Tuesday, March 20, 2018

रंग दे बसंती

उडत्या चाली त्या गाण्याला योग्य असल्या तरी काही वेळा अर्थ झाकून टाकतात. पण कधीतरी तो गीतकार त्या गाण्याबद्दल, त्या गाण्याच्या जन्माबद्दल बोलतो आणि ते गाणं पुन्हा ऐकलं की शब्दरचना संगीतापेक्षा जास्त आवडायला लागते. असंच एक गाणं “रंग दे बसंती” चित्रपटाचं शीर्षक गीत.
राकेश मेहरा प्रसून जोशीकडे रंग दे बसंतीचे शीर्षक गीत मागण्यासाठी आला. प्रसून जोशीने काही दिवस घेतले आणि राकेश मेहराला फोन केला. त्यात सांगितले की मी देशप्रेमाची रेसिपी लिहिणार आहे, चालेल का? राकेशचा प्रसूनवर विश्वास होता. आणि सुरू झाला एका सुंदर गाण्याच्या निर्मितीचा प्रवास. त्या शब्दांना अस्सल पंजाबी मातीची चाल संगीताच्या जादूगाराने लावली... ए आर रेहमान. त्यावर चित्रा आणि होम पीच वर खेळत असलेल्या दलेर मेहंदीने कहर केला आणि अप्रतिम गाणं बनलं!!!
या देशाची थोडी धूळ माती, थोडा सुगंधित, मुक्त, मनस्वी - मोकाट वारा, तो श्वास आणि ज्यात जुनून (प्रेमासाठी हौतात्म्य पत्करायला तयार) आहे असं रक्त. हे सगळं एकत्र कर. यातून जो रंग प्रकट होईल त्या बसंती रंगाने मला रंगवून टाक!
थोडीसी धूल मेरी धरती की मेरे वतन की
थोडीसी खुशबु बौराई से मस्त पवन की
थोडीसी ढूंढने वाली धक् धक् धक् धक् धक् धक् साँसें
जिन में हो जूनून जूनून वो बूंदे लाल लहू की
यह सब तू मिला मिला ले फिर रंग तू खिला खिला ले
और मोहे तू रंग दे बसंती यारा मोहे तू रंग दे बसंती
या रंगाने माझी स्वप्ने, माझा आनंद, माझी शेते आणि माझ्या सगळ्या पिढ्या, माझी गाणी आणि मनाचा ठाव रंगव.
सपनें रंग दे अपने रंग दे खुशियाँ रंग दे गम भी रंग दे
नस्लें रंग दे फ़सलें रंग दे रंग दे धड़कन रंग दे सरगम
और मोहे तू रंग दे बसंती यारा मोहे तू रंग दे बसंती
आता पुन्हा रेसिपी...
मध्यम आचेवर थोडं प्रेम ठेव, त्यात थोडे ओढे, नद्या, समुद्र घे आणि हे सगळं एका घड्यात एकत्र करून हलव. ('गागर में सागर' अशी म्हण सुद्धा इथे वापरली आहे, साठा उत्तराची कहाणी सारखी. हे सगळं प्रचंड आहे पण ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय.) त्यातून एक बसंती रंग तयार होईल, त्याने मला रंगवून टाक!
धीमी आंच पे तू ज़रा इश्क़ चढ़ा
थोड़े झरने ला थोड़ी नदी मिला थोड़े सागर ला थोड़ी गागर ला
थोड़ा छिडक छिड़क थोड़ा हिला हिला फिर एक रंग तू खिला खिला
मोहे मोहे तू रंग दे बसंती यारा
या रंगाने माझं गाव, माझी वस्ती, माझी ओळख – माझं स्वत्व, माझ्या शरीराची एकून एक नस, माझं बालपण – तारुण्य सगळं सगळं रंगवून टाक. आज आत्ता ताबडतोप रंगव... आता उशीर नको.
बस्ती रंग दे हस्ति रंग दे हंस हंस रंग दे नस नस रंग दे
बचपन रंग दे जोबन रंग दे अब देर न कर सचमुच रंग दे
रंग रेज़ मेरे सब कुछ रंग दे मोहे मोहे तू रंग दे बसंती यारा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

दि. २६ जानेवारी २०१८

अब तक छप्पन (मंदिरांना भेटी)

शिवजी: मेरा पूरा लाईफ ही चेंज हो गया रे.. 
राहुलजी: लाईफ चेंज होता है तो होने दो। मैंने हमेशा ऐसाहीच किया। लाईफ के साथ कभी इंटरफियर नहीं।
शिवजी: दूसरों के लाईफ के साथ इंटरफियर करता है वो चलता है? 
राहुलजी: क्या करें? अपना कामही ऐसा है। लेकिन मैंने अपने लाईफ के साथ कभी दखलअंदाजी नहीं किया। जो हुआ, होने दिया। कसम से... अभी आप ही सोचो, जो आदमी कुछ भी नहीं था, ज्यादा पढ़ा नहीं, आज उसके पास... ये....
शिवजी: क्या, ये क्या?
राहुलजी: स्ट्रेंथ
शिवजी: इसको स्ट्रेंथ नहीं, न्यूसन्स व्हॅल्यू बोलते है।
राहुलजी: बोले तो?
शिवजी: देख, स्ट्रेंथ का मतलब है, ताकत। मैंने कभी पॉलिटिक्स किया नहीं। हिमालय से लेकर रामेश्वरम् तक भारतीय मुझे पूजते है। लेकिन तू ने और तेरी पार्टी ने हमेशा मुझे इग्नोअर किया। जिन्होने मेरी मूर्तीयो को मंदिरो को तोडा उनसे तुम्हारी पार्टी के कई लोगों को हमदर्दी है। शायद तुझे भी होगी। फिर भी तू मेरा नाम लेता है। मेरे मंदिर मे आकर मेरी पूजा करता है। खुद को जनेऊ धारी हिंदू कहेलाता है। तेरे पार्टीवाले भी आपस में मेरी बजाते है लेकिन सबके सामने मेरे आगे झुकते है। इसको बोलते है स्ट्रेंथ। तू गुजरात मे हिंदू बोल के मेरी पूजा करता है और उसी दौरान कर्नाटक मे मेरे नाम से लिंगायत/वीरशैव का प्रयोग कर के हिंदुओ मे अलगाव फैलाता है। अब तू ने मेरी पूजा शुरू की। अब तेरे दिमाग में चल रहा है की इसका फायदा कैसे उठाऊँ? इसको ऐसे इस्तेमाल करूँ की वैसे इस्तेमाल करूँ... भाजपा को गुजरात मे छोटा झटका दिया। अब आगे इसको कैसे वापरू मैं? कहा हिंदू बना के पेश करू, कहा अलग धर्म की मग करके वोटो को बटेरू? ये सब जो सोच रहा है ना, उसको बोलते है न्यूसन्स व्हॅल्यू। क्या हँस रहा है, मै तो कब से यही हू। इतिहास जानता है की तेरे परनाना ने मेरा मंदिर बनाने को सरदार पटेल को विरोध किया था। वो तो सोमनाथ मे राजेंद्र बाबू आने से भी परेशान थे। फिर भी मंदिर बना और तू यहा आया मुझे प्रणाम करने.....स्ट्रेंथ।
(मूळ संवाद - संदीप श्रीवास्तव. चित्रपट - अब तक छप्पन. मूळ विडंबन (गांधीजी/मोदीजी) Utpal VB. हलकेच घेणे ही विनंती. राहुल गांधींचा मानभंग हा हेतू नाही. तरी मानभंग वाटल्यास क्षमस्व.)

