Friday, April 24, 2026

१७७१ : चिंकुर्लीची (मोती तलाव) लढाई - मराठा सामर्थ्य आणि पळपुटे हैदर व टिपू

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिण भारताचे राजकारण तापले होते. एकीकडे मराठा साम्राज्याने पानिपतच्या जखमा भरून काढत पुन्हा उभारी घेतली होती, तर दुसरीकडे मैसूरचा हैदर अली आपल्या महत्त्वाकांक्षेच्या बळावर दक्षिणेत झपाट्याने विस्तार करत होता. यात ६ मार्च १७७१ रोजी झालेली चिंकुर्लीची लढाई हा एक निर्णायक टप्पा ठरला. इतिहासात फारसा चर्चिला न जाणारा, पण मराठा सामर्थ्याची खरी ओळख दाखवणारा.

माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीने मराठा साम्राज्याला नवजीवन दिले होते. त्यांच्या नेतृत्वात सैन्य पुन्हा संघटित झाले, सरदारांमध्ये शिस्त निर्माण झाली आणि मराठा साम्राज्याचा आत्मविश्वास परत आला. हैदर अलीने मराठ्यांशी केलेल्या करारांचे उल्लंघन करून उत्तरेकडील प्रदेशात घुसखोरी सुरू केली तेव्हा माधवरावांनी हे आव्हान स्वीकारले. दक्षिणेकडे मोर्चा वळवताना त्यांचा उद्देश फक्त बदला नव्हता; तो होता मराठा साम्राज्याची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करणे.

मैसूरच्या सीमेजवळील चिंकुर्ली हे गाव त्या काळी रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. आसपासचा प्रदेश सपाट, पण काही ठिकाणी दगडी टेकड्यांनी भरलेला होता. जिथे सैन्य लपवता येऊ शकत होते, अचानक हल्ले करता येऊ शकत होते. हैदर अलीने याच भौगोलिक फायद्याचा उपयोग करून मराठ्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत टिपूही होता. यावेळी टिपू २० वर्षांचा होता.

मराठा सैन्य चिंकुर्लीच्या दिशेने सरकत असताना हैदर अलीने आपल्या फौजा रचल्या, पण त्याला मराठ्यांच्या वेगाचा आणि शिस्तीचा अंदाज आला नव्हता. माधवरावांनी सैन्याची मांडणी इतक्या अचूकतेने केली होती की मैसूरच्या फौजांना प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. मराठ्यांच्या घोडदळाने केलेल्या झंझावाती हल्ल्याने हैदरची पहिली फळी अक्षरशः उडून गेली. तोल सावरायच्या आत दुसरी फळीही ढासळली. लढाई काही तासांतच निर्णायक वळणावर पोहोचली.

हैदर अलीला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव झाली. त्याने तातडीने माघार घेण्याचा निर्णय घेतला. टिपू त्याच्यासोबत होता. दोघांनीही रणांगण सोडून अक्षरशः पळ काढला. ही माघार नियोजनबद्ध नव्हती, तर जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड होती. मराठा सैन्याच्या वेगवान धडाक्यामुळे मैसूरच्या छावणीत गोंधळ माजला. अनेक सैनिक पळाले, काहींनी शस्त्रे टाकली, तर काहींना मराठ्यांनी बंदी बनवले.

याच गोंधळात हैदर कसा वाचला तेही मजेदार आहे. हैदर अलीच्या सैन्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला मराठ्यांनी पकडले. त्याचे रूप, पोशाख आणि त्याच्या आसपास असलेली गडबड पाहून मराठ्यांना क्षणभर वाटले की हा माणूसच हैदर अली असावा. या चुकीच्या ओळखीमुळे मराठ्यांचा पाठलाग काही काळ थांबला. आणि हा काही मिनिटांचा विलंबच हैदर अलीसाठी वरदान ठरला. तो आणि टिपू या दोघांना श्रीरंगपट्टणपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेला वेळ मिळाला.

लढाई संपली तेव्हा रणांगणावर मराठ्यांचा संपूर्ण विजय उभा होता. हैदर अलीची फौज तुटली होती, त्याचे मनोबल खच्ची झाले होते आणि त्याच्या खजिन्यावर प्रचंड ताण आला होता. मराठ्यांनी त्याला शांतता करारासाठी भाग पाडले. या करारात हैदर अलीला तुंगभद्रेच्या उत्तरेतील सर्व प्रदेश परत करावे लागले, तसेच मोठी खंडणी भरावी लागली. इतकी की त्याचा खजिना जवळजवळ रिकामा झाला. हा पराभव हैदरसाठी अत्यंत अपमानास्पद होता.

चिंकुर्लीची लढाई फक्त एक सैनिकी विजय नव्हता; तो मराठा साम्राज्याच्या पुनरुत्थानाचा अजून एक निर्णायक पुरावा होता. पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांची शक्ती संपली असे अनेकांना वाटत होते, पण माधवराव पेशव्यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि नेतृत्वगुणांनी हे सिद्ध केले की मराठा साम्राज्य अजूनही भारतीय उपखंडातील सर्वात प्रभावी शक्ती आहे. हैदरला राघोबादादाने चूक करून जी थोडी मोकळीक दिली होती ती माधवरावांनी दुरुस्त केली. चिंकुर्लीच्या विजयाने दक्षिणेत मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले आणि हैदर अलीसारख्या महत्त्वाकांक्षी शासकाला मर्यादा ओलांडण्याची किंमत काय असते हे दाखवून दिले.

आज या लढाईचा उल्लेख इतिहासाच्या मुख्य प्रवाहात फारसा आढळत नाही. पण ज्यांनी त्या काळातील मराठा–मैसूर संघर्षाचा अभ्यास केला आहे, त्यांना माहीत आहे की चिंकुर्ली हा एक टर्निंग पॉइंट होता. एक अशी लढाई ज्याने मराठ्यांच्या सामर्थ्याला नवा आत्मविश्वास दिला आणि दक्षिणेतील राजकीय समीकरणे बदलून टाकली. या लढाईत रणांगणावर उभा राहून माधवरावांनी दाखवलेली रणनीती, मराठा घोडदळाचा वेग अप्रतिम होता. चिंकुर्लीची लढाई मराठा इतिहासातील एक तेजस्वी अध्याय आहे.

संदर्भ : Tipu Sultan: The Saga of Mysore's Interregnum by Vikram Sampath

२२ प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा हा भारतीय समाजाच्या इतिहासातील एक मोठा टप्पा होता. या प्रतिज्ञांनी नवबौध्द समाजाला "हिंदू" अस्मितेपासून दूर नेलं. आणि आता तर बाकी प्रतिज्ञा न आठवता so called डॉ आंबेडकर अनुयायी केवळ ४-५ प्रतिज्ञा लक्षात ठेवतात. या प्रतिज्ञांमधील मानसिक, नैतिक आणि सामाजिक पुनर्जन्म कुणी लक्षात ठेवत नाही आणि लक्षात घेतही नाही.

या प्रतिज्ञांमध्ये, बुद्धांच्या शिकवणीतील तीन महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणजे पंचशील, अष्टांग मार्ग आणि दहा पारमिता, यांचा थेट समावेश आहे. 

१. पंचशील म्हणजे पाच नैतिक नियम. हे नियम कोणत्याही धर्मापुरते मर्यादित नाहीत; ते सार्वत्रिक मानवी मूल्ये आहेत. अहिंसा, सत्य, संयम, प्रामाणिकपणा आणि व्यसनमुक्ती—ही पाच तत्त्वे व्यक्तीला स्थिर करतात आणि समाजाला सुरक्षित करतात.
- अहिंसा मनातील क्रूरता कमी करते. हिंसा कमी झाली की समाजात भीती कमी होते आणि विश्वास वाढतो.  
- चोरी न करणे म्हणजे इतरांच्या हक्कांचा आदर. यामुळे परस्परांमध्ये सुरक्षितता निर्माण होते.  
- कामवासनेचा दुरुपयोग न करणे हे कुटुंबव्यवस्थेला स्थिर ठेवते.  
- खोटे न बोलणे समाजातील संवादाला पारदर्शकता देते.  
- मद्य व व्यसनांपासून दूर राहणे व्यक्तीचे आरोग्य, विवेक आणि कुटुंबातील शांतता टिकवते.
पंचशील म्हणजे स्वत:वर नियंत्रण ठेवून इतरांच्या कल्याणाचा विचार करणारे जीवन.

२. अष्टांग मार्ग हा बुद्धांनी मानवी जीवनाला दिलेला मार्ग आहे. यात विचार, वाणी, कृती, उपजीविका आणि मनाची शिस्त या सर्वांचा समतोल साधला जातो.
- सम्यक दृष्टि: व्यक्तीला अंधश्रद्धा आणि भीतीपासून मुक्त करते.  
- सम्यक संकल्प: करुणा आणि अहिंसेवर आधारित विचार निर्माण करतो.  
- सम्यक वाणी: कटू, खोटे किंवा हिंसक बोलणे टाळते.  
- सम्यक कर्म: म्हणजे नैतिक आणि समाजहिताचे आचरण.  
- सम्यक उपजीविका: इतरांना हानी न पोहोचवणारा व्यवसाय निवडण्याची प्रेरणा देते.  
- सम्यक प्रयत्न वाईट प्रवृत्ती कमी करून चांगल्या प्रवृत्ती वाढवतो.  
- सम्यक स्मृती: सजगता आणि आत्मपरीक्षण वाढवते.  
- सम्यक समाधी: मनाला स्थिरता आणि शांतता देते.
अष्टांग मार्ग म्हणजे मानसिक आरोग्य, सामाजिक सौहार्द आणि वैयक्तिक प्रगतीचा मार्ग.  

३. दहा पारमिता म्हणजे मानवी गुणांचे सर्वोच्च रूप. या गुणांचा विकास म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला उन्नत करण्याचा मार्ग.
- दान स्वार्थ कमी करते आणि सहकार्य वाढवते.  
- शील नैतिकता आणि विश्वासार्हता वाढवते.  
- नेक्कम्म/नैष्कर्म (त्याग) लोभ कमी करतो.  
- प्रज्ञा विवेक आणि तर्कशक्ती वाढवते.  
- वीर्य सकारात्मक कृती करण्याची ऊर्जा देते.  
- क्षांती/शांती क्षमाशीलता वाढवते.  
- सत्य नातेसंबंधातील विश्वास टिकवते.  
- अधिष्ठान ध्येयपूर्तीची ताकद देते.  
- मेत्ता (मैत्री) सर्व जीवांप्रती मैत्रीभाव निर्माण करते.  
- उपेक्षा (स्थितप्रज्ञता) समत्व आणि मानसिक स्थैर्य देते.
या पारमिता म्हणजे मानवतेचा सर्वोच्च नैतिक आराखडा आहेत.

आज या बौद्ध शिकवणी सोडून विद्रोही प्रतिज्ञांचा वापर केवळ विद्वेषासाठी केला जातोय. त्यामुळे जर कुणी विद्रोही प्रतिज्ञांबद्दल बोलायला लागला की, तिरंगा मधील नाना पाटेकर सारखं म्हणायचं - अगर भगवान बुद्ध की तीन शिक्षाओं का पालन किया हैं तो ही बाकी उन्नीस को हाथ लगाना।

पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता या प्रतिज्ञांतील सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि मानवी मूल्यांचा सार आहेत. त्यांचा अधिकाधिक प्रसार व्हावा.

सर्वांना डॉ आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

Tuesday, January 13, 2026

पानिपतचे परिणाम

१७६०च्या अखेरीस दक्षिण भारतात एक विचित्र आणि निर्णायक घडामोड आकार घेत होती. मैसूरच्या सत्तेवर प्रत्यक्ष ताबा मिळवण्याची हैदर अलीची महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस उघड होत होती. दरबारातील राजकारण आणि हैदरची वाढती सत्ता यामुळे मैसूरचे राजे, त्यांची आई आणि खंडेराव हे पूर्णपणे असहाय्य झाले होते. अखेर त्यांनी मराठ्यांकडे धाव घेतली. दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव प्रचंड होता आणि पेशव्यांच्या सरदारांकडे हैदरला रोखण्याची ताकदही होती. त्यामुळेच त्यांनी मराठ्यांकडे मदतीची विनंती केली.

पेशव्यांच्या दरबारातून विसाजी पंत बिनीवाले, मुरारराव घोरपडे आणि इतर सरदारांची एक सक्षम मोहीम दक्षिणेकडे निघाली. या मोहिमेचा वेग, शिस्त आणि रणनीती इतकी प्रभावी होती की काही दिवसांतच हैदर अली अक्षरशः एका जागी कोंडला गेला. त्याच्या हालचालींवर पूर्ण बंदी आली. त्याच्याकडे सैन्य होते, पण त्याला वापरण्याची संधीच मिळत नव्हती. मराठ्यांच्या वेढ्यातून सुटण्याचा मार्गच उरला नव्हता. परिस्थिती अशी होती की जास्तीत जास्त एक महिना हैदर टिकू शकला असता. त्यानंतर त्याचा पराभव निश्चित होता.

पण इतिहासाला कधी कोणाची प्रतीक्षा नसते. दक्षिणेत मराठ्यांनी विजयाची दारे उघडली असतानाच, उत्तरेत एक प्रचंड वादळ उठले होते ते अहमदशहा अब्दालीचे. अब्दालीच्या आक्रमणाने संपूर्ण हिंदुस्थान हादरले. त्याचा सामना करण्यासाठी मराठ्यांची सर्वात बलाढ्य सेना उत्तर दिशेला निघाली. भाऊसाहेब, विश्वासराव, होळकर, शिंदे… मराठ्यांच्या सामर्थ्याचे हे सर्व आधारस्तंभ उत्तरेत गेले. दक्षिणेतील मोहीम यशाच्या उंबरठ्यावर असताना, उत्तरेतील संकटाने संपूर्ण समीकरण बदलले.

आणि मग उजाडला इतिहासाला मोठी कलाटणी दिवस १४ जानेवारी १७६१. मराठा साम्राज्यावरील संक्रांत. पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा दाखवली, पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळेच पान लिहिले होते.
दो मोती गिरे, दस-बीस अशरफ़ी गंवाई, पैसे का तो कोई हिसाब ही नहीं...
भाऊसाहेब, विश्वासराव, समशेर बहाद्दूर असे अनेक थोर योद्धे त्या दिवशी रणांगणावर कोसळले. पराभव हा शब्द त्या दिवशी किती मोठा असू शकतो, याची जाणीव संपूर्ण देशाला झाली.

या भीषण बातमीने नानासाहेब पेशवे हादरून गेले. त्यांनी तातडीने सर्व मराठा सैन्यांना परतण्याचा आदेश दिला. दक्षिणेकडील मोहीमही त्याला अपवाद नव्हती. बिनीवाले आणि इतर सरदारांना हैदरवरील अंतिम टप्प्यातील कारवाई सोडून परत फिरावे लागले. पराजयाच्या दारात उभा असलेला हैदर अली अचानक मुक्त झाला. मराठ्यांच्या परतीने त्याचा जीव वाचला.

हैदर अलीने या संधीचा फायदा घेतला. खंडेरावला त्याने उघड्या तुरुंगात मरण येईपर्यंत खितपत ठेवले. मैसूरच्या वडियार राजाचे सर्वाधिकार स्वतःकडे घेतले. प्रत्यक्ष राजा नसला तरी सत्तेचा संपूर्ण ताबा त्याच्याकडे गेला. पुढे त्याचा मुलगा टिपू सुलतानही याच सत्तेच्या वारशातून पुढे आला. दक्षिण भारताच्या राजकारणात हैदर आणि टिपू यांनी निर्माण केलेली सत्ता, संघर्ष आणि दडपशाही यांची बीजे याच काळात रोवली गेली.

पानिपतची लढाई ही केवळ उत्तर भारतातील पराभव नव्हती. तिचा परिणाम संपूर्ण देशभर उमटला. मराठेशाही काही वर्षे मागे ढकलली गेलीच, पण त्याचबरोबर दक्षिणेत एक हिंदू राज्यही अप्रत्यक्षपणे संपुष्टात आले. जर पानिपतचा पराभव झाला नसता, तर हैदर अलीचा अंत निश्चित होता. मैसूरच्या राजघराण्याला पुन्हा सत्ता मिळाली असती. दक्षिणेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे वेगळी असती. पण इतिहासाने वेगळा मार्ग निवडला.

या एका लढाईने मराठ्यांच्या सामर्थ्याला तात्पुरती खीळ बसवली, पण त्याहून मोठा परिणाम म्हणजे हैदर अली आणि पुढे टिपू सुलतान यांना मिळालेली संधी. मराठ्यांच्या परतीने वाचलेला हैदर पुढे दक्षिणेतील सर्वात प्रभावी आणि आक्रमक शासकांपैकी एक बनला. आणि हे सर्व घडले एका अशा क्षणी, जेव्हा मराठे विजयाच्या अगदी उंबरठ्यावर होते.

इतिहासातील या घटना वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, कधी कधी एका रणांगणावरील पराभवाचा परिणाम हजारो किलोमीटर दूर घडणाऱ्या राजकारणावर होतो. पानिपतच्या संक्रांतीने उत्तर भारतात मराठ्यांचे काही काळ सामर्थ्य कमी केलेच, पण दक्षिणेतही एका हिंदू राज्याचा अंत घडवून आणला.

संदर्भ - Tipu Sultan: The Saga of Mysore's Interregnum (1760–1799) by Vikram Sampath


Friday, December 5, 2025

मार्तंड वर्मा (पद्मनाभदास) - त्रावणकोर Gods Own Country

भारतातील व्यापारामुळे युरोपीय सत्ता मोठ्या झाल्या आणि भारताशी संबंध बदलल्याने लयाला गेल्या. पोर्तुगीज आणि विजयनगरचे संबंध अतिशय उत्तम होते, त्यामुळे विजयनगरच्या भरभराटीच्या काळात पोर्तुगीजांची भरभराट झाली. पण विजयनगर साम्राज्य बुडाल्यावर पोर्तुगीज सुद्धा मागे पडले. त्याचप्रमाणे अजून एक युरोपीय सत्तेने आधी भरभराट आणि नंतर उतरती कळा पहिली, ती म्हणजे डच! डचांना उतरती कळा लागल्यानेच इंग्रजांना ती पोकळी मिळाली. त्या पोकळीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला.

आपल्याला सागरी सत्ता म्हणून चोल राजा राजेंद्र माहीत असतात. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं आणि कान्होजी आंग्र्यांनी ज्याचा दबदबा निर्माण केला ते मराठा आरमार माहीत असतं. पण ज्या सागरी आणि जमिनीवरील सत्तेने एक परकीय सत्ता केवळ भारतातून नाही तर जगाच्या क्रमवारीत तिला मागे टाकले अश्या त्रावणकोरच्या मार्तंड वर्मांचे नाव क्वचितच माहीत असते...

१८व्या शतकाच्या सुरुवातीला केरळच्या इतिहासात एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व उदयास आले – मार्तंड वर्मा, त्रावणकोरचा राजा. त्यांचा जीवनपट भारतीय किनारपट्टीवरील परकीय वर्चस्व मोडून काढणारा आणि राज्याला धार्मिक व सांस्कृतिक अधिष्ठान देणारा ठरला.  

मार्तंड वर्मा यांचा जन्म १७०६ मध्ये झाला. ते त्रावणकोरच्या राजघराण्यातील होते, पण बालपणातच त्यांना राजकीय संघर्षांचा सामना करावा लागला. स्थानिक सरदार, नायर प्रमुख, आणि परकीय व्यापारी यांच्यातील सत्तास्पर्धा तीव्र होती. या संघर्षातूनच मार्तंड वर्मा यांनी आपली राजकीय बुद्धिमत्ता आणि लढाऊ वृत्ती विकसित केली.  

१७२९ मध्ये ते त्रावणकोरच्या गादीवर बसले. गादीवर बसताच त्यांनी राज्य एकत्र करण्याचे आणि परकीय शक्तींना आव्हान देण्याचे ठरवले. 

त्या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीने मलबार किनाऱ्यावर आपली पकड मजबूत केली होती. मसाल्यांच्या व्यापारावर त्यांचे नियंत्रण होते आणि स्थानिक राजांना ते आपल्या धाकात ठेवत होते. मार्तंड वर्मा यांनी या परकीय शक्तीला आव्हान दिले.  

१७४१ मध्ये कोलाचेलची लढाई झाली – भारतीय तसेच जागतिक इतिहासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा. मार्तंड वर्मा यांच्या सैन्याने डचांना पूर्ण पराभूत केले. ही लढाई विशेष होती कारण युरोपीय शक्तींना भारतीय भूमीवर स्थानिक राजाने निर्णायक पराभव दिला.  

मार्तंड वर्मांच्या या विजयामुळे डचांची भारतीय किनारपट्टीवरील पकड मोडली. मसाल्याच्या व्यापारावर असलेला अग्रहक्क मोडला. डच कमांडर डेलनॉय याला कैद केलं. पण मार्तंड वर्मा त्यांची गुणग्राहकता खूप चांगली होती. या कामंडरला मार्तंड वर्मा यांनी आपल्या सैन्यात सामील केले. डेलनॉयने पुढे त्रावणकोरच्या सैन्याला युरोपीय तंत्रज्ञान दिले आणि किल्ले बांधण्यात मदत केली.  

मार्तंड वर्मा यांनी सैन्याची पुनर्रचना केली. त्यांनी नायर सैनिकांना संघटित केले, युरोपीय शस्त्रास्त्रांचा वापर सुरू केला, आणि किनाऱ्यावर मजबूत किल्ले बांधले.  

- उदयगिरी किल्ला – युरोपीय तंत्रज्ञानाने बांधलेला, तोफखान्याने सज्ज.  

- विझिंजम (विळींझम) बंदर – व्यापार आणि नौदलासाठी महत्त्वाचे केंद्र.  

- पद्मनाभपुरम किल्ला – राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र.  

या किल्ल्यांमुळे त्रावणकोर दक्षिण भारतातील सर्वात सुरक्षित राज्य बनले.  

मार्तंड वर्मा यांचे दुसरे महान कार्य म्हणजे त्यांनी आपले संपूर्ण राज्य भगवान श्री पद्मनाभस्वामींना अर्पण केले. १७५० मध्ये त्यांनी औपचारिकपणे घोषणा केली की त्रावणकोर हे देवाचे राज्य आहे, आणि ते स्वतः व त्यांच्या पुढील पिढ्या केवळ विश्वस्त (पद्मनाभदास) म्हणून राज्य करतील.  यामुळेच केरळला आजही Gods Own Country असं म्हटलं जातं.

ही घटना भारतीय राजकारणात अद्वितीय होती. राजा स्वतःला देवाचा सेवक मानून राज्यकारभार चालवतो, अशी संकल्पना त्रावणकोरमध्ये रुजली. यामुळे राज्याला धार्मिक अधिष्ठान मिळाले आणि लोकांमध्ये एकात्मता निर्माण झाली.  

मार्तंड वर्मा यांनी करव्यवस्था सुधारली, व्यापाराला चालना दिली, आणि शिस्तबद्ध प्रशासन उभारले. त्यांनी जमिनीचे पुनर्वाटप केले, भ्रष्ट सरदारांना रोखले, आणि राज्यात स्थैर्य आणले. त्यांच्या कारकिर्दीत त्रावणकोर हे दक्षिण भारतातील सर्वात स्थिर आणि समृद्ध राज्य बनले. मसाल्यांचा व्यापार सुरक्षित झाला, आणि परकीय शक्तींना त्रावणकोरशी करार करावा लागला.  

१७५८ मध्ये मार्तंड वर्मा यांचे निधन झाले. पण त्यांनी घालून दिलेली परंपरा आजही जिवंत आहे. त्रावणकोरचे वंशज आजही स्वतःला "पद्मनाभदास" म्हणवतात आणि केरळ स्वतःला Gods Own Country म्हणवते.

त्यांच्या विजयामुळे डचांची भारतीय किनारपट्टीवरील पकड संपली. त्यांच्या धार्मिक अर्पणामुळे त्रावणकोरला अद्वितीय ओळख मिळाली. 

म्हणूनच मार्तंड वर्मा यांना आपण भारतीय इतिहासातील एक अद्वितीय राजा म्हणून स्मरले पाहिजे "कोलाचेलचा विजेता आणि पद्मनाभदास."

(संदर्भ : ब्रेव्हहार्टस ऑफ भारत - विक्रम संपत)

Wednesday, December 3, 2025

भाग्यचंद्र: स भूपति:

मणिपूरच्या इतिहासात राजर्षी भाग्यचंद्र हे एक विलक्षण राजे होऊन गेले (संघाचे प्रातःस्मरण - भाग्यचंद्र: स भूपति:). त्यांचा जन्म 1748 मध्ये झाला. त्यांचे जन्मनाव जयसिंह होते. त्या काळी मणिपूरच्या राजघराण्यात एक क्रूर परंपरा होती - राज्याची गादी मिळवण्यासाठी पुढे भावाभावांत भांडणे होऊ नये म्हणून, मोठ्या राणीचा मोठा मुलगा वाचवला जाई, बाकी सर्व मुलांना मारून टाकले जाई. या निर्दयी परंपरेतून भाग्यचंद्र कसे वाचले याची कथा थरारक आहे. ते मोठ्या राणीचे अपत्य नव्हते, त्यामुळे नियमानुसार त्यांचा जीव धोक्यात होता. पण आईने त्यांना दूर पाठवून दिले. ते डोंगरात राहिले आणि त्यांना नवीन नाव मिळाले - चिंग-थांग खोम्बा. त्यांच्याच वडिलांना पुढे जेव्हा ते एका प्रवासात दिसले तेव्हा वडिलांनी स्वतःच्याच मुलाला दत्तक घेतले आणि राजवंशात त्यांचे स्थान सुरक्षित केले. या दत्तकत्वामुळेच पुढे ते गादीवर बसू शकले आणि मणिपूरच्या इतिहासात अमर झाले.  

राज्यारोहणानंतरही त्यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. 1759 मध्ये ते गादीवर आले. त्या काळात ब्रह्मदेशातून या भागावर कायम आक्रमणे होत असत. त्यात त्यांच्या एका भावासोबत गादी दोघांनी मिळून चालवावी असं ठरलेलं होतं. ते व्यवस्थित पार पडलं नाही. यामुळे राज्य कमकुवत झालं आणि ब्रह्मदेशाच्या आक्रमणामुळे त्यांना राज्य सोडावे लागले. ते असामच्या अहोम राजेश्वर सिंहाकडे आश्रयाला गेले. या राजाचे ते खास होते, पण लोकांनी राजाचे कान भरले आणि तिथे त्यांची अतिशय अवघड अशी परीक्षा झाली. राजेश्वर सिंहाने त्यांना एका जंगली हत्तीला निःशस्त्र पकडण्याची अट घातली. भाग्यचंद्रांनी भगवान गोविंदाची प्रार्थना केली आणि अद्भुत धैर्याने हत्तीला वश केले. या घटनेनंतर त्यांनी गोविंदजीची मूर्ती स्थापण्याचा संकल्प केला. पुढे त्यांना स्वप्नात कृष्णाने राज्यात परतायला सांगितलं. त्यानंतर ते माणिपुरात पोहोचले. त्यांचे भाग्य त्यांना कायम पुढे नेत गेले म्हणून त्यांना भाग्यचंद्र हे नाव मिळाले.

मणिपुरात परतल्यावर त्यांनी रासलीला नृत्याची परंपरा सुरू केली, जी आज मणिपुरी शास्त्रीय नृत्याचा आत्मा मानली जाते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वारसा म्हणजे सांस्कृतिक पुनरुत्थान. त्यांनी हिंदू धर्मातील वैष्णव परंपरेला राजधर्म मानले आणि भक्तीभावाचा प्रसार केला. कृष्ण-राधेच्या प्रेमलीलेवर आधारित रासलीला त्यांनी सुरू केली, ज्यामुळे मणिपुरी समाजाला एक नवी सांस्कृतिक ओळख मिळाली. गोविंदजी मंदिर हे त्यांच्या काळात बांधले गेले आणि आजही ते मणिपुरातील धार्मिक जीवनाचे केंद्र आहे.  

राजकीय दृष्ट्या त्यांनी ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड दिले, अहोमांशी मैत्री केली आणि ब्रिटिशांशीही संबंध ठेवले. त्यांच्या राज्यकाळात मणिपुरने आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले. पण त्यांचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राजकारणासोबत अध्यात्माला आणि कलांना समान महत्त्व दिले. म्हणूनच त्यांना राजर्षी म्हटले जाते.  

विक्रम संपत यांनी Bravehearts of Bharat मध्ये त्यांचा उल्लेख केला आहे. विक्रम संपत म्हणतात की भाग्यचंद्र हे केवळ राजा नव्हते, तर संस्कृतीचे रक्षक होते. ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड देताना त्यांनी धैर्य दाखवले, त्याचबरोबर मणिपुरी समाजाला सांस्कृतिक ओळख दिली.  

1799 मध्ये त्यांचे निधन झाले, पण त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. मणिपुरी नृत्याची जागतिक ओळख, गोविंदजी मंदिराचे महत्त्व आणि वैष्णव भक्तीची परंपरा हे सर्व त्यांच्या योगदानामुळे आहे. त्यांचा एका निर्दयी परंपरेतून जीव वाचला, दत्तकत्वामुळे गादी मिळाली, संघर्षातून राज्य टिकवले आणि संस्कृतीला नवा आकार दिला. म्हणूनच राजर्षी भाग्यचंद्र हे मणिपुरच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व ठरतात.  

- ज्ञानेश

Thursday, July 17, 2025

अरण्यानीपासून देवराईपर्यंत — निसर्गसंवर्धनाची भारतीय परंपरा

देवराई भारतात कधीपासून आहे असं शोधताना मला ऋग्वेदातील काही ऋचा इंटरनेटवर सापडल्या. अरण्यानी सूक्तातील या ऋचा आहेत. ते वाचताना आपल्याकडे किती पूर्वीपासून या गोष्टींचा विचार केला आहे याबद्दल खूप अभिमान वाटला : अरण्यानीपासून देवराईपर्यंत — निसर्गसंवर्धनाची भारतीय परंपरा

"अरण्यानीं देव युवतीं नमोभिः पाद्भ्यां न ऊर्णोषि यद्वसानाम्।"  
(ऋग्वेद १०.१४६.१)
— हे अरण्यांची देवी, तुझ्या चरणांना आम्ही वंदन करतो, तू स्वतः जंगलातून फक्त झाडांच्या सावलीनेच वस्त्र परिधान करतेस.

हजारो वर्षांपूर्वी, आपल्या ऋषींनी निसर्गाला दैवत्त्व दिलं. त्यांच्या दृष्टीने जंगल म्हणजे केवळ लाकूड, फळं आणि औषधं देणारा प्रदेश नव्हता—तर तो एक सजीव अस्तित्व होता, ज्यामध्ये सौंदर्य, भय, गूढता आणि करुणा यांचा संगम होता.

अरण्यानी सूक्त: जंगलाची देवता
ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील अरण्यानी सूक्त हे जंगलाच्या देवतेस उद्देशून रचलेलं एक सुंदर स्तवन आहे. यात अरण्यानी ही एक देवी आहे—गावापासून दूर, शांत पण आत्मसंपन्न. तिच्या चालण्याचा सौम्य आवाजही ऋषींना मंत्रमुग्ध करतो.
"क्व स्विदासी कथं न्वस्याऽरं चरन्त्युपरि क्षमाया।"  
ती कुठे असते? कशी फिरते? कोणत्या दिशेने चालते? जंगल तिचं घर आहे, पण तरीही ती अप्राप्य भासत राहते.

या प्रश्नांतून एक गोष्ट स्पष्ट होते—ऋषींना जंगल केवळ उपयोगासाठी नव्हे, तर त्याच्या अस्सल स्वभावासाठी आदरणीय वाटतं. ते त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतात, जिंकायचा नाही.

देवराई हा निसर्गसंवर्धनाचा एक सांस्कृतिक करारच आहे असं वाटतं. वेदकालीन दृष्टिकोनाची प्रात्यक्षिक परिणती आपल्याला दिसते देवराईच्या परंपरेत. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, ओडिशा, झारखंड यांसारख्या राज्यांमध्ये देवाच्या नावाने राखलेलं वन म्हणजे देवराई.

कोणत्याही गावी, एखादी विशिष्ट जागा जिथं कोणतीही झाडं तोडली जात नाहीत, शिकार केली जात नाही, किंवा शेती केली जात नाही—ती पवित्र मानली जाते. याठिकाणी देव, गावजत्रा, नवस आणि श्रद्धा यांचा प्रभाव असतो, पण मूळ हेतू असतो जैवविविधतेचं रक्षण.

भारतीय निसर्गदर्शन — वेद-उपनिषदांपासून लोकसाहित्यापर्यंत निसर्ग सजीव मानला जातो. झाडांच्या देवता, नदीच्या पूजाआरती, अग्नी, वायू, पृथ्वी यांचं देवता रूप—all speak of a worldview that doesn’t conquer nature, but converses with it.

पण आज आपण कुठे आहोत? आजच्या काळात ती संवेदना का हरवलेली?
आज जेव्हा जंगलं कारखान्यांच्या नावाखाली साफ केली जातात, आणि देवराईच्या जागी काँक्रीटची घरे किंवा त्यात मंदिरे उभी राहतात, तेव्हा आपण केवळ झाडं तोडत नाही, तर आपल्या मूळांपासून स्वतःची तोड करत असतो.

अनेक जागांवर देवराई उरली आहे, पण तिचं पालन निष्ठेने होत नाही. नव्या पिढ्यांना या परंपरेची माहितीच नाही. CSR प्रकल्प, शालेय अभ्यासक्रम, कौटुंबिक सहली — या सगळ्यांत देवराईचं स्थान पुन्हा निर्माण करणं आज काळाची गरज आहे.

आपण काय करू शकतो?
१. जागरूकता निर्माण:  आपापल्या गावाजवळ, तालुक्यातील देवराईचा इतिहास, भूगोल, परंपरा जाणून घ्या. ज्येष्ठांच्या आठवणी लिहून ठेवून त्याचं जतन करूया.
२. अनुभवाधारित शिक्षण:  लहान मुलांना या पवित्र जागांमध्ये नेऊन “निसर्गशाळा” चालवा. त्यांना वनस्पती, पक्षी, कीटक ओळखू द्या. श्रद्धा आणि विज्ञान एकत्र वापरा.
३. सांस्कृतिक पुनर्बांधणी: देवराईतील झाडाखाली छोटं देऊळ, वार्षिक पूजा, स्थानिक यज्ञ — हे सगळं "निसर्ग परंपरेचं साक्षात्कार" म्हणून साजरं करा. अर्थात त्यातील निसर्गाला धक्का न लावता
४. सहभागी पद्धतीने संरक्षण: स्थानिक स्वराज संस्था, शाळा, NGO यांच्या सहकार्याने देवराईंचं पुनरुज्जीवन करा. "Joint Custodianship Model" वापरून गावकऱ्यांच्या सहभागाने व्यवस्थापन करा.
५. शाश्वत निती निर्धारणात देवराईचा उल्लेख: गाव विकास योजनांमध्ये देवराईसाठी राखीव निधी ठेवा. “Green Audit” आणि “Ecological Heritage” यांचा भाग म्हणून नोंद घ्या.

अरण्यानी सूक्ताचा संदेश आजही तेवढाच उपयोगी, आवश्यक आहे
"शुभं यदस्यै तन्वे तनूष्वा वा, न तद्याच्छा मृगयन्ति स्म धीरा:।"  
जे काही तिचं शुभ आहे ते तिच्या अस्तित्वातच आहे—ज्ञानी लोक त्यामध्येच सौंदर्य शोधतात.
जंगलात चालणाऱ्या अरण्यानीचं सौंदर्य तिच्या अस्तित्वात आहे, तिच्या निर्लोभी उपस्थितीत आहे. तिला जिंकलं जात नाही, तिला समजून घेतलं जातं.

निसर्ग ही केवळ संपत्ती नाही, ती आपली ओळख आहे. देवराई केवळ एक जागा नाही, ती एक मानसिकता आहे. जंगलाच्या शांततेला जेव्हा श्रद्धेचा स्वर जोडला जातो, तेव्हा ती केवळ जैवविविधता राखत नाही, तर माणसाला माणूसपणाकडे परत नेत असते.
आज जेव्हा हवामान बदल, प्रदूषण, जंगलविकासाचे प्रश्न आपल्यासमोर आहेत—तेव्हा अरण्यानीचं स्मरण आणि देवराईची पुनःस्थापना ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे.

शुभम् भवतु 🙏

Saturday, July 12, 2025

हिंदू महासभा घटना आणि भारतीय राज्यघटना

विक्रम संपत यांचं सावरकर (भाग दोन) वाचताना मला अनेक गोष्टी नव्याने दिसल्या/समजल्या. त्यातील एक म्हणजे राज्यघटना! त्यात हिंदू महासभेच्या १९४४ च्या घटनाप्रस्तावावर सविस्तर लिहिलं आहे. त्यातील अनेक मुद्दे भारतीय राज्यघटनेत सामावलेले आहेत

- हिंदू महासभेचा घटनाप्रस्तावात लोकशाही मूल्ये आणि प्रगत विचार होते.
- एक व्यक्ती, एक मत, विचारस्वातंत्र्य, विज्ञाननिष्ठा, समान नागरी संकल्पना भारतीय राज्यघटनेत पूर्णतः किंवा अंशतः समाविष्ट झाल्या.
- भारतीय राज्यघटनेने हे विचार अधिक समावेशक चौकटीत स्वीकारले.

काही साम्यस्थळे (पूर्ण यादी कदाचित खूप मोठी होईल)
१. एक व्यक्ती, एक मत
- हिंदू महासभेचा कलम: कलम ८  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ३२६  
सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा स्वीकार दोन्ही घटनांमध्ये स्पष्ट आहे. हे तत्त्व भारतीय लोकशाहीचा पाया ठरले.

२. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
- हिंदू महासभा: कलम १२  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद १९(१)(अ)  
दोन्ही घटनांमध्ये नागरिकांना मुक्तपणे बोलण्याचा आणि विचार मांडण्याचा अधिकार दिला आहे.

३. धर्मस्वातंत्र्य (मर्यादांसह)
- हिंदू महासभा: कलम १५  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद २५–२८  
हिंदू महासभेने धर्मांतरावर काही निर्बंध सुचवले होते, तर भारतीय राज्यघटनेत कोणतेही निर्बंध नाहीत. पण धर्मस्वातंत्र्य दोन्हीत मांडलेले आहे. 

४. हिंदी राष्ट्रभाषा म्हणून
- हिंदू महासभा: कलम २०  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ३४३  
हिंदी ही अधिकृत भाषा असावी, हा विचार दोन्ही ठिकाणी आहे. शिवाय दोन्ही ठिकाणी प्रादेशिक भाषांचा सन्मानही राखावा हे म्हटलं आहे.

५. गोरक्षण
- हिंदू महासभा: कलम २८  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ४८ (राज्य धोरणाची तत्वे)  
गोवंश संरक्षणाचा मुद्दा दोन्ही ठिकाणी आहे. भारतीय राज्यघटनेत तो केवळ मार्गदर्शक तत्व म्हणून मांडला आहे.

६. विज्ञाननिष्ठा आणि शिक्षण
- हिंदू महासभा: कलम ३३  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ५१(अ)(ह)  
विज्ञाननिष्ठा आणि विवेकाचा पुरस्कार करण्याचा विचार हिंदू महासभेने १९४६ मध्येच मांडला होता. भारतीय राज्यघटनेत तो १९७६ मध्ये मूलभूत कर्तव्य म्हणून समाविष्ट झाला.

७. वेगळ्या मतदारसंघांना विरोध
- हिंदू महासभा: कलम ४०  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ३२५  
सर्व नागरिकांसाठी एकच मतदार यादी असावी, हा लोकशाहीचा मूलभूत विचार दोन्ही ठिकाणी आहे.

८. समान नागरी कायदा
- हिंदू महासभा: कलम ५५  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ४४ (राज्य धोरणाची तत्वे)  
सर्व नागरिकांसाठी समान कायदा असावा, हा विचार दोन्ही ठिकाणी आहे. दुर्दैवाने भारतीय राज्यघटनेत तो अजूनही केवळ मार्गदर्शक तत्व म्हणून आहे.

९. केंद्रित कार्यकारी सत्ताकेंद्र
- हिंदू महासभा: कलम ७०  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ७४–७५  
केंद्रीय सत्तेला बळकटी देण्याचा विचार दोन्ही घटनांमध्ये आहे.

१०. देशी संस्थानांचा विलीनीकरण
- हिंदू महासभा: कलम ९०  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद १(३)(क)  
संस्थानांना स्वतंत्र दर्जा न देता त्यांचे भारतात विलीनीकरण करणे, हा विचार दोन्ही ठिकाणी स्पष्ट आहे.

हिंदू महासभेचा १९४४ चा घटनाप्रस्तावात लोकशाही मूल्यांचा स्वीकार होता. भारतीय राज्यघटनेने या मूल्यांना अधिक व्यापक, समावेशक चौकटीत स्वीकारले. त्यामुळे या दोन घटनांमधील साम्यस्थळांचा बघितल्यास आपल्याला भारताच्या घटनात्मक विचारांची जडणघडण स्पष्टपणे समजते. (काहींना ती कधीच समजणार नाही)

Monday, April 28, 2025

प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, गीता आणि उपनिषदे 😀

भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात सुरुवातीलाच अर्जुनाच्या मनात मोठा प्रश्न निर्माण होतो. तो श्रीकृष्णाला विचारतो:  
बुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना
मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ।।१।।
मिश्र बोलूनि बुद्धीस जणू मोहात टाकिसी
ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ।।२।।

अर्जुनाला सोपे उत्तर नको, त्याला स्पष्टता हवीये, आणि आधीच्या अध्यायात श्रीकृष्णाने जे सांगितले त्यातील संशय दूर करायचा आहे.  

सहजच विचार करताना असं वाटलं की आजच्या डिजिटल जगात, जेव्हा आपण AI किंवा कोणत्याही ज्ञानस्रोताकडून उत्तर शोधतो, तेव्हा अर्जुनासारखाच प्रश्न विचारण्याची गरज असते!  
कारण योग्य प्रश्न विचारणे म्हणजे अर्धी लढाई जिंकणे.
श्रीकृष्ण अर्जुनाला उत्तर देण्याआधी त्याचा प्रश्न अधिक स्पष्ट करतो. तो सांगतो की ज्ञान आणि कर्म हे दोन्ही आवश्यक आहेत, पण योग्य पद्धतीने विचारल्याशिवाय योग्य उत्तर मिळत नाही.  
आज आपण AI शी संवाद साधताना, किंवा कोणत्याही ज्ञानस्रोताशी विचारविनिमय करताना, जर प्रश्न अस्पष्ट आणि मोघम असेल, तर उत्तरही तसंच मोघम मिळतं.  
उदाहरणार्थ:  
❌ "मला गीतेबद्दल माहिती हवी." - हे खूपच मोघम आहे, शिवाय व्याप्तीही मोठी आहे.  
✅ "गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील कर्मयोगाची संकल्पना सोप्या शब्दात समजावून सांग." - हे स्पष्ट आणि उद्दिष्टपूर्ण आहे.  

जेवढा विचारपूर्वक, मुद्देसूद आणि तपशीलवार प्रश्न विचारला जातो, तेवढेच उत्तर अधिक सखोल आणि उपयुक्त मिळते.  

शोध नक्कीच उत्तरांचा असतो, पण सुरुवात योग्य प्रश्नांनी होते. अर्जुनाने जर फक्त विचारले असते, "मी काय करणं योग्य आहे?" तर त्याला आणि आपल्यालाही गीतेची महान शिकवण मिळालीच नसती. पण त्याने प्रश्न स्पष्ट आणि मुद्देसूद विचारले, म्हणून श्रीकृष्णाने त्याला योग्य मार्गदर्शन दिले.  

आजच्या डिजिटल युगातही हेच लागू होते. AI, तंत्रज्ञान किंवा कोणत्याही ज्ञानस्रोताकडून चांगले उत्तर मिळवायचे असेल, तर प्रश्न अचूक आणि नीट विचारावा लागतो.  

तर मग... प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकताना, शिकवताना आपण गीता, उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानातील प्रश्नांचे संदर्भ घेऊन शिकू/शिकवू शकतो का? काय वाटतं?

Thursday, March 20, 2025

शिवाजी महाराजांचे मोठेपण

शिवाजी महाराजांचे मोठेपण दिसावे म्हणून औरंग्याचं थडगं असलं पाहिजे असं लॉजिक बरेच जण मांडत आहेत. यात हिंदुत्ववादीही आहेत. मुळात महाराज कळण्यासाठी कोण्या खलनायकाची आवश्यकता नाहीच. कुणाच्या रेषेशी महाराजांची रेष ताडून मग महाराज मोठे आहेत हे दाखवण्याची काही एक गरज नाही. On the absolute terms सुद्धा महाराज महान आहेत.

केवळ त्यांचे लोकोपयोगी कामे बघितली तरी हे सहज लक्षात येईल. त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेले राज्य हे स्वराज्य, न्यायप्रिय राज्य आणि लोकहितवादी प्रशासनाचा उत्तम नमुना होते. त्यांचे लोकोपयोगी कार्य समकालीन संदर्भांवर आधारित बघूया.

न्यायव्यवस्था: शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत न्यायव्यवस्थेस प्राधान्य होते. त्यांचे प्रशासन अन्यायाविरुद्ध कठोर आणि पारदर्शक होते. "जेधे शकावली" आणि "शिवभारत" यांमध्ये उल्लेख आहे की महाराजांनी स्थानिक पातळीवर न्यायनिवाड्यासाठी पंचायत प्रथा सुरू केली. त्यांनी हक्कांचे रक्षण करताना निष्पक्षता कायम ठेवली, यामुळे रयतेला नवा विश्वास व आधार मिळाला.

शेती व सिंचनव्यवस्था: महाराजांनी शेती आणि सिंचनाच्या सुधारणांवर भर दिला. "बुधभूषण" या ग्रंथात शेतीसाठी तयार केलेल्या कालव्यांचा उल्लेख आहे. त्यांनी पाण्याच्या व्यवस्थित व्यवस्थापनासाठी तलाव बांधले व जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन केले. जमिनीचा उपयोग योग्य प्रकारे व्हावा व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी त्यांनी जमिनीच्या मोजणीची प्रथा सुरू केली. त्यामुळे शेती उत्पादन वृद्धिंगत होऊन लोकांचे जीवनमान सुधारले.

व्यापाराला प्रोत्साहन: महाराजांनी अंतर्गत आणि परदेशी व्यापाराला प्रोत्साहन दिले. त्यांच्या आरमारी ताफ्याने समुद्रमार्गे व्यापाराच्या संधी निर्माण केल्या. "शिवभारत" ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, महाराजांनी व्यापारी बांधवांना संरक्षण दिले आणि व्यापाराच्या अडचणी दूर केल्या. त्यांनी कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा विकास करून व्यापारी दृष्टिकोनातून राज्याची आर्थिक ताकद वाढवली.

कर नाही तर लोकवर्गणी: "जेधे शकावली" मध्ये असाही उल्लेख आहे की शिवाजी महाराजांच्या राजव्यवस्थेत लोकवर्गणी महत्त्वाची होती. लोकांना कररूपी बोजा न लादता गरजेनुसार वर्गणी मागितली जायची. यातून उभारलेले सगळे संपत्ती व संसाधने लोकांसाठी वापरण्यात आली. यामुळे प्रजेचा शासनावर विश्वास वाढला.

सुरक्षेचे मजबूत जाळे: महाराजांनी गडकोटांच्या माध्यमातून फक्त संरक्षण नव्हे, तर गावांमधील लोकांना आसरा आणि मदत पुरवली. "शिवभारत" ग्रंथात उल्लेख आहे की त्यांच्या गडांच्या योजनांमध्ये पिण्याचे पाणी, अन्नसाठा आणि संकटसमयी संरक्षक उपायांची सोय असायची. गडांवरील प्रबळ व्यवस्थापनामुळे प्रजेचा सुरक्षा व्यवस्थेवर विसंबून राहण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

सांस्कृतिक / धार्मिक वारसा: शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेच्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचा आदर ठेवत ते कायम जपले. "बुधभूषण" मध्ये नमूद आहे की त्यांनी देवस्थानांची काळजी घेतली आणि मुस्लिम वा ख्रिश्चन लोकांकडून होणारे मंदिरांचे विध्वंस थांबले.

केवळ हे कार्य बघितलं तरी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि प्रजा कल्याणाच्या तत्त्वाचा साक्षात्कार आपल्याला होईल. त्यासाठी कुण्या औरंगजेब वा अफझलखानासोबत तुलना करण्याची गरजच नाहीये.

आपण आता मध्ययुगीन व्यवस्थेत नाही. पण औरंगजेबाला मानणारे अजूनही त्याच मध्ययुगीन मानसिक अवस्थेत आहेत. त्यामुळे केवळ "कबर नको" एवढं म्हटलं की थेट संघाच्या मुख्यालयाच्या जवळ सुनियोजित हल्ला केला.

म्हणूनच उत्तर आवश्यक आहे आणि तेही आजच्या कायद्यात. त्यामुळे अफझलखानाचं थडगं ज्याप्रमाणे वनकायद्याने हटवलं त्याचप्रमाणे औरंगजेबाचं थडगं ASI च्या कायद्यात घालून मूळ अवस्थेत तरी नेऊन ठेवलं पाहिजे.

- ज्ञानेश

Tuesday, March 18, 2025

चंद्रहार आणि पीटर व फास्टर फेणे

"आसब्लीफ" vfs च्या बेल्जियम खिडकीतून डॉक्युमेंट्स देताना बनेश उर्फ फास्टर फेणे म्हणाला.

"अरे, खिडकी बेल्जियमची असली तरी हे ऑफिस पुण्यातच आहे!" तो कागदांचा गठ्ठा आपल्या ताब्यात घेत तेथील ऑफिसर म्हणाली.

"ट्टॉक!"

"हा! आता बरं वाटलं बघ"

तर झालं असं की बन्याच्या मामाला बेल्जियममध्ये वर्षभर जायला मिळणार होतं. प्रवास दिवाळीच्या आधीच होता. मालीची सहामाही परीक्षा व्हायची असल्याने माली आणि बन्याने परीक्षा संपल्यावर जायचं असं ठरलं होतं. मग दिवाळी ते नाताळ तिकडेच राहायचं. नाताळच्या सुट्या संपायच्या आत परत यायचं.

यामुळे बन्या आणि माली मामासोबत vfs पुणे ऑफिसात आलेले होते.

"मामा, आपण अर्ध्या वाटेत जातोय. अर्ध्या वाटेत त्याला बोलावू या का?" बन्या म्हणाला.

(वाचा "सिक्रेट सेव्हनच्या सूरपारंब्या आणि फास्टर फेणे")

"पीटर!", माली उद्गारली, "मलाही त्याला आणि जेनेटला भेटायचंय"

"चालेल, तू कळव त्याला" मामाने अनुमती दिली.

घरी पोहोचल्यावर लगेचच बन्याने पीटरला इमेल लिहिला. रात्री उशिरापर्यंत प्लॅन फायनल झालासुद्धा. फक्त जेनेटला यायला जमणार नव्हतं. पीटरसुद्धा नाताळच्या काही दिवस आधी येणार होता आणि नंतर दोन आठवडे राहणार होता.

मामा आणि मामीचा व्हिसा आल्यावर ते दोघे निघाले. पाठोपाठ तीन आठवड्यांनी माली आणि बन्याही. मामाला बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सपासून ३५ किमी अंतरावरील मेकेलीन नावाच्या छोट्या टुमदार गावात काम मिळालं होतं. मेकेलीन कधीकाळी राजधानी राहिलेलं गाव. गावाभोवती तटबंदी. गावातून छोटी दैलं नावाची नदीही गेलेली. त्या नदीच्या पुराने गावाला त्रास होऊ नये म्हणून नदीला एक छानसा बायपाससुद्धा दिलेला होता. या नदीचा पुढच्या मोठ्या नदीसोबत संगम आहे. त्या संगमापासून ब्रुसेल्सकडे एक कालवा काढलेला आहे. त्याच कालव्याच्या काठावर मामाचं घर होतं.

आता थंडी सुरू झाली होती. पण एखादा दिवस मस्त ऊन पडायचं. मामाने बन्या आणि मालीला छान गियरच्या सायकली घेऊन दिल्या. बाहेर ऊन असलं की नदीच्या किंवा कालव्याच्या काठाने भटकणे हा यांचा उद्योग. शिवाय जवळच मोठं पार्क होतं. त्यामुळे भटकंती आणि भटकंती चालू होती.

मामा आणि मामीला तिथे एक मावशी भेटली. म्हणजे ती होती बेल्जियन पण यांची एवढी छान मैत्री झाली की दोघे तिला मावशीच म्हणू लागले. तिचं घर दैलं नदीच्या वरच्या अंगाला रैमनम नावाच्या गावात होतं. एकदा सगळे बसने तिच्या घरी जाऊन आहे. मग तिने नकाशावर सायकलने येण्याचा नदीकाठचा रस्ता दाखवला. तो वळणावळणाचा रस्ता पाहून बन्या फार खुश झाला.

नाताळाच्या आधी आठवडाभर पीटर पोहोचला. आता तिघांची भटकंती सुरू झाली. मामाच्या मित्राने त्यांना एक सायकल काही दिवसांसाठी दिली. तिघे नदीच्या काठाने बऱ्याचदा रैमनम पर्यंत जाऊन आले. आता बन्या, माली आणि पीटरला मेकेलीनच्या २० किमी परिघातले सगळे सायकलचे रस्ते पाठ झाले होते.

मेकेलीनमध्ये एक भलं मोठं कॅथेड्रल आहे. म्हणजे चर्चच, पण खूप मोठं असलेलं. त्यांच्या राजाला त्या चर्चवरून म्हणे चंद्रावर जायचं होतं. त्यामुळे मोठा पाया घेऊन बांधत गेले. शेवटी साडेपाचशे पायऱ्या झाल्यावर राजाने नाद सोडला. त्यामुळे शिखर पूर्ण नसलेलं हे सेंट रॅम्बोस कॅथेड्रल आहे. पण राजाच्या वेडामुळे चंद्र आणि या कॅथेड्रलचा संबंध आला तो अजूनही टिकून आहे.

नाताळच्या एक दिवस आधी, म्हणजे ख्रिसमस इव्हला, कॅथेड्रलमध्ये मोठ्ठा चंद्र लावणार होते. त्याचं वैशिष्ट्य असं की अगदी खऱ्या चंद्रासारखे त्यावर खड्डे, डोंगर असं सगळं असणार होतं. जणूकाही चंद्राचं छोटं रूपच. आणि त्या चंद्राच्या बरोब्बर खाली हिऱ्यांनी सजवलेला चंद्रहार!

हे बघायला अख्खा गाव तिथे पोहोचला. चंद्रामुळे चंद्रहार चमकतोय की चंद्रहारामुळे वरील चंद्र हे कळू नये इतकी ती रचना सुरेख होती. कॅथेड्रलच्या मागच्या गल्लीत सायकली लावून बन्या, पीटर आणि माली कॅथेड्रलमध्ये आले. रात्र झालेली होती. बाहेर थंडीही चांगलीच पडली होती. बन्या नेहमीप्रमाणे इकडेतिकडे बघत होता. अचानक त्याला काळ्या कोटवाला एक माणूस दिसला. त्याने पीटरला खुणेनंच दाखवलं. पीटरलाही काहीतरी गडबड वाटली. माली मात्र चंद्र आणि हाराकडे अनिमिष नेत्रांनी बघत होती.

त्या मोठ्या हॉलमध्ये सुमारे ५०० लोक होते. एका बाजूने आत जाऊन, चंद्राला आणि हाराला गोल चक्कर मारून दुसऱ्या दरवाजाने बाहेर जात होते. बन्या, पीटर आणि माली त्या काळ्या कोटवाल्याच्या जरासे मागे होते. काळ्या कोटाच्या हातात काहीतरी छोटं यंत्र दिसत होतं. बन्याची आता खात्री पटली होती हा नक्की काहीतरी घफलेबाज माणूस आहे. काळ्या कोटाने बाहेर जाण्याच्या दरवाजाजवळ आल्यावर त्या यंत्राचे बटन दाबले. अचानक सगळीकडे अंधार झाला. इतरांना काय झालंय ते कळायच्या आत दरवाज्याजवळ बन्याला काळ्या कोटाची आकृती पळताना दिसली. बन्याने पीटर आणि मालीचा हात धरला आणि तो दरवाज्याकडे पळाला.

तेवढ्यात दिवे परत लागले आणि एकच गोंधळ ऐकू आला. चंद्रहार गायब झाला होता!

एवढ्या वेळात बन्या, पीटर आणि माली त्यांच्या सायकलजवळ पोहोचले होते. काळा कोट त्याच्या इलेक्ट्रिक सायकलवर स्वार होऊन गल्लीतून बाहेर पडत होता. तिघांनीही सायकली काढल्या आणि पाठलाग करायला सुरुवात केली. काळ्या कोटाने त्याची इलेक्ट्रिक सायकल नदीच्या काठाने पळवायला सुरुवात केली. पाठोपाठ बन्या आणि पीटर निघाले होते. हा रस्ता दगडी असल्याने इलेक्ट्रिक सायकलचा वेग फार जास्त नव्हता. पण लवकरच चांगला डांबरी रस्ता सुरू होणार होता. बन्याने जोरात ओरडला, "माले, मामाला सांग की मावशीच्या गावाकडे या" 

मालीला बरोबर कळाले, पण काळ्या कोटाला नेमकं हा काय ओरडला ते कळालं नाही. अजून त्याला आपला पाठलाग सुरू आहे हे ही नीट कळालं नव्हतं.

माली परत फिरली आणि मामाला गाठून सगळं सांगितलं. आता तिथे पोलीस आणि दुभाष्या शोधून त्यांना सांगेपर्यंत १५-२० मिनिटं गेलीच. पोलिसांनी आपल्या सायकली आणि गाड्या भरदाव काढल्या. मामाच्या मित्राच्या गाडीतून मामा, माली निघाले. मामीला आपल्या पराक्रमी भाच्याला घरी आल्यावर घोड्याएवढी भूक लागेल हे माहीत होतं, त्यामुळे ती घरी निघाली.

आता डांबरी रस्ता सुरू झाला होता. काळ्या कोटाचा वेग भन्नाट वाढला. त्याच्या आता पाठलाग लक्षात आला होता. त्यामुळे त्याचा वेग अजूनच वाढला. पण बन्याला पुण्यातल्या गर्दीत बिना गिअरच्या सायकलीला पळवायची सवय होती. इथे गर्दीही नव्हती आणि सायकलला गिअरसुद्धा होते. त्यामुळे तोही फार मागे नव्हताच. तरी फुटाफुटाने काळा कोट आणि बन्यामधील अंतर वाढत चाललं होतं.

आता ते अशा ठिकाणी आले होते की इथून मोठ्या डांबरी रस्त्याकडेही जाता येत होतं आणि नदीकाठचा डांबरी रस्ता संपून कच्चा रस्ता सुरू होत होता. बन्याने मनोमन प्रार्थना केली की काळा कोट सरळ नदीच्याच रस्त्यावर जाऊ दे.

आता त्यांच्यातील अंतर वाढत गेलं होतं. थंडीने बन्याचे हात काकडले होते. पीटरला थंडीची सवय असली तरी ती हातमोजे घालून होती. तोही काकडला होता. डावीकडे असलेल्या डांबरी रस्त्याकडून पोलीसांच्या सायरनचा आवाज आला. बन्याने हुश्श केलं. कारण आता काळ्या कोटाकडे एकच पर्याय होता तो म्हणजे नदीकाठच्या कच्च्या रस्त्याने सायकल पळवणे. आता बन्यालाही जोर चढला. त्याने जोरात सायकल दामटली. एका पुलाजवळ आल्यावर त्याने पीटरला नदीच्या दुसऱ्या बाजूने जायची खूण केली. आता काळा कोट आणि बन्या नदीच्या एका बाजूला आणि पीटर नदीच्या दुसऱ्या बाजूला होते. 

"ट्टॉक"

मावशी आजीच्या घरी चांगल्या चार चकरा सायकलने झालेल्या असल्याने हा रस्ता बन्याला तोंडपाठ झाला होता. इथून पुढे नदीच्या वळणामुळे रस्ताही नागमोडी होता. त्यामुळे इलेक्ट्रिक सायकल काय पार रेसिंगची मोटारसायकल आणली तरी बन्या तिला गाठेल याची त्याला खात्री होती.

अपेक्षेप्रमाणे काळा कोट आणि बन्यामधील अंतर कमी होत होतं. दुसऱ्या बाजूला पीटर अगदी सोबत सायकल चालवत होता. आता ती वेळ आली होती. बन्याने काळ्या कोटाच्या डावीकडे सायकल घातली आणि एक जोरदार मुसंडी मारून त्याने सायकलवरून उडीच मारली. त्याच्या पाठीवरची बॅग धरून बन्या नदीच्या उतारावर घसरला. काळा कोटसुद्धा सायकलसह त्याच्या मागे फरफटत आला. दोघेही नदीत पडले. पीटरने चपळाईने उतारावर झेप घेतली. नदीचं पाणी गोठलेलं नव्हतं पण बर्फापेक्षा जास्त थंड होतं. बन्याने बॅग पीटरकडे फेकली. त्याने ती वर सायकलकडे फेकली आणि बन्याला गार पाण्यातून ओढलं. काळा कोट मागून बन्याला ओढण्याचा प्रयत्न करत होता पण पीटरने जोर लावून एक गुद्दा त्याच्या नाकावर मारला. आधीच थंडी, त्यात पाण्यात भिजलेला असल्याने त्याला तो मार सहन झाला नाही आणि तो कळवळला. पीटर आणि बन्या रस्त्यावर पोहोचले. बन्या पीटरच्या मागे बसला. ते परत फिरले. काळ्या कोटाने पाठलाग सुरू केला, पण तो भिजलेला होता आणि पळत होता. तो मागे पडला.

एव्हाना पोलीससुद्धा तिथवर पोहोचले होते. बन्याने बॅग त्यांच्या स्वाधीन केली. काळ्या कोटाला पोलिसांनी धरलं. पोलिसांच्या गाडीमागे सगळ्या सायकली लावून पीटर व बन्या गाडीत बसले. 

सगळे सोपस्कार होईपर्यंत मामा आणि मालीसुद्धा स्टेशनवर पोहोचले. पोलिसांनी बन्या, पीटर आणि मालीला धन्यवाद दिले. 

घरी जाईपर्यंत बन्या कुडकुडत होता. घरी मामीने मावशी आजीने नव्याने सांगितलेल्या रेसिपीने केलेलं लाल भोपळ्याचं सूप तयार होतं. ते सूप, भाजी, पोळी पोटभर खाऊन सगळे झोपले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच बेल वाजली. मामाने दार उघडलं तर समोर पोलीस. ते म्हणाले, "मेरी ख्रिसमस!"

"ट्टॉक"

त्यांनी सोबत आपल्या तीन वीरांसाठी तीन इलेक्ट्रिक सायकली आणल्या होत्या!!!

Tuesday, December 24, 2024

।।श्रीराम मंदिर, अयोध्या।।

नोव्हेंबर महिन्यात आम्ही अयोध्येत गेलो होतो. प्रभू श्रीरामाचे दर्शन झाले. तिथे कारसेवक पुरम मध्ये योजना चमू (managment team) कडून मंदिराची अचंबित करणारी माहिती मिळाली. ती माहिती आपणा सर्वांसाठी देत आहे 
- ज्ञानेश

।।श्रीराम मंदिर, अयोध्या।।

थोडक्यात पूर्वइतिहास
राम मंदिरासाठी हिंदू समाज गेली ५०० वर्षे लढत होता. पण निर्णायक चळवळ १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाली. १९९०च्या दशका मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बैठकी झाल्या, ज्यामध्ये चळवळ ही केवळ राजकीय नसून सामाजिक असावी असे ठरविण्यात आले. कारण ही जनसामान्यांना आपली चळवळ वाटली पाहिजे. त्यानुसार विश्व हिंदू परिषदेला चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी निवडले गेले.

यात १९८७ ला गंगा यात्रा आयोजित करण्यात आली, त्यानंतर १९८९ ला रामशिला पूजन झाले. लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपापल्या गावांतून राममंदिरासाठी भक्तिभावाने विटा पाठवल्या. १९९० ची अडवाणींची रथ यात्रा एक गेमचेंजर म्हणावी अशी घटना होती. त्याची परिणिती १९९२ ला बाबरी ढाचा पाडण्यात झाली. एक मोठा कलंक हिंदू समाजाने मिटवला. ढाचा पडल्यानंतर, त्याच ढिगावर पूजेसाठी एक तात्पुरता मंच,कापडी तंबू तयार करण्यात आला.

अलाहाबाद न्यायालय २०१० व नंतर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने हिंदू समाजासाठी जमीन निश्चित केली. श्री रामजन्मभूमी न्यास निर्माण केला गेला (फेब्रू २०२०). मंदिराच्या बांधकामाची औपचारिक सुरुवात झाली ती ५ ऑगस्ट २०२० रोजी. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं.

अभियांत्रिकी
इथून पुढे श्रीराम मंदिराचे बांधकाम आणि त्यातील रोचक अभियांत्रिकी गोष्टी आहेत...

अशोकजी सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची रचना दोन मजली केली होती. पण आता जागा पुरेशी मिळाली. २०२१ जानेवारी ते मार्च, रामभक्तांनी भरभरून निधीही जमा केला. त्यामुळे मूळ २ मजली ऐवजी मंदिर ३ मजली, त्यावर शिखर करावे असा प्रस्ताव आला. तो मान्यही झाला.

मंदिराच्या भरभक्कम पायासाठी भारतातील अनेक अभियांत्रिकी संस्था, आयआयटी, NGRI  ह्यांनी मदत केली आहे. बांधकामासाठी तज्ञ संस्था L&T, TCE, Architects आहेत.

मंदिर नागर शैलीतील आर्किटेक्चरमध्ये डिझाइन केले आहे. यात परकोटा महाद्वार, मंदिर सिंहद्वार, नृत्य मंडप, रंग मंडप, कीर्तन मंडप, प्रार्थना मंडप आणि गर्भगृह यांसारख्या अनेक मंडपांचा समावेश आहे. प्रत्येक मंडपातील स्तंभांवर दशावतार, शिवपुराण, भागवत पुराण इ कथांतील मूर्ती चितारल्या आहेत.

तळमजला आणि श्रीरामाची मूर्ती २२ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण झाली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत झाली. त्यानंतर पहिला मजला गेल्या दिवाळी २४ मध्ये पूर्ण झाला. दुसऱ्या मजल्याचं काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजित आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत कधीही प्रोजेक्ट प्लॅनमध्ये कमी अधिक बदल अथवा उशीर झालेला नाहीये !!! 

सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष
श्रीराम मंदिराच्या बांधकामाच्या सुरुवातीला पायासाठी सुमारे ५५-६० फूट खोल खोदकाम केले. या खोदकामात प्राचीन काळातील अनेक मंदिरांचे अवशेष सापडले, ज्यांचा इतिहास इसवी सन पूर्व १३०० पर्यंतचा आहे. याचं कार्बन डेटिंग केलेलं आहे आणि मंदिर कार्यालयात त्याचे सर्व पुरावेही उपलब्ध आहेत. खोदकामादरम्यान, विविध काळातील मंदिरांचे अवशेष पुरातत्व विभाग व रामजन्मभूमी न्यास यांना सापडले आहेत. यामध्ये बाराव्या, सातव्या शतकातील व तत्पूर्वी विक्रमादित्य, तसेच मौर्याच्या काळातील मंदिराचा समावेश आहे. तसेच, याबद्दलचे विविध शिलालेख आणि पुरावे सापडले, ज्यामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख होते.

या शिलालेखांमध्ये त्या काळातील राजे आणि त्यांच्या कार्यांचा उल्लेख आहे. या सर्वांचे एक पुरातत्त्वीय महत्त्व आहे. या शोधामुळे अयोध्येत आजपासून सुमारे ३४०० वर्षांपासून श्रीरामाची पूजा होत होती. अतिशय नीटनेटकी मंदिरेही होती. म्हणजे पुरुषोत्तम श्रीराम आणि त्यांचा इतिहास, म्हणजेच भारतवर्षाचा इतिहास हा किती पुरातन आहे याची कल्पना येऊ शकेल. त्यामुळेच हे अवशेष भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे आहेत.

अर्थात हे पुरावे जगासमोर येतीलच. त्यासाठी जरा वाट बघावी लागेल. कारण आधी मंदिर पूर्ण व्हायचे आहे. या प्राचीन अवशेषांचे जतन आणि प्रदर्शन करण्यासाठी संग्रहालयाची योजना आहे. हे संग्रहालय भविष्यातील पिढ्यांसाठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शिक्षणाचे साधन ठरतील.

श्रीराम मंदिराचे तंत्रज्ञान
५५-६० फूट खोल खोदल्यानंतर हा सगळा खड्डा भरला. त्यावर ३ मजली दगडी मंदिर (३७०' लांब, २७०' रुंद, १६१' उंच) उभं राहणार, ते किमान १००० वर्षे टिकलं पाहिजे. त्यामुळे पायाभरणीमध्ये ग्रॅनाइट आणि विशेष काँक्रीटचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. मंदिराच्या दीर्घायुष्यासाठी दगडांना इंटरलॉक करण्यासारख्या विशेष तंत्रांचा वापर करण्यात आला. त्यावर ग्रॅनाइटचे दगड ठेवले आहेत. पायाभरणीसाठी एकूण १७,५०० ग्रॅनाइट दगड वापरण्यात आले. यावरून पायाच्या वजनाचा आणि मजबुतीचा अंदाज येऊ शकेल. 

तांबडे दगड स्थिर राहावेत आणि अनेक वर्षे टिकावेत म्हणून तांब्याच्या क्लिप्सचा वापर करून इंटरलॉक केले आहेत. त्यानंतर काँक्रीटचे ४८ थर आहेत. प्रत्येकी १ फूट जाड, त्यांना २० टन रोलरने कॉम्पॅक्ट केले गेले. यानंतर १० फूट जाड विशेष काँक्रीटचा दुसरा थर टाकण्यात आला. यावर ३५ फूट जाड काँक्रीटचा तिसरा थर टाकण्यात आला. ग्रॅनाइट दगड पिन-लॉक प्रणालीचा वापर करून इंटरलॉक केले आहेत. नवीन तंत्रज्ञान वापरलं गेलं. बांधकामात वापरलेल्या प्रत्येक दगडाला टॅग केले जाते. यामुळे दगडांचे अचूक ट्रॅकिंग आणि व्यवस्थापन शक्य होते, ज्यामुळे प्रत्येक तुकडा योग्यरित्या ठेवला जातो.

पुरातन नागर शैली, अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा अनोखा संगम या मंदिरात आपल्याला पाहायला मिळतो ❤️

मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर यापुढील काळात श्री वाल्मिकी रामायणातील प्रसंग व मूर्ती, तसेच ब्राँझ म्युरल्स होतील.

हे मंदिर आपला सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. हे लाखो भक्त आणि पर्यटक आजही इथे येतात. रोज जवळपास १ लाख भक्त मंदिराला भेट देतात. दैनंदिन सुगम दर्शन पास आणि आरतीचे पास वेबसाईट वर उपलब्ध आहेत. फक्त वेळेत बुकिंग केलं गेलं पाहिजे. 

आपण आश्चर्यचकित व्हावं अशा अजूनही अनेक गोष्टी आहेत. श्रीरामाची कृपा आपणा सर्वांवर व्हावी आणि लवकरात लवकर सर्वांना दर्शन व्हावे अशी प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना 🙏

।। जय श्रीराम ।।

Monday, December 9, 2024

संविधान आणि सावरकर

भारताच्या संविधानातील सावरकरांच्या विचारांचे प्रतिबिंब स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिक नव्हते तर ते प्रखर सामाज सुधारक आणि विचारवंत होते. त्यांच्या विचारांनी आधुनिक भारतावर सखोल परिणाम केले आहेत. सावरकरांचे जातिवादाच्या संदर्भात आणि समाजातील विज्ञान आणि विवेकवादाच्या भूमिकेच्या संदर्भात, सामाजिक सुधारणांचे लेखन आणि कार्यसुद्धा सर्वश्रुत आहे. या समस्यांवरील त्यांचे प्रगत विचार त्यांच्या लेखन आणि भाषणांपुरते मर्यादित नाहीत तर त्यांच्या स्वतःच्या आचरणात होते. तेच विचार भारतीय संविधानामध्येही प्रतिबिंबित होतात. 

 १. जातिसंस्थेच्या निर्मूलनाबाबत सावरकरांचे विचार (जात्युच्छेदक विचार): सावरकर जातिसंस्थेचे प्रखर टीकाकार होते. जातिव्यवस्थेला ते सामाजिक ऐक्य आणि प्रगतीसाठी मोठा अडथळा मानत होते. जातीभेद विरहित समाजाचे त्यांनी स्वप्न पाहिले होते. व्यक्तींना त्यांच्या जन्माऐवजी त्यांच्या गुणांनी आणि कृतीने बघितले पाहिजे. हा दृष्टिकोन भारतीय संविधानाच्या सामाजिक न्याय आणि समानतेच्या वचनबद्धतेमध्ये येतो. संविधानाच्या कलम 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करण्याला स्पष्टपणे बंदी घालण्यात आली आहे. या तरतुदीचे उद्दिष्ट असे आहे की प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक दिली जावी आणि त्यांच्या जातीचा विचार न करता समान संधी दिली जावी. याशिवाय, कलम 17 अस्पृश्यता नष्ट करते, जो जातिनिहाय भेदभावाचा थेट परिणाम होता. अस्पृश्यता हा एक शिक्षेने दंडनीय अपराध बनवून, संविधान जातिव्यवस्थेच्या सर्वात घातक पैलूंपैकी एकावर ठाम भूमिका घेतं. सावरकरांच्या जातीभेