुरू केलं... Resilience!!!
या प्रदूषित जागेपैकी १० वर्ग किलोमीटर्स जागा पूर्ण जळाली होती. तेथील मोठमोठाले वृक्ष जळून सर्व भागातील जंगल संपलं होतं. त्यामुळे या जागेला रेड फॉरेस्ट असं नाव पडलं. पहिल्या २-४ वर्षांनंतर या भागातील जैवविविधता कित्येक पटींनी वाढली. १९८६ नंतर पहिल्यांदा १९९६ मध्ये BBCने इथे एक डॉक्युमेंट्री (Inside Chernobyl's Sarcophagus) तयार केली. त्यात अणुभट्टीतून लहान मोठे पक्षी आत बाहेर जाताना दिसले. तरीही हा भाग मानवी वस्तीसाठी योग्य नव्हताच. त्यामुळे माणूस या भागापासून दूरच राहिला आणि निसर्गने आपलं काम सोडलं नाही.
२०१६ला म्हणजे या अपघातानंतर ३० वर्षांनी मरीना शक्विरिया नावाची अभ्यासक आपल्या टीमसह या भागात गेली. तिथे निसर्गाने केलेल्या किमयेने आश्चर्यचकित झाली. इतक्या भयंकर अपघाताचे ठिकाण हे कित्येक वन्यजीवांच्या हक्काचे आश्रयस्थान बनले होते. हरणं, अस्वलं, बीव्हर, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे, घोडे, गाढवं... असे कित्येक प्राणी तिथे आहेत. तिथे त्यांची पूर्ण परिसंस्था निर्माण झाली आहे. त्यात मानवाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याने ती बहरत गेली. या भागात कॅमेरा ट्रॅप्स बसवले आहेत. त्यात दिसणारी या सर्व प्राण्यांची संख्या वन्यजीव अभ्यासकांना अक्षरशः थक्क करून सोडते. येथील किरणोत्सारी पाण्यात हंस सहज विहार करत असलेले दिसतात. येथील किरणोत्सर्गाचा वन्यजीवांच्या संख्येवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. उलट माणूस नसण्याचा मात्र अत्यंत अनुकूल परिणाम झाला आहे. Przewalski नावाची घोड्यांची एक लुप्त होत चाललेली प्रजाती आहे. या भागात ही प्रजाती व्यवस्थित वाढत आहे. अन्य कुठेही न दिसणारी यांची उपप्रजाती केवळ याच भागात बघायला मिळते. अशीच एक बीव्हरचीही प्रजाती इथे आनंदाने बहरत आहे. येथील बीव्हरचे महत्व हे आफ्रिकेतील हत्तींच्याएवढेच आहे. येथील प्राण्याच्या आणि वनस्पतींच्या सहचर्याने जमीनही बदलत आहे. मोठमोठाली झाडं जेव्हा पडतात तेव्हा त्यांचं होणारं विघटन हे जमिनीला अधिक सुपीक करत आहे. अभ्यासकांच्या मते १०० वर्षांपूर्वी येथील जल-जमीन-जंगल जसं होतं, तसंच ते काही वर्षात पुन्हा होईल. युक्रेन आणि बेलारुसमधील १६०० वर्ग किलोमीटर्स परिसर हा आता अभयारण्य बनला आहे. गम्मत म्हणजे युरोपातील ते सर्वात मोठे अभयारण्य आहे.
हेच ते Resilient असणं... "कितीही प्रतिकूल परिस्थितीतून पुन्हा सामान्य होण्याची जी असामान्य क्षमता"
हे सर्व बघता मानवी वावर हा आण्विक प्रदूषण / किरणोत्सर्जन यापेक्षा निसर्गाला अधिक घातक आहे. कधीतरी माणूसही यातून शिकेल, नाहीच शिकला तर निसर्ग समर्थ आहे. तो नक्कीच धडा शिकवेल. एखादा मोठा धक्का बसण्याआधी माणसाने जागं होऊन निसर्गात लुडबूड कमी करावी, हेच यातून शिकावे...