दि. ३० जानेवारी २०१८

अलिप्त आणि निर्लिप्त

दोन दिवसांपूर्वी लिहिताना सहजच दोन शब्द लिहिले गेले. एक नेहरूंच्या परराष्ट्रनीतीसाठी होता - अलिप्ततावादी आणि दुसरा मोदींच्या परराष्ट्रनीतीसाठी होता निर्लिप्ततावादी. गेले दोन दिवस डोक्यात एक धागा या दोन शब्दांभोवती फिरतोय. त्यात जो काही विचार मनात आला तो शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतोय.
आधी एक गोष्ट स्पष्ट करतो की नेहरूंनी त्यांच्या परराष्ट्रनीतीबद्दल शद्ब इंग्रजी वापरला होता - non aligned. त्याचं भाषांतर करताना कदाचित वेगळा शब्द योजता आला असता.
अलिप्तता/निर्लिप्तता यावर पुन्हा परत येतोय. यासाठी सर्वात आधी एक उदाहरण देतो. अर्थात महाभारतातील. बलरामाला युद्ध व्हावे असं वाटत नव्हतं. केवळ राज्यासाठी होणारं प्रचंड मोठं युद्ध त्याला नकोसं वाटत होतं. त्यामुळे बलराम युद्धाआधी वनवासात गेला आणि युद्धाच्या शेवटच्या दिवशी परतला. कृष्णालाही युद्ध व्हावं असं वाटत नव्हतं. पण त्याने शिष्टाई केली. जेव्हा युद्ध थांबवण्याचे सगळे प्रयत्न अपुरे पडणार याची खात्री झाली तेव्हा जो पक्ष खरा वाटला, त्याच्या बाजूने युद्धात नि:शस्त्र गेला. पांडवांना नैतिक मदत आणि मार्गदर्शन दिले.
माझ्या मते या उदाहरणात बलराम अलिप्त राहिला तर कृष्ण निर्लिप्त!
तुकारामांच्या एका अभंगात ते म्हणतात,
अणूरेणूया थोडका। तुका आकाशाएवढा।
गिळुनि सांडिले कळीवर। भवभ्रमाचा आकार।।
सांडिली त्रिपुटी। दीप उजळला घटी।
तुका म्हणे आता। उरलो उपकारापुरता।।
यात तुकाराम ज्ञानप्राप्तीनंतर संन्यास सांगत नाहीत, तर कोणत्याही अपेक्षेशिवाय उपकार करायचे सांगतात. म्हणजेच निर्लिप्तपणे काम करायचे सांगतात. अलिप्तपणे कर्मसंन्यास घेण्याचे सांगत नाहीत. भगवद्गीतेची हीच शिकवण लोकमान्यांनी गीतारहस्यात सांगितली आहे.
कदाचित अलिप्त व निर्लिप्त या शब्दांच्या अर्थामध्ये कुणाला फरक आहे असे वाटणार नाही. पण मला जो वाटला तो मी सांगितला.
निर्लिप्तता काय असते हे सांगणारी सुरेश भटांची कविता देऊन थांबतो.
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
सांगती ’तातपर्य’ माझे सारख्या खोट्या दिशा :
"चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !"
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

दि. १३ फेब्रुवारी २०१८

सैनिक, सर्वसामान्य आणि संघ स्वयंसेवक

मागील काही दिवसांत प. पू. सरसंघाचालकांच्या सैनिक, सर्वसामान्य आणि संघ स्वयंसेवक भारतीय यावर बरीच चर्चा झाली. काहींनी प्रश्न विचारले, काहींनी विनोद तयार केले, तर ज्यांनी तयार संघटना मोडून आपली संघटना उभी केली, पण ती धड नऊ वर्षे सांभाळता आली नाही त्यांनी नव्वद वर्षांहून अधिक वय असलेल्या संघटनेवर व्यंगचित्र काढून आपली भडास काढली. या सगळ्यातून विरोध न दिसता द्वेष दिसून आला.
संघ तीन दिवसांत युद्धजन्य परिस्थितीत स्वयंसेवकांना युद्धसज्ज कसे करू शकतो? हा यातील मुख्य प्रश्न. युद्धसज्ज असणे म्हणजे बंदुका घेऊन थेट सीमेवर जाणे असे नसते. सैन्याची अनेक अन्य कामे असतात. ती हलकी केली तरी सैन्याला प्रचंड मदत होऊ शकते. सैन्यासाठी जेवण बनवण्यापासून ते सैनिक रुग्णसेवा करेपर्यंत. पण त्यात आत्मीयता आणि शिस्त असावी लागते जी स्वयंसेवकांमध्ये असते, याची मोहनजींना खात्री आहे.
अनेकांनी स्वयंसेवकांनी युद्धजन्य परिस्थितीत कुठे, कसं आणि काय काम केलं याचे अनेक दाखले दिले. पण युद्धजन्य परिस्थिती नसताना तयारी कशी होते याचं मी अनुभवलेलं उदाहरण देतो. सुमारे वीस वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. पहाटे सव्वा चार वाजता दार वाजलं. "साडेपाचला शहरसंघचालकांच्या घराजवळील संघस्थानावर अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील तरुणांचे एकत्रीकरण आहे" हा निरोप मिळाला. मी एका शाखेचा कार्यवाह होतो. सर्व तरुण गटनायकांना निरोप दिला. त्यांनी आपापल्या गटात निरोप दिले आणि साडेपाचला पाचशेहून अधिक तरूण संघस्थानावर आले. शाखा लागली. संघचालकांनी आपण केवळ दीड तासात पाचशे+ स्वयंसेवक एकत्र येऊ शकलो त्याबद्दल समाधान व्यक्त केले. कधीही जर युद्धजन्य परिस्थिती असेल तर आपण असेच लवकर एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करू असे सांगितले. प्रार्थना झाली आणि सर्व घरी पोहोचले.
वीस वर्षांपूर्वी मोबाईल काय, प्रत्येकाकडे घरी फोन सुद्धा नव्हते. पण खालील गोष्टी स्वयंसेवकांत होत्या
१. निरोप कसा पोहोचवायचा याची शिस्त. संघचालक - दोन भाग कार्यवाह - प्रत्येकी पाच नगर कार्यवाह - प्रत्येकी सुमारे ३, ४ तरूण शाखांचे कार्यवाह - प्रत्येकी ५, ६ तरूण गटनायक - प्रत्येकी ८, १० तरूण स्वयंसेवक. या प्रकारे एका तासात निरोप प्रत्यक्ष भेटून दिला गेला.
२. नेतृत्वावर विश्वास - कुणीही, का बोलावले, ही काय वेळ आहे का... विचारले नाही. संघचालकांनी बोलावले ते काहीतरी काम असेल म्हणून बोलावले असेल. तिथे गेलं की कळेलच. घरच्यांनाही सहज जाऊ दिले कारण त्यांनी संघ पेपरातून, टीव्हीवरून समजावून घेतला नव्हता तर अनुभवला होता.
३. निरोप नेमका पोहोचवणे - या एकत्रीकरणात कुणीही बाल किंवा ४५+ स्वयंसेवक आले नव्हते.
हे स्वयंसेवकांत का असते याचे उत्तर देणे खूप अवघड आहे. ती प्रत्यक्ष संघस्थानावर जाऊन अनुभव घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे शाखामे आओ, सब जान जाओ।
माझे जे मित्र संघद्वेषी आहेत त्यांना माझे एकच सांगणे आहे. तुम्ही द्वेषी होऊ नका. तुम्हाला संघ आवडत नाही तर विरोधी रहा. तुमच्या मते संघ द्वेष पसरवतो, मग तुम्ही प्रेम पसरवा. कारण तुम्ही स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणवता. द्वेष केल्याने द्वेषच वाढेल. एवढं केलंत तरी आनंद होईल. स्वयंसेवक तुमचा द्वेष नक्की करणार नाहीत कारण त्यांना माहीत आहे की तुम्ही निश्चितच एक भावी स्वयंसेवक आहात

दि. १७ फेब्रुवारी २०१८

कायद्याचा टोला

पूर्वपीठिका - अभिजीत आणि हर्षवर्धन हे दोघे मित्र 2005 मध्ये जीवाची मुंबई करायला जात असताना एका प्रकरणात अडकतात. त्यात त्यांना अभिजीतचा वकील मामा केशव सोडवतो. या दरम्यान केशवला त्याची कॉलेज मधील मैत्रीण नेहा भेटते, मदत करते.
पुढे
केशव आणि नेहाचं 2006 मध्ये धुमधडाक्यात लग्न होतं. नेहाच्या वडिलांची अट केशवने पूर्ण केल्यामुळे ते कोणतीही नवी अट न लादता लग्न लावून देतात. लग्नात अभिजीत आणि हर्षवर्धन मात्र सहभागी होऊ शकत नाही कारण त्यांची शेवटच्या वर्षाची परीक्षा. केशव आणि नेहा गावी येतात आणि केशवचे शेतीमधील प्रयोग सुरू होतात. बीडमधील दुष्काळी भागात केशव शेती फुलवतो आणि सोबत गावातील अन्य शेतकऱ्यांनाही खूप मदत करतो. 2008 मध्ये त्यांना गोड मुलगा होतो.
2007 मध्ये अभिजीत आणि हर्षवर्धन इंजिनियर होतात. हर्षवर्धन त्याच्या बाबांच्या सोबत तालुक्याच्या राजकारणात जातो. त्याची दिशा मात्र अन्य राजकारण्यांपेक्षा वेगळी असते. त्यांच्यावर 3 वर्षांपूर्वी आलेल्या प्रसंगामुळे तो बदलून जातो आणि लोकोपयोगी कामे हीच दिशा ठेऊन राजकारणात उतरतो.
अभिजीतवरही पोलीस कोठडीचा परिणाम झाला. इंजिनिअर झाल्यावर नोकरी शोधण्याऐवजी तो IPSची तयारी करतो आणि 2008 मध्ये मुंबईत ACP अभिजीत वैद्य कामाला सुरुवात करतो.
मुंबई वरील 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी तो ड्युटीवर असतो आणि कामा हॉस्पिटल मधील अनेकांना वाचवतो. या वेळी त्याने दाखवलेले प्रसंगावधान त्याला महाराष्ट्र ATS मध्ये घेऊन जाते. तिथे अनेक केसेस वर काम करत अभिजीत आपले वेगळेपण सिद्ध करतो. (या दरम्यान त्याला एक मैत्रीण द्यायची असेल तर चंद्रकांत कुलकर्णी यांनी द्यावी. मला तरी कथेची गरज वाटत नाही)
पुण्यात अचानकच 1 ऑगस्ट 2012 मध्ये 5 साखळी स्फोट झाले. अभिजीतची या केसवर नियुक्ती झाली आणि तो त्याच्या पद्धतीने काम करत होता. हर्षवर्धनच्या चांगल्या कामांमुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्यामुळे त्याला अनेक सुगावेही तरुणांकडून कळायचे. या प्रकारणाचाही सुगावा त्याला लागला आणि तो खूप मोठा होता. तेव्हाच त्याला हेही कळते की अतिरेक्यांना मुंबई लोकलमध्ये 2005 मध्ये स्फोट करायचे होते. पण नेमका 'तो' प्रसंग घडला आणि त्यांचा सगळा प्लॅन बारगळला. शिवाय केशवच्या हुशारीने आणि कोर्टाच्या दट्ट्याने ते पकडले गेले. पण पुरेश्या पुराव्यांशिवाय ते बेल वर सोडले गेले. त्यांनीच पुढे 11 जुलै 2006 ला लोकल मध्ये स्फोट घडवले आणि 26/11च्या हल्ल्यात कसाबच्या टोळीला मदत केली. हे सर्व अभिजीतला प्रत्यक्ष सांगणं आवश्यक होतं, फोनवर बातमी लीक होण्याची शक्यता होती. पण बातमी कुठूनतरी लीक झालीच आणि पुणे मुंबई प्रवासात हर्षवर्धनवर हल्ला झाला. त्यात 24 डिसेंबर 2012 ला हर्षवर्धन मारला गेला. हा हल्ला अपघात दाखवून हल्लेखोर फरार झाले.
सर्वांना हा अपघातच वाटला पण हर्षवर्धन च्या वडिलांना यात घातपात असावे असे वाटले आणि त्यांनी अभिजीतचा बोलावून घेतले. त्यांचे सगळे अंदाज त्यांनी अभिजीतला सांगितले. अभिजीत आता हात धुवून अतिरेक्यांच्या मागे लागला.
त्याच दरम्यान नेहा माहेरपणाला आपल्या 4 वर्षांच्या रोहनला घेऊन पुण्यात आली. एका मॉलमध्ये असताना कुतूहलापोटी रोहन दोन व्यक्तींच्या मागे जातो. ते तेच अतिरेकी असतात आणि त्या धावपळीत अतिरेकी रोहनला घेऊन पसार होतात. त्यांना जेव्हा रोहन हा केशवचा मुलगा आहे हे कळतं तेव्हा ते त्याला त्यांच्या अड्डयावर ओलीस ठेवतात.
सबइन्स्पेक्टर अंबिलढगेला 2005 मध्ये केलेल्या चुकीमुळे गडचिरोलीत बदली मिळालेली असते. तेथे मात्र ते आपली चमक दाखवतात आणि आपल्या शौर्याच्या बळावर लवकरच सिनियर इन्स्पेक्टर बनतात. पुढे पुण्यात त्यांची बदली होते आणि अभिजीतला मदत करायला ते पुढे येतात. अभिजीतही मागील गोष्टी विसरून या केसवर लक्ष केंद्रित करतो.
केशव पुण्यात येतो. पोलिसी पद्धतीने अभिजीत शोध घेत असतो पण आणखी काहीतरी करायला पाहिजे म्हणून केशव भाईला मुंबईत भेटतो. भाई त्याला पुण्यातील उस्मानला भेटायला सुचवतो.
एकीकडून अभिजीत आणि अंबिलढगे तर दुसऱ्या बाजूने केशव, नेहा आणि उस्मान गुन्हेगाराचा छडा लावण्याचा प्रयत्न करतात. (इथे अजित दळवी यांनी प्रसंग लिहावेत) अखेरीस सर्व पुराव्यांसह अतिरेकी पकडले जातात आणि रोहनचीही सुटका होते.
कोर्टात केस उभी राहते आणि पहिल्याच हिअरिंग मध्ये फडणवीस अशी काही सुरुवात करतात की न्यायाधीश म्हणतात हा आहे कायद्याचा टोला
कलाकार
अभिजीत - उमेश कामत
हर्षवर्धन - अक्षय पेंडसे
(हर्षवर्धनची भूमिका करणारा अक्षय पेंडसे अपघातात वारला. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष सहभाग असलेला एकही प्रसंग यात नाही. सर्व प्रसंगात तो फोनवर बोलतोय आणि दुसऱ्या बाजूने बोलणारा काय बोलतो त्यावरून हर्षवर्धन काय करतोय ते कळाले पाहिजे)
केशव - मकरंद अनासपुरे
नेहा - शर्वरी जमेनिस
हर्षवर्धनचे वडील - अरुण नलावडे
अंबिलढगे - गणेश यादव
भाई - संजय मोने
उस्मान - सिद्धार्थ जाधव
फडणवीस - सचिन खेडेकर
न्यायामीश - मोहन आगाशे
रोहन - कुणीही 4 वर्षांचे गुणी बाळ
अतिरेकी - बिना चेहऱ्याची 2 पात्रे
दि. १८ फेब्रुवारी २०१८

Monday, March 19, 2018

बुद्ध, शंकरचार्य, वैदिक धर्म वगैरे


बुद्ध, शंकरचार्य, वैदिक धर्म वगैरे

बुद्ध धर्म, उदय आणि पूर्व आशियात पूर्ण प्रभाव.

बुद्धांनी त्या काळातील वैदिक धर्मातील चालीरीती
१.      यज्ञ, यज्ञातील प्राणिहिंसा, त्यामुळे येणार्‍या अंधश्रद्धा
२.      चातुर्वर्ण्य
३.      देवाचे अनावश्यक महत्व, त्यामुळे येणार्‍या अंधश्रद्धा
या सर्वांना नाकारले. आणि धर्म सोपा केला.

सामान्य जनांसाठी त्यांनी पंचशील संगितले.

पाणाति पाता वेरमणी सिक्खापदं समादियामि - अहिंसा
अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि - चोरी न करणे
कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि - व्याभिचार न करणे
मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि - सत्य

सुरा मेरयमज्जपमादठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि - नशा न करणे

एवढे करा, बाकी काही केले नाही तरी चालेल. तुम्हाला मोक्ष मिळेल.

ज्यांना यापुढे, पारमार्थिक ज्ञान हवे आहे त्यांच्यासाठी त्यांनी विपश्यना मार्ग आणि त्यातून निर्वाणप्राप्ती सांगितली. अर्थात प्रपंचात राहून सुद्धा विपश्यना करता येते. पण सर्वात आधी पंचशील अनुसरणे महत्वाचे.

बुद्ध चार्वाकाप्रमाणे देवाला, मोक्षाला direct नाकारू शकले नाहीत. कदाचित चांगले वागून काय मिळणार? याचे सोपे आणि भारतीय परंपरेला शोभेल असे उत्तर मोक्षअसल्याने त्यांनी ते दिले असावे.

बुद्धांनी कधीही कोणते चमत्कार केले नाहीत आणि त्यांच्या अनुयायांनीसुद्धा खोट्या गोष्टी (भिंत चालवणे, मेलेल्या माणसाला जिवंत करणे, विमानातून वैकुंठला जाणे) पसरवल्या नाहीत.

बुद्धांच्या या सोप्या धर्मामुळे केवळ चांगले वागणे आणि कौशल्याधारीत पोटापाण्याची व्यवस्था करणे हेच महत्वाचे ठरले. शिवाय बुद्धाने धर्म हा प्रचलित भाषेतून सांगितला आणि संस्कृत, जी केवळ अभिजनांची भाषा झाली होती, तिला बाजूला ठेवले व धर्मज्ञान सामान्य माणसांसाठी खुले केले. त्यामुळे यज्ञ करणारे, पूजा घालणारे, पोथ्या-पुरणांचा चुकीचा अर्थ लावून सामान्यांना गंडवणारे, कर्मकांडत देवत्व शोधणारे यांचे अच्छे दिनगायब झाले.

कृष्णाने कर्मयोग सांगितला. बुद्धाने तेच, चांगले वागाया पद्धतीने संगितले. कृष्णाने या जन्मात आत्म्यावर कर्मसंस्कार न होऊ देता कसे जगावे हे संगितले, बुद्धाने मागील जन्मातील कर्मसंस्कार सुद्धा कसे दूर करावे ते सांगितले. माझ्या मते, बुद्धाने हिंदू धर्म हा कर्मकांडातून काढून खर्‍या कर्मयोगाकडे वळविण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वीही झाले.

बुद्धांचा कालखंड हा ई.पू. ५०० च्या सुमारास आहे. त्यानंतर चाणक्य आणि मौर्य यांचा कालखंड आहे ई.पू. ३५० च्या सुमारास. नंतर सम्राट अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारला तो ई.पू. २७० च्या आसपास. इथून पुढे बुद्ध धर्म हा पूर्व आशियात पसरत गेला तो जपान पर्यंत. तेव्हापासून ते आदिशंकराचार्य यांचा उदय होईपर्यंत, म्हणजे ई.नं. ८०० पर्यंत, सुमारे १००० वर्ष बुद्ध धर्म हा अफगाणिस्तान पासून जपान पर्यंत सर्वत्र पोहोचला होता.

पण कोणताही संप्रदाय असो, त्यात चांगले वाईट लोक येतातच. शिवाय शिकवणुकीचा अर्थ काढणारेही खूप लोक असतात आणि ते आपल्या बुद्धिप्रमाणे किंवा स्वत:च्या फायद्याचे अर्थ काढतात. असेच अर्थ बुद्ध धर्मात देखील काढले गेले.
१.      चीन व जपान मध्ये बुद्ध धर्माचे विकृत रूप तेथील राज्यकर्त्यांनी तयार केले. ज्यात शत्रूचे किती लोक मारले यावरून ती व्यक्ती निर्वाणपदाच्या किती जवळ गेली ते ठरवले जात असे. यावर एक सविस्तर पुस्तक आहे. इच्छुकांनी शोधून वाचावे.
२.      भारतात, जे लोक संसार सोडून धर्मकार्यात, साधनेत वेळ व्यतीत करतात ते महान, त्यांनाच मोक्ष मिळणार, इतर लोक जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटणार नाहीतवगैरे गोष्टी पुढे आल्या आणि जास्त लोक सान्यासी आणि कमी लोक गृहस्थाश्रमी असा असंतुलित समाज निर्माण होईल की काय असे वाटू लागले.

हिंदू धर्मातील दर्शने

बुद्धांनी इतकी वर्षे मूर्तिपूजा आणि कर्मकांडांना विरोध केला. पण आज जगात सर्वात जास्त बुद्धांच्या मूर्त्या आहेत आणि सर्व धार्मिक विधी हे बुद्ध भिख्खू करतात. म्हणजे पुन्हा बुद्ध धर्मात मूर्तिपूजा व कर्मकांड आलेच. This is irony! असो.

शंकराचार्याँनी पुनरुज्जीवित केलेला हिंदू धर्म बघण्याआधी एकूण हिंदू दर्शने कोणती आणि ती काय सांगतात ते बघणे सयुक्तिक राहील. हिंदू धर्मांतर्गत ६ आस्तिक आणि ३ नास्तिक दर्शने मनाली गेली आहेत.
आस्तिक दर्शने:
१.      सांख्य
२.      योग
३.      न्याय
४.      वैशेषिक
५.      मीमांसा
६.      वेदान्त

नास्तिक दर्शने:
१.      बुद्ध
२.      जैन
३.      चार्वाक (यात आजीवक हे आणखी एक उपदर्शन आहे)

आस्तिक दर्शने
सांख्य:
सांख्य दर्शन कपिल मुनींनी मांडले. यात द्वैत तत्वज्ञान संगीतलेले आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुष* हे वेगवेगळे आहेत. गीतेच्या अध्याय २ मध्ये सांख्य दर्शन विस्ताराने सांगितलेले आहे. प्रकृती तीन गुणांनी बनलेली आहे. सत्व, रज तम जोवर यांचे प्रमाण बरोबर आहे, तोवर no issues – balance गेला की गडबड. सांख्यांच्या मते, अविद्या हे सर्व दु:खांचे कारण आहे. विद्या, म्हणजेच विवेकबुद्धी ही मोक्षाप्रत घेऊन जाते. हा विवेक तीन गुणांना प्रमाणात ठेवतो. अविद्येमुळे अहंकार निर्माण होतो. अहंकारातून दु:ख निर्माण होतात.
विवेकबुद्धीने प्रकृती आणि पुरुष यातील द्वैत कळते. आणि ते कळले की कैवल्यस्थिती येते. ही कैवल्यस्थिती म्हणजे मोक्ष!
इथे कुठेही typical देवांचा उल्लेख नाही. तरीही हे दर्शन आस्तिक मानतात कारण आत्म्याचे अस्तित्व यांनी मान्य केले आहे. तसेच पुरुष हा केवळ चैतन्य स्वरुपात मानला गेला आहे.

योग:
योग दर्शन पतंजलि मुनींनी मांडले. यात आठ पायर्‍या सांगितल्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. योगसूत्रात पुरुषाला देव मानले आहे. समाधी म्हणजे मोक्ष.
योग म्हणजे चित्तवृत्तींना स्थिर ठेवणारे mechanism. योगांमध्ये या आठ पायर्‍यांचा राजयोग हा उत्तम मनाला गेला आहे.
इथेही typical देवांचा उल्लेख नाही.

गमतीची गोष्ट: ११ व्या शतकात एक पर्शियन विद्यार्थी अल बिरुनी भारतात आला होता. त्याने योगाचा खूप अभ्यास केला. पतंजलींचे योगसूत्र त्याने पर्शियन आणि अरबी भाषेत नेले. भारतीय साधूंशिवाय सूफी संत योग करायचे. सूफी संत देवाला प्रियकर अथवा प्रेयसीच्या रूपात बघतात. कदाचित त्यामुळेच इश्क के सात मुकाम दिलकशी, उंस, मोहोब्बत, अकीदत, ईबादत, जुनून, मौत त्यांनी मांडले असावेत... This is only my theory. There is no evidence of it.

*पुरुष म्हणजे स्त्री पुरुष मधला नाही!!! पुरात (नगरात) वास्तव्य करतो (किंवा खरे तर झोपतो) तो पुरुष. नगर म्हणजे ५ ज्ञानेंद्रीये, ५ कर्मेन्द्रीये आणि १ मन. अशा ११ गोष्टींचे नगर.

सांख्य आणि योग ही दर्शंनांची पहिली जोडी आहे. दुसरी जोडी न्याय आणि वैशेषिक. न्याय दर्शन हे अधिभौतिक आणि तर्कबुद्धीचे दर्शन आहे तर वैशेषिक दर्शन हे पदार्थ विज्ञानाचे दर्शन आहे.

न्याय:
तर्कबुद्धी वापरुन देवाचे अस्तित्व सिद्ध करणारे दर्शन. हे दर्शन कोणी मांडले हे स्पष्ट नाही. तुम्हाला भारत एक खोजमालिकेतील शीर्षकगीत आठवत असेल
सृष्टि से पहले सत नहीं था
असत भी नहीं
अंतरिक्ष भी नहीं
आकाश भी नहीं था
छिपा था क्या, कहाँ
किसने ढका था
उस पल तो
अगम अतल जल भी कहां था
हे शब्द ऋग्वेदातील ऋचा आहेत. आणि यापासूनच न्याय दर्शन सुरू होते.
हेतुविद्या, अन्वेक्षण, प्रमाणशास्त्र, तत्त्वशास्त्र, तर्कशास्त्र, वादार्थ, फक्किकशास्त्र या सहा विद्या/शस्त्रांद्वारे न्याय दर्शन या जगाचा कुणीतरी अज्ञात कर्ता आहे हे दाखवून देते. पण हा कर्ता म्हणजेच चैतन्यतत्व आहे आणि त्याद्वारेच सर्व जगाचे व्यवहार चालत असतात. हा देव इंद्र, वरुण, ई., किंवा ब्रह्मा-विष्णु-महेश या रूपात नाही.

वैशेषिक:
न्याय दर्शनापासून पुढे अधिक प्रगल्भ होत वैशेषिक दर्शन बनले. कणाद मुनी या दर्शनाचे कर्ते आहेत. या दर्शनात जगत पहिल्यांदा अणू हे concept मांडली गेली. जगातील सर्व पदार्थ हे परमाणु पासून बनले आहेत हे कणादांनी सांगितले. प्रत्येक पदार्थ हा द्रव्यापासून बनला असून त्यात अणू हा लघुत्तम भाग आहे. प्रत्येक पदार्थाचे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय असे गुणधर्म असतात.
वैशेषिक हे तर पूर्णपणे पदार्थविज्ञान आहे. Again, इथेही typical देवांचा उल्लेख नाही

वरील चारही दर्शनांनी देव ही concept मान्य केलेली आहे. त्यांनी देवाचे आणि वेदांचे अस्तित्व मान्य केलेले आहे. वेदांतील ऋचांचा अभ्यास करून त्यावर अधिक संशोधन करून ही दर्शने सिद्ध झालेली आहेत. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे यातील योग आणि वैशेषिक दर्शनांची formal निर्मिती म्हणजे योगसूत्रे आणि वैशेषिक सूत्रे हे बुद्ध धर्माचा उदय झाल्यानंतर मांडले गेले आहेत. त्यामुळे हिंदू आणि बुद्ध धर्मात भांडणे होती वगैरे या गोष्टी केवळ बुद्धिभेद करण्यासाठी इंग्रजांनी मांडल्या असाव्यात.

मीमांसा किंवा पूर्वमीमांसा:
या दर्शंनांमध्ये वेदांमध्ये असलेले यज्ञविधी कसे करावेत, कोणत्या पूजा असाव्यात basically मीमांसा हे दर्शन कर्म-कांड आहे. तर वेदान्त किंवा उत्तरमीमांसा हे दर्शन ज्ञान-कांड आहे. हे दर्शन जैमिनी या ऋषींनी लिहिले. मीमांसा मधील सूत्रे ई. पू. ३ र्‍या ते ई. पू. १ ल्या शतकापर्यन्त लिहिली गेली. पुढे त्याचा विस्तार कुमारिला भट्ट आणि प्रभाकर यांनी ई.स. ७ व्या शतकात केला. त्याहीपुढे अनेक ऋषींनी मीमांसेवर काम केले. हे सर्व काम सुद्धा बुद्ध धर्माच्या प्रभाव काळातीलच आहे.

वेदान्त किंवा उत्तरमीमांसा:
उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, अरण्यके आणि भगवद्गीता यापासून वेदान्त किंवा उत्तरमीमांसा हे दर्शन बनले. उपनिषदांमध्ये जीवनाचे ध्येय, कार्य, साधन, साध्य यावर विविध गोष्टींमधून प्रकाश टाकला आहे. भगवद्गीता सुद्धा एक उपनिषदच आहे.
उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता यांना शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयी म्हटले आहे. आणि या प्रस्थानत्रयी वेदान्ताच्या basic foundation आहेत. केवळ वेद हे प्रमाण न मानता त्याशिवाय ज्या नवीन गोष्टी पुढील काळात मांडण्यात आल्या आहेत, जसे, सांख्य, योग आणि पुढील काळातील उपनिषदे आणि गीता या सर्व गोष्टींना एकत्र करून वेदान्त मांडला गेला.
वेदांताचे अनेक उप-प्रकार आहेत. ते खलील प्रमाणे
१.      अद्वैत वेदान्त गौडपाद
२.      विशिष्टाद्वैत रामानुजाचार्य
३.      द्वैत मध्वाचार्य
४.      द्वैताद्वैत निंबार्काचार्य
५.      अचिन्त्यभेदाभेद चैतन्य महाप्रभू
६.      भेदाभेद
यातील गौडपाद हे शंकराचार्यांचे गुरु होते.

चार्वाक:
चार्वाक दर्शन हे आधी लोकायत किंवा बृहस्पत्य म्हणून ओळखले जायचे. बृहस्पत्य सूत्रे हे ई. पू. ६०० वर्षांपूर्वी लिहिले गेले पण ते आता मूळ स्वरुपात उपलब्ध नाही. चार्वाक दर्शनाचे मूळ हे ऋग्वेदापर्यंत जाते. चार्वाक दर्शन असे मानते की जे प्रत्यक्ष दिसते, अनुभवता येते तेच सत्य आहे. जैन व बुद्ध वाङ्मयात लोकायतामधील सूत्रांचा वापर केलेला आहे. चार्वाकांच्या मते स्वर्ग, नर्क, पुनर्जन्म या निव्वळ कल्पना आहेत. त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. जे जग पृथ्वीवर आहे तेच सत्य आहे कारण ते शोध घेत राहिला तर त्यातील गुंतागुंत ही स्पष्ट होईल. पण कोणत्याच गोष्टी दैवावर ढकलू नयेत. चार्वाकांनी स्वर्ग, नर्क या संकल्पना खूप सोप्या करून सांगितल्या होत्या स्वर्ग म्हणजे असे ठिकाण जे मनुष्य स्वत: निवडतो आणि स्वतंत्रपणे जगतो, तर नर्क म्हणजे पारतंत्र्य. पण चार्वाकांना केवळ ऋणम् कृत्वा घृतम् पिबेतएवढेच मानून अत्यंत त्याज्य ठरविण्यात आले.

शंकराचार्यांनी जे काम केले आहे त्याचे ढोबळमानाने खलील भाग होतात
१.      लेखन:
शंकराचार्यांनी वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, धर्मसूत्रे, योगसूत्रे आणि गीतेवर भाष्य (विवरण) केले. त्याचे अर्थ त्यांनी नव्याने तर्काधारित संगितले.
२.      अद्वैत वेदान्ताला देशभरात मान्यता:
शंकराचार्य अद्वैत वेदान्त सांगत आणि कित्येक लोकांशी चर्चा वादविवाद करून सर्वांना पटवून देत देशभर फिरले. त्यांचा मंडणमिश्र यांच्याशी असलेला वादविवाद प्रसिद्ध आहे.
३.      चार धामांची उभारणी:
या धामांची उभारणी करताना वेदांचे महत्व देशभरात कायम राहील याची काळजी घेतली. सर्व देशाला एका विचारधारेत बांधण्याचा प्रयत्न केला. यामुळे देशभरातील लोक हे एकमेकांशी जोडलेले राहू लागले.
४.      पंचक, वैष्णव आणि शैव यातील दुरावा कमी करणे:
देशभरात अनेक लोक विविध देवांचे भक्त होते. बौद्ध धर्माचा प्रभाव असूनही देव ही संकल्पना लोकांनी त्यागलेली नव्हती. पण एका देवाचे उपासक दुसर्‍याला कनिष्ठ मानीत. हे थांबवण्यासाठी पंचक ही संकल्पना पुढे आली. देवी, शंकर, विष्णू, सूर्य, गणेश यांना पूजणारे लोक विभक्त होते. पण शंकराचार्यांनी सर्व देवांना एका देवघरात आणले. उदा. जर मी देवीचा पूजक असेल तर मध्यभागी देवी आणि चार दिशांना अन्य देव अशी पंचकाची मांडणी केली.
५.      आश्रमाधारित समाजरचना:
बुद्ध धर्माच्या प्रभावामुळे आश्रम व्यवस्था मागे पडत होती. तिची पुनर्स्थापना करून गृहस्थाश्रमाचे महत्व अधोरेखित केले.

हे सगळे त्यांनी केवळ ३२ वर्षे (काही लोक ३९ वर्षे म्हणतात) एवढ्याच आयुष्यात केले. Great! Simply great!!!

शंकराचार्यांच्या काही गोष्टी मला पटत नाहीत. (मी खूप क्षूद्र मनुष्यप्राणी आहे, हे मला माहीत आहे)
१.      भगवद्गीता ही निवृत्तीपर आहे असे सांगणे:
कृष्णाने गीतेमध्ये अगदी स्पष्टपणे हे संगितले आहे की अर्जुना युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे. त्यामुळे तू त्यापासून दूर जाऊ नको. ऊठ आणि युद्ध कर.म्हणजेच तू कर्मापसून निवृत्त होऊ नकोस, तर कर्म करत रहा. कर्मफलापासून निवृत्त हो. पण म्हणजे फळ घेऊ नको असे नाही, तर त्याच्या लोभात राहू नको. कर्म करण्याच्या आधीच फळाचा विचार करू नको. यात कुठेच निवृत्ती सांगितलेली नाही. शिवाय ज्ञान हे कर्माशिवाय पंगू आणि कर्म हे ज्ञानाशिवाय आंधळे आहेअसे संगितले आहे. आणि म्हणून ज्ञानवान होणे अत्यंत आवश्यक आहेच. पण ज्ञानवान झाल्यावर कार्य थांबवणे म्हणजे पांगळे होणे, असेही सांगितले आहे. असे असूनही शंकराचार्यांनी निवृत्ती* ही ज्ञानाची पहिली पायरी सांगितली...
हे मत २०व्या शतकात लोकमान्यांनी बदलले आणि गीतारहस्य लिहून गीता ही प्रवृत्तीपर आहे असे ठाम प्रतिपादन केले. पण मधल्या १० शतकात, आणि त्याही आधी बुद्धधर्माच्या प्रभावकाळात निवृत्ती शिवाय मुक्ती नाही असे असल्याने भारतावर इस्लामी आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी ७०० वर्षे राज्य केले. कारण लोक निवृत्तीला अधिक प्राधान्य देत होते.

२.      बुद्धाला देवत्व देऊन त्यांना अवलंबणे टाळणे
पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे बुद्धांनी हिंदू धर्म हा कृष्णाच्या एक पाऊल पुढे नेला होता. पण कालपरत्वे त्यात चुकीच्या गोष्टी शिरल्या. या गोष्टी दूर करून बुद्ध शिकवण योग्य रीतीने पुढे आणता आली असती. (कदाचित त्यावेळची सामाजिक, राजकीय गरज वेगळी असेल, पण माझे मत हे आहे.) त्याऐवजी बुद्धांना विष्णूचा अवतार ठरविले. एकदा एखाद्या माणसाला देव ठरविले की त्याच्याप्रमाणे किंवा त्याच्या शिकवणी प्रमाणे वागण्याची गरज उरत नाही. इथून पुढे बुद्धमार्ग मागे पडत गेला व भक्ती, निवृत्ती, कर्मकांड, पूजा-अर्चना, यज्ञ** यांना पुन्हा महत्व मिळत गेले.

३.      जगन्मिथ्या म्हणणे
जे धडधडीत समोर दिसते आहे त्याला मिथ्या म्हणून सांगितले. जेव्हा लोकांनी अनेक सभांमध्ये विरोधी मुद्दे मांडले त्यांना ज्ञान नाही असे सांगून हरवले. योग्य ज्ञान मिळाले तर हे पटेल असे सांगितले. जग हे परब्रहमावरचे आवरण आहे आणि ते खोटे आहे, त्यापलिकडे जाऊन तोच बघू शकतो जो ज्ञानवान आहे असे सांगितले. प्रभावी व्यक्तिमत्व, तारुण्य, वक्तृत्व या जोरावर अनेक logical गोष्टींना illogical ठरवून त्यांनी जगन्मिथ्याला भारतभर मान्यता मिळवून दिली. ती आजतागायत आहे.

न पटणार्‍या गोष्टी असूनही मला शंकराचार्यांनी केलेल्या कार्याचा आदर आहे आणि माझ्यामते हेच हिंदुधर्माचे वैशिष्ट्य आहे.

* विठ्ठलपंत कुलकर्णींनी मुलांची नावे निवृत्ती, ज्ञानदेव (ज्ञान मिळवणे), सोपान (मोक्ष मार्ग), मुक्ता (मुक्त होणे, मोक्ष प्राप्ती) अशी ठेवली आहेत.
** कृष्णाने सुद्धा यज्ञाने पाऊस पडत नाही तर पाऊस हा डोंगर आणि झाडे आहेत म्हणून पडतो हे सांगितले होते. त्यामुळे त्याने इंद्राला यज्ञ करून प्रसन्न करण्याची गरज नाही तर गोवर्धन पर्वताची पूजा करा असे सांगितले. अवृष्टी, अल्पवृष्टी वा अतिवृष्टी यापैकी केव्हाही पर्वतच मदत करेल असेही सांगितले. पण त्या गोष्टीला आपण चमत्कार करून टाकले आणि लहानग्या कृष्णाला अख्खा पर्वत उचलायला लावला. विज्ञानावर मात करण्यासाठी माणसाला देवत्व दिले.

पुन्हा एकदा सांगतो की या विषयाचा मी काही अभ्यासक नाही. पण जे काही आजवर वाचन केले आहे त्यावरून जे माझे निष्कर्ष आहेत ते सर्वांसमोर मांडावे वाटले. म्हणून थोडेथोडे वेळ मिळेल तसे लिहीत गेलो.

धन्यवाद!!!


विज्ञान आणि अध्यात्म

विज्ञान जिथे संपते तिथे अध्यात्म सुरू होते, आणि विज्ञानाच्या कक्षा सतत रुंदावत आहेत...

#कुणीसं
दि. ९ जुलै २०१६