Sunday, October 27, 2019

निसर्ग समर्थ आहे

Salt Fat Acid Heat नावाची एक Web Series बघत होतो. त्यात Salt या भागात जपान मधील मिठाचे अनेक प्रकार दाखवत होते. सोया सॉस हा खारट असतो आणि म्हणूनच एक प्रकारचं तेही मीठच. एक जपानी माणूस पारंपरिक पद्धतीने सोया सॉस बनवतो. त्याच्याकडे सुमारे १०० वर्षांपूर्वीची लाकडी भांडी आहेत त्यात तो किण्वन पद्धतीने सोया सॉस मुरू देत तयार करतो. या पद्धतीमध्ये वेळ जास्त लागतो आणि श्रमही जास्त लागतात. या Web Series ची host समीन नुसरत त्याला विचारते की तू हे केवढं काम करतोस... त्यावर तो जपानी हसत म्हणतो - मी फक्त योग्य वातावरण तयार करून देतो. सोया सॉस तर हे सूक्ष्म जिवाणू तयार करतात.

जपानी वननिर्मिती "मियावाकी" पद्धतीत साधारण असेच तत्त्व पाळले जाते. No management is best management. त्या झाडांना त्यांचं त्यांचं वाढू द्या. तुम्ही फक्त पाणी देत रहा. २-३ वर्षांनी त्याचीही गरज नाही. ती झाडं काय ते आपलं आपलं बघतील आणि तुम्हालाही जपतील.

जपान मधील नैसर्गिक शेतीचे प्रणेते फुकुओका सांगतात की तुम्ही जमिनीची मशागत करता वगैरे सगळं झूठ आहे. तुम्ही उगाच जमिनीला त्रास देत असता. नैसर्गिकरित्या जेव्हा बिया जमिनीवर पडतात तेव्हाच तुम्ही त्या जमिनीवर टाका. म्हणजे बाजरी ऑक्टोबर महिन्यात काढणीला येते तर ऑक्टोबरमध्येच त्या बिया पसरून द्या आणि त्यावर त्याच बाजरीचे धांडे पसरून द्या. जून मध्ये त्या बिया आपोआप उगवतील. थोडक्यात निसर्ग त्याचं बघून घेईल आणि तुम्हालाही मिळेल. त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका.

भारतात नैसर्गिक शेती करणारे भास्करराव सावे. त्यांच्याबद्दल मिलिंद बोकिलांच्या 'समुद्रापारचे समाज' मध्ये एक प्रकरण आहे. त्यात बोकील लिहितात -
'नैसर्गिक शेती म्हणजे शेवटी काय आहे? तिचा संदेश अगदी साधा आहे. तो म्हणजे निसर्गाचे ऐका, डोळे उघडे ठेऊन बघा. आपल्याकडे जे अनेक ऋषितुल्य संशोधक या विषयात काम करत आहेत, त्यातलेच एक आहेत डहाणूशेजारच्या उंबरगाव तालुक्यातले भास्करराव सावे. त्याची शेती बघायला गेलो असताना त्यांनी मला एकदम विचारले, "नारळाला म्हणजे शहळ्याला एवढे जाड कवच का असते?" मला त्याचे उत्तर आले नाही. (माणसांचेच वागणे जिथे समजत नाही, तिथे निसर्गाचे गूढ काय समजणार?) सावे म्हणाले, "उत्तर सोपं आहे. कारण नारळाला उंचावरून पडायचे असते. तसा तो पडूनही फुटू नये म्हणून निसर्गाने तशी व्यवस्था केली आहे. तो तुमच्या हातात अलगद पडेल. पण आपण काय करतो? आपण झाडावर चढण्याचा अट्टाहास करतो. त्यात हात, पाय मोडून घेतो. मुख्य म्हणजे स्वत:ला हवे तेव्हा नारळ काढून झाडाचे उत्पादनचक्र बिघडवून टाकतो." साव्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे , की झाडावर चढून जर नारळ काढले नाहीत, तर ते झाड पाच ते सहा पट जास्त उत्पन्न देते. आपण झाडाच्या शेंड्यापर्यंत सरसर चढून नारळ काढून घेऊ शकतो, ही माणसाला आलेली मस्ती आहे. निसर्गाचे सांगणे आहे, की तू खालीच थांब, मी तुला भरभरून देतो. हे समजून घेणे म्हणजेच नैसर्गिक शेती.'