संदर्भ:
https://en.wikipedia.org/wiki/Chernobyl_disaster
https://www.nationalgeographic.com/.../060418-chernobyl...
https://en.wikipedia.org/wiki/Red_Forest
Few other documentaries
Monday, August 30, 2021
बिनाखर्चाचे खेळ
मी लहान असताना, म्हणजे माझ्या दुसरीपर्यंत, फुलंब्रीला राहत होतो. माझे पट्टमित्र म्हणजे स्वाती पुराणिक आणि प्रदीप निंबाळकर. मी आणि स्वाती, भराडकरांच्या वाड्यात राहायचो. प्रदीपचा वेगळा वाडा होता. आमची कुटुंबमैत्री असलेलं आणखी एक कुटुंब म्हणजे गोलटगावकर. प्रदीपच्या वाड्याच्या समोरून उजवीकडे वळालो की फर्लांगभर अंतरावर ते राहायचे. त्यांची मुलं केदार आणि योगिता. केदार माझ्यापेक्षा मोठा आणि योगिता छोटी. आमचा खेळ काय तर भराडकर वाड्यावरून निघायचं. मध्येच एखादी काडी शोधायची. प्रदीपला हाक मारायची. तिथून ते गोलटगावकरांच्या घरापर्यंत जेवढं म्हणून गाजरगवत दिसेल ते झोडपून काढायचं. एकूण अंतर फार तर १० मिनिटं. पण आम्ही किमान अर्धा पाऊण तास बाजीप्रभू आणि तानाजी आणि मुरारबाजी आणि काय काय होऊन गनिमांना झोडपत गोलटगावकरांच्या घरी पोहोचायचो.
केदार आणि प्रदीप, मी आणि स्वातीपेक्षा शूर होते. ते भिंगोटे पकडायचे. त्याला हलका दोरा बांधायचे. मग भिंगोटे सोडून, दोऱ्याचं दुसरं टोक पकडून त्या भिंगोट्यामागे पाळायचे. मी आणि स्वाती त्या दोघांच्या मागे.
कधीतरी दोन तीन कुटुंबांची एकत्र सहल म्हैसमाळला जायची. तिथे आम्ही सगळे पोरं कधी करवंदाच्या जाळीत करवंद शोधायचो, कधी वाहता ओढा असेल तर त्या पाण्याच्या गिरक्या बघत बसायचो. देवीच्या मंदिराच्या मागे आंब्याचं मोठं झाड होतं, त्यावर चढायचो. मंदिरापासून ते वरच्या गेस्टहाऊस पर्यंत पळत जायचो आणि परत यायचो. यात स्पर्धा नसायची, उगाच पळत जायचं आणि यायचं. आमचा दिवस दिवस हे खेळ खेळण्यात जायचा.
उन्हाळ्यात २ चिंचोके घ्यायचे, ते उभे फोडायचे. मग एक पाट घ्यायचा. उलटा करून त्यावर खडूने चंफुलचे चौकोन करायचे. मग चार आकारांचे दगड किंवा काहीही घ्यायचं आणि खेळ सुरू. आख्खी दुपार या चंफुलमध्ये सहज जायची. तेवढ्या वेळात कधी पापडाच्या लाट्या तयार व्हायच्या, कधी लोणच्याचा खार तर कधी कुरडायांचा चीक व्हायचा. मग तोच खाऊ आम्हाला मिळायचा.
नंतर आम्ही संभाजीनगरला राहायला आलो. तिथे सिडकोत एन ९ - एल ५१ मध्ये राहत होतो. ५१ क्रमांकाचं घर रांगेत पाहिलं. याच्या पलीकडे एक झरा होता. तेव्हा पावसाळ्यात वाहायचा. त्यात डिंभक, लहान मासे सुळूसुळू पोहायचे. आम्ही ओंजळीत माश्यांसह पाणी घ्यायचो आणि परत सोडून द्यायचो. कधीतरी चतुरांचा मोठा थवा यायचा. त्याच्याकडे बघत बसायचो. पाण्यावर तरंगणारे कीटक असतात. ते या झऱ्याच्या डोहात (घरापासून थोडं पुढे, बळीराम पाटील शाळेकडे जाताना हा डोह होता) असायचे. त्यांच्या हालचाली, त्यामुळे पाण्यावर उठणारे तरंग आम्ही बघत असू. ते कसे तरंगतात याचं फार फार अप्रूप वाटे.
हे आणि असे कितीतरी बिनाखर्चाचे खेळ आम्ही खेळत असू. आज याची आठवण झाली कारण मी आणि अमोहा घरातून खाली सोसायटीत गेलो. साधारण १०-१५ मिनिटं शोधल्यावर आम्हाला २-३ छान पीसं सापडले. त्यातलं एक खेळायला उत्तम होतं. ते घेऊन पुढे एक तास आम्ही खेळत होतो. मज्जा आली👨👧
कर्ण
हॅरी - आपण आत्ता कुठे आहोत?
प्रोफ. डम्बलडोर - तुला काय वाटतंय?
हॅरी - मला वाटतंय की आपण किंग्स क्रॉस स्टेशनवर आहोत. फक्त इथे गर्दी नाहीये, स्वच्छता जास्त आहे...
प्रोफ. डम्बलडोर - अच्छा...
हॅरी - आता मला परत जावे लागेल ना?
प्रोफ. डम्बलडोर - ते तुझ्या निवडीवर अवलंबून आहे.
हॅरी - म्हणजे मला ठरवता येईल?
प्रोफ. डम्बलडोर - मी तुला खूप आधी सांगितलं होतं की तू किंवा कुणीही जे काही आहात ते निवडीवर अवलंबून आहे. कुणाचीही निवड ही क्षमतेहून अधिक महत्वाची असते. यासाठी तुला एक गोष्ट सांगतो.
तुला महाभारत माहित आहे. तुझ्या अभ्यासक्रमात होतं... त्यात एक पात्र होतं - कर्ण! तो कुंतीचा पुत्र होता. विवाहाच्या आधी झालेला होता. त्यामुळे कुंतीने त्याला त्यागले होते. त्याला वाढवले एका सारथी कुटुंबाने. राधेने त्याचा स्वतःचा मुलगा असल्याप्रमाणे सांभाळ केला. त्याची दुर्योधनाशी मैत्री झाली. जेव्हा तू, रॉन आणि हर्मायनी यांच्यातील कुणी चूक करत असेल तर अन्य दोघे, किमान एकजण ते थांबवण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर ना? यालाच निवड म्हणतात. मैत्री अशीच असली पाहिजे. पण कर्णाने कधीही दुर्योधनाला वाईट वागण्यापासून थांबवले नाही. दुर्योधनाने जेव्हा भीमाला विष दिले, तेव्हा तर कर्ण आणि अर्जुन यांच्यातील तीव्र स्पर्धा सुरू व्हायची होती. भीमावर केलेल्या विषप्रयोगाला त्याने थांबवले नाही. पांडवांना जाळून मारावे म्हणून लाक्षागृहात पाठवले, चुकीच्या पद्धतीने द्यूत खेळले, द्रौपदीची विटंबना केली, विराट राजाच्या लहानश्या राज्यावर आक्रमण केलं, पांडवांकडून पाच गावांचा प्रस्ताव कृष्णाने आणला तोही नाकारला. युद्धात अभिमन्यूला अनेकांनी मारलं. तो निःशस्त्र झाला होता तरीही कर्णाने युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तोच कर्ण, जेव्हा अर्जुन त्याला निःशस्त्र असताना मारत होता तेव्हा नियमांची ग्वाही देत होता. जेव्हा मैत्री करता तेव्हा ती निभावता आली पाहिजे. निभावणे म्हणजे प्रत्येक बाबतीत सोबत असणे नव्हे, तर मित्राला योग्य मार्गावर ठेवणे म्हणजे मैत्री. हीच ती निवड.
हॅरी - बरोबर. पण किमान तो मैत्री निभावताना दुर्योधनाच्या सोबत तर राहिला ना?
प्रोफ. डम्बलडोर - नाही ना... त्याचा अहंकार मैत्रीच्या वर होता... जेव्हा रॉन जखमी होता तेव्हा त्याला तू आणि हर्मायनी सगळे निर्णय घेत आहात आणि त्याला साईडलाईन केलं जातंय असं वाटलं. त्याचा अहंकार, मैत्री आणि प्रेम दुखावलं गेलं. तो निघून गेला. पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की हीच वेळ आहे. तेव्हा तुमचा काहीही पत्ता नसताना रानोमाळ तो तुम्हाला शोधत फिरला आणि जेव्हा ते लॉकेट फोडायचे होते तेव्हा तो तुझ्यासोबत होता. पण कर्णाने काय केलं... दुर्योधनाच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई तो पहिले १० दिवस लढलाच नाही. कारण त्याला भीष्म म्हणाले की तू अर्धरथी आहेस. हा त्याला अपमान वाटला. त्यामुळे जोवर भीष्म सेनापती आहेत तोवर त्याने लढाईत भागच घेतला नाही.
हॅरी - पण त्याच्यावर लहानपणापासून अन्याय झाला. त्याला आयुष्याच्या सर्वात मोठ्या लढाईच्या वेळी वाटणारच ना, की त्याला महारथी म्हणावे...
प्रोफ. डम्बलडोर - अन्याय कुणावर झाले नाहीत... माझं आयुष्य तुला आता बरंच कळालं आहे. मी, माझा भाऊ, बहीण, आई... कितीतरी कठीण गोष्टी होत्या. त्या सर्व मागे ठेऊन योग्य मार्ग निवडता आला पाहिजे. नियतीने तुझ्यावरही किती अन्याय केलाय. तू वर्षाचा होतास तेव्हा आईबाप गेले. मावशीने सांभाळ केला, तोही नाईलाजाने. शाळेत तुला काही चांगले, प्रेम करणारे शिक्षक भेटले तर काही सदैव भीती घालणारे, तुझा अत्यंत द्वेष करणारे भेटले. मित्र भेटले, सोबतच वैरीही भेटले. माझ्यासारखा तुला निव्वळ एक शस्त्र म्हणून तयार करणारा हेडमास्तर भेटला... हे होऊनही तू आज माझ्याशी अत्यंत प्रेमाने, आदराने बोलत आहेस. ज्याने तुझ्याशी सदैव वैर पत्करलं, जो माझ्या मृत्यूला एका अर्थाने कारणीभूत झाला, त्या ड्रेकोला तू काही तासांपूर्वी मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर काढलंस... या सगळ्या तुझ्या निवडी होत्या आणि त्यातूनच तुझं चारित्र्य दिसून येतं. कर्णाला तर उदाहरण म्हणून कृष्ण होता. त्याच्यावरही नियतीने कितीतरी प्रकारे अन्याय केला आणि तरीही तो न्यायाच्या, नीतीच्या बाजूने ठाम उभा राहिला. त्यामुळे हॅरी, हे कायम लक्षात ठेव की एखाद्या व्यक्तीची क्षमता तिचं चारित्र्य ठरवत नाही तर त्या व्यक्तीची निवड तिचं चारित्र्य ठरवते. त्यामुळे तुला निवड करायची आहे. तू आता काय करणार?
हॅरी - मला ठरवावे लागेल...?
प्रोफ. डम्बलडोर - हो
हॅरी - माझ्यापुढे पर्याय काय आहेत?
प्रोफ. डम्बलडोर - तू आत्ताच म्हणाला होतास ना की आपण किंग्स क्रॉस स्टेशनवर आहोत. त्यामुळे परत जाण्याचं ठरवलंस तर परत जाऊ शकशील, किंवा तू जर ठरवलं इथे थांबायचं तर असं समज की एक ट्रेन येईल आणि तुला घेऊन जाईल
हॅरी - कुठे?
प्रोफ. डम्बलडोर - पुढे...