मुळात माणसाला सगळ्या गोष्टींवर नियंत्रण हवे असते. शिवाय "सर्वात आधी मला पाहिजे" ही हाव असते. मग जो हापूस मे अखेरीस किंवा जून मध्ये नैसर्गिकरित्या मिळणार असतो त्यावर केमिकल्स टाकून आम्ही एप्रिलमध्ये खातो. जो कापूस ऑक्टोबर हिट मध्ये चांगला आपोआप फुटणार असतो तो आम्हला सप्टेंबरमध्ये पाहिजे असतो आणि मग त्यावर बोंड अळी येते आणि आम्ही फवारण्या करत उत्पादन खर्च वारेमाप वाढवून ठेवतो. ही नियंत्रणाची आणि "मला आधी पाहिजे"ची हाव संपो आणि बळीचे राज्य येवो!

बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा!!!

Monday, October 21, 2019

अहंकार

अहंकार ही अशी गोष्ट आहे जी, ज्याला शोभून दिसू शकते तो बाळगत नाही, ज्याची कुवत नसते तो सगळीकडे घेऊन फिरतो

Tuesday, October 8, 2019

सहज संवाद

श्यामचे वडील घरी येतात. आई पाट मांडते आणि सगळे जेवायला बसतात. आज आई भाजीत मीठ टाकायला विसरते. वडील काहीच न बोलता सगळं जेवण करतात. वडील तसंच खातात म्हटल्यावर मुलंही काहीच न बोलता जेवण करतात. सर्वांची जेवणं झाल्यावर जेव्हा आई जेवायला बसते तेव्हा तिला भाजीत मीठ नाही हे लक्षात येतं. मग तीही बिना मिठाची भाजी खाते...

ही गोष्ट लहानपणी "श्यामची आई" पुस्तकात वाचल्यावर माझ्या मनात एक प्रश्न आला होता की, भाजीत मीठ नाहीये हे सांगायला श्यामच्या वडिलांना अडचण काय होती. सर्वांच्या ताटात एक एक चिमूट मीठ पडलं असतं आणि सर्वांना सहज चवीचं खायला मिळालं असतं. पण एकूणच यात अनावश्यक त्यागाचे उदात्तीकरण केलंय.

याचे आईवर होणारे परिणाम किती भयानक असू शकतात याचा विचारच केलेला नाहीये. जर आई निगरगट्ट असेल तर काही अडचण नाही. पण ती तशी नाहीये कारण तिनेसुद्धा भाजी बिना मिठाची खाल्ली. आपण जर चूक केली तर तिची शिक्षा असणार नाही पण कुणी काही न बोलता ते सहन करेल आणि चूक सुधारायला आपल्याला जागाच नसेल ही भावना किती भयंकर आहे. मी आपल्या घरात आपल्याच माणसात एक छोटीही चूक करू शकत नाही हे दडपण तिच्यावर पुढे जन्मभर असेल.

आपल्या माणसांत असताना आपण सहज असलो पाहिजे. आपल्यावर "माझ्याकडून एखादी चूक तर होत नाहीये ना" याचं दडपण असू नये. यासाठी सर्वांनी सहज संवाद ठेवला पाहिजे. कुणी एखादी छोटी-मोठी चूक केली तर त्यावर सोपा उपाय शोधला पाहिजे. न बोलता सहन करणंही नको आणि फाडफाड बोलून शिक्षा करणंही नको.

आजच्या दसऱ्याला अबोलतेकडून सहज संवादाकडे आपल्या सर्वांचे सीमोल्लंघन व्हावे या शुभेच्छा!!!

Thursday, September 19, 2019

सूर्यास्त

जेव्हा एखादा सूर्य भर मध्यान्ही
अस्तंगत होतो, पुन्हा न उगवण्यासाठी
तेव्हा त्याच सूर्याचा एखादा ग्रह
अश्रुंचे इंधन करतो,
मनातील आक्रोशाचे रूपांतर आगीत करून
उष्णता-प्रकाश देतो,
सूर्यमालेला विस्कटण्यापासून वाचवण्यासाठी!
त्याचाच पुढे नवा सूर्य होतो...

भाषा पंचायतन

सध्या हिंदी भाषेवरून बराच वाद सुरू झालाय. तो दर वर्षी सामान्यपणे हिंदी दिनाच्या निमित्ताने होतंच असतो. हिंदी दिवसाच्या निमित्ताने पी चिदंबरम सुद्धा हिंदीला राष्ट्रभाषा / एक सामायिक भाषा करण्याबद्दल गृहमंत्री असताना बोलले होते. तेव्हा फार वाद झाला नव्हता. कारण बोलणे आणि करणे या बाबतीत चिदंबरमची पत नाहीये. पण अमित शहा यांची बोलणे आणि करणे यात पत खूपच जास्त आहे. विशेषतः ३७० रद्द केल्यापासून ती अधिक वाढली आहे. त्यामुळे लोकांना मातृभाषा प्रेम / हिंदी भाषिक अन्य भाषांकडे जे दुर्लक्ष करतात आणि शिकण्याबद्दल त्यांची अनास्था यावर बरंच बोलणं झालं. भारतासारख्या प्रचंड मोठ्या आणि अतिप्रचंड विविधता असलेल्या देशात एक भाषा लागू होणे अशक्य आहे. पण म्हणून सामायिक भाषा नसणे हेही त्रासदायकच नाही तर हानीकारकही आहे. कारण केरळ वगळता अन्य दक्षिणी राज्यांमध्ये सरसगट सर्वांना इंग्रजी येत नाही. त्यांना हिंदीही येत नाही. तेव्हा केवळ पर्यटनाला गेलेल्यांची नक्कीच पंचाईत होते. त्यामुळे सामायिक भाषा असावी हे नक्की.

सध्याचे भाजप सरकार अर्थातच हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टी नक्कीच अभ्यासल्या असतील. मी मागे एक पोस्ट टाकली होती, त्यात वाद संपवण्याच्या भारतीय आणि अरबी पद्धतीबद्दल लिहिले होते -
विविध आराध्य देवता (शिव, देवी, गणपती, विष्णू, सूर्य) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा अद्वैतवादी - मूर्तिपूजेची गरज नाही, असं मानणाऱ्या - शंकराचार्यांनी पंचायतन व्यवस्था तयार करून तो वाद संपवला...
विविध आराध्य देवता (अल लात, मनात, अल उज्जा...) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा एकेश्वरवादी मुहम्मद पैगंबर (स) यांनी त्या सर्व (३६०) मूर्त्या तोडून तो वाद संपवला...

आज भाषिक वाद सुरू आहे. तो अरबी पद्धतीने न मिटवता, आदी शंकराचार्यांच्या मार्गाने जाऊन भाषा पंचायतन सुरू करावे. (महाराष्ट्रात अनेक मुलं मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत शिकतातच. इथे बेल्जियम मध्ये माध्यमिक पासून मुलांना डच, फ्रेंच, इंग्रजी, जर्मन आणि स्पॅनिश या भाषा शिकता येऊ शकतात आणि मुलं किमान ४ भाषा शिकतात. त्यामुळे ४-५ भाषा शिकणं खूप अवघड नक्कीच नाही). पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या भागातील एक-एक भाषा आणि मातृभाषा अशी सांगड घालून भाषा पंचायतन सुरू करता येईल. या भाषा प्राथमिक पासून सुरू केल्या पाहिजेत असं अजिबात नाही. या चार भाषा कोणत्या निवडायच्या असा विषय लोकमत घेऊन, लोकसभा-राज्यसभेत मतदान घेऊन किंवा जिथे शंकराचार्यांनी चार मठ स्थापन केले तिथल्या भाषा घेऊन ठरवता येईल. म्हणजे जर शंकराचार्यांचे चार मठ यावरून भाषा ठरवायच्या असतील तर - बद्रीनाथ येथील हिंदी, द्वारकेतील गुजराती, रामेश्वरम येथील तामिळ आणि पुरी येथील उडिया या चार भाषा आणि आपण ज्या राज्यात राहतो तेथील राज्यभाषा. याशिवाय इंग्रजी आहेच. यातून हिंदी भाषिक अन्य भाषा शिकतील. त्यांची मुजोरी कमी होईल आणि भारत भारतीय भाषांनी एकत्र केला जाईल.

Tuesday, July 16, 2019

गंगा माँ मंडल

आपल्याकडे महाराष्ट्रात श्री. अ. दाभोलकर यांनी १० गुंठे शेतीप्रकल्पावर खूप यशस्वी प्रयोग केले आहेत. त्याबद्दल त्यांची अनेक पुस्तकेही आहेत. "विपुलाच सृष्टी" हे त्यापैकी एक. याच प्रकारे अन्य राज्यांमध्येही प्रयोगशील लोक आहेत. मालपाणी ट्रस्ट, मध्यप्रदेश यांनी "गंगा माँ मंडल" नावाचा एक गुंठ्यातील प्रयोग केला आहे. त्याची माहिती देत आहे.

या प्रयोगात मुख्यत्वे लक्षात घेतलेली बाब म्हणजे कोणत्याही साधारण कुटुंबात (४ ते ५ व्यक्ती) सामान्यतः जो पोषक आहार हवा असतो तो सहज भाज्या आणि फळांद्वारा मिळू शकतो. त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी यातून मिळतील. यासाठी १००० चौरस फूट एवढीच जागा लागेल. "गंगा माँ मंडल"मुळे एक कुटुंब विषमुक्त फळ-भाजी आणि घरगुती औषधे यासाठी स्वयंपूर्ण होईल.

याची रचना गोलाकार आहे. यात जाण्यासाठी ७ रस्ते असतील. जेव्हा मंडल पूर्ण होईल तेव्हा रोज सकाळी एका रस्त्याने केंद्रापर्यंत जात पाणी घालायचे (अर्थात कुणाला ठिबक सिंचन करायचे असेल तरी चालेलच). याची रचना अशी असेल की ते पाणी सगळ्या भागात पोहोचेल. पाणी देत असतानाच आपल्याला आवश्यक त्या भाज्या आणि फळे तोडून आणायची. दुसऱ्या दिवशी दुसरा रास्ता आणि नव्या, ताज्या भाज्या फळे तुमच्या जवळ! असं करत सात दिवस सात भाज्या फळे तुम्हाला मिळतील आणि आठव्या दिवशी पुन्हा पहिल्या रस्त्यावरील भाज्या तोडणीयोग्य झालेल्या असतील. हा क्रम अनेक दिवस चालेल. जेव्हा रोपे जुनी होतील तेव्हा ती काढून पुन्हा नवीन लावायची.

गंगा माँ मंडलाच्या केंद्राकडे जातानाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेल असलेल्या फळभाज्या लावतात. बाहेरील सात वाफ्यांमध्ये कांदा, लसूण, मुळा, रताळी आणि बटाट्यासारखी कंदमुळे तसेच टमाटे, भेंडी अश्या फळभाज्या तसेच विशेष म्हणजे अनेक औषधी वनस्पती सुद्धा लावल्या जातात. आतील सात वाफ्यांमध्ये मेथी, मिरची, कोथिंबीर असे मसाले, मूग, तूर, उडीद असे प्रोटिनयुक्त धान्ये लावली जातात. सर्वात आतील गोलात आर्द्रता जास्त असल्याने केळी, पपई लावता येते.

गंगा माँ मंडल बनवण्याची कृती खालीलप्रमाणे (आराखडा चित्रात दिला आहे)
१. जिथे हे करायचे आहे त्या १०००  चौरस फूट जागेच्या केंद्रबिंदूवर खुंटी ठोका. तिथून १५ फूट त्रिज्येचे गोल आखून घ्या. त्यावर राख/चुना घाला म्हणजे ते दिसत राहील.
२. आता दोरीची लांबी हळूहळू कमी करत क्रमाने एक एक गोल आखून घ्या १०.५, ९, ६, ४.५, ३. याही गोलांवर राख घाला.
३. सर्वात बाहेरील गोलांवर १३.५ फुटांवर खुणा करा, सात समान भाग होतील. त्यावरही राख टाकून खुणा स्पष्ट करा.
४. या खुणांपासून केंद्रबिंदूपर्यंत दोरी लावून ४.५ फुटांच्या गोलापर्यंत रेष आखून घ्या. त्या रेषेच्या दोन्ही बाजूंना ९-९ इंच मोजून दीड फुटाची जागा रस्त्यासाठी तयार करा. हा रस्ता बाहेरून आतील ४.५ फूट त्रिज्येच्या गोलापर्यंत जाईल. रस्त्यावर हवे असल्यास दगड/फरशी लावता येईल.
५. असेच सात रस्ते करा.
६. सर्वात आतील ३ फूट गोलात एक दोन फूट खोल खड्डा करा. या खड्ड्यात विघटित व्हायला किमान सहा महिने लागतील (उदा - नारळाच्या काथ्या, तुराट्या, झाडांच्या फांद्या, उसाच्या चिवट्या) असे पदार्थ टाका. त्याच्या वर लवकर विघटित होणारे पदार्थ टाका (उदा: वाळलेली पाने, गवत, कापलेले तण). दर एक दीड महिन्यानंतर यातील खत काढून वाफ्यांमध्ये टाकता येईल.
७. सर्वात आतील खड्डा पूर्ण भरल्यावर त्यावर एक मोठा दगड ठेवता येईल. अंघोळ, कपडे किंवा भांडे धुणे यासाठी तो वापरता येऊ शकेल. याद्वारे ते पाणी वापरात येईल.
८. सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी बांबूचा मंडप करून त्यावर काथ्याची जाळी तयार करून, त्यावर वेल सोडा.
९. रस्ते सोडून जी जागा आहे त्यात खड्डे करून, माती, लवकर विघटित होईल असा कचरा, शक्य असल्यास तांदळाचा किंवा डाळींचा भुसा, शेणखत/गांडूळखत वापरून भुसभुशीत वाफे तयार करा. त्यावर जीवामृत टाका ज्याद्वारे जमिनीतील जीवाणू वाढतील. सर्व वाफे एकमेकांना जोडा, म्हणजे पाणी सगळीकडे जाऊ शकेल.

गंगा माँ मंडल तयार करताना खालील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
१. वेल वर्गीय भाज्यांना खूप जास्त वारं सहन होत नाही. त्यामुळे गंगा माँ मंडल वेगवान वारं नसेल तिथे तयार करावं.
२. इथे जास्तीत जास्त वेळ ऊन असले पाहिजे.
३. प्राण्यांपासून योग्य संरक्षण झाले पाहिजे. त्यामुळे शक्यतो याच्या भोवती कंपाउंड असावे.
४. घरगुती वापरातील खराब पाणी (अंघोळ, कपडे-भांडी धुणे) सहजपणे यात जाऊ शकले पाहिजे. या पाण्यात शक्यतो रसायने जाऊ नयेत. यासाठी साबण वापरावर जरा बंधन येईल.
५. वेलभाज्या या मंडपावरच वाढवाव्यात. रस्त्यात अथवा वाफ्यात नको. म्हणजे भाजीचा दर्जा चांगला राखला जाईल.
६.  गंगा माँ मंडल स्वयंपाकघराजवळ केल्यास तेथील पाणी, जैविक कचरा सहजपणे गंगा माँ मंडलात टाकणे सोपे जाईल.


चित्रातील आराखड्यात दिल्याप्रमाणे तुम्ही भाज्या आणि अन्य वनस्पती लावू शकता. पण तुम्ही ज्या भागात राहता किंवा तुमच्या आवडीनिवडीनुसार यात बदलही करता येईल. या १००० चौरस फुटात सुमारे ४० ते ५० प्रकारच्या वनस्पती लावल्या जात आहेत. या नवीन प्रयोगासाठी शुभेच्छा!

ही सर्व माहिती येथून घेतली आहे
तयारीचा फोटो फेसबुकवरील पोस्ट मधून घेतले आहेत

यातील औषधी वनस्पतींची माहिती खालील दुव्यांवर मिळेल -

Monday, July 8, 2019

मशीन लर्निंग आणि समाजमन

बऱ्याचदा त्र आणि ञ मध्ये खूप लोक गडबड करतात. छत्रपती हा शब्द छञपती असा लिहिला जातो. यावर बऱ्याचदा गमतीदार टीका होते, विनोद होतात पण एकदा वापर करायला सुरुवात झाली की अनेकांनी त्र च्या जागी "कधी चुकून, कधी माहित नाही म्हणून, कधी प्रस्थापिताला विरोध म्हणून आणि कधी मुद्दाम मजा म्हणून" लोकांनी छत्रपती हा शब्द छञपती असा लिहिला. त्याने झालं असं की गूगल इंडिक की-बोर्ड वर जेव्हा आपण छत्रपती हा शब्द लिहितो, तेव्हा छञपती हा शब्द देखील सुचवला जातो. याचं कारण गूगल इंडिक की-बोर्ड हा मशीन लर्निंग इनेबल्ड आहे. म्हणजे जे शब्द टाईप केले जातात ते शब्द तो लक्षात ठेवतो आणि नंतर सुचवतो. अजून तरी जास्त लोक छत्रपती वापरतात. जेव्हा जास्त लोक छञपती वापरतील तेव्हा डिफॉल्ट आपल्याला छञपती शब्द दिसेल.

अगदी असंच समाजमन काम करत असतं. कुणीतरी एखादी चूक करतो. त्याला एकूणच "व्यक्तिगत मत" किंवा "व्यक्तिगत निर्णय" या नावाखाली फारसा विरोध होत नाही. मग तीच, तशीच चूक अजून काही लोक "कधी चुकून, कधी माहित नाही म्हणून, कधी प्रस्थापिताला विरोध म्हणून आणि कधी मुद्दाम मजा म्हणून" करतात. हळूहळू समाजमन त्याला मान्यता द्यायला लागतं. मग मान्यतेनंतर त्याचा गौरव केला जातो, नंतर तेच करणारे श्रेष्ठ असाही प्रचार होतो आणि मग योग्य करणारे लोक हे प्रतिगामी वगैरे होत जातात. त्यामुळे जर चूक असेल तर ती चूक आहे हे दाखवून दिलं पाहिजे आणि ती चूक ग्लोरिफाय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. उगाच "व्यक्तिगत मत" किंवा "व्यक्तिगत निर्णय" वगैरे नावाखाली मान्यता देणे हे समाजमनाचे मशीन लर्निंग असते हे लक्षात ठेवले पाहिजे!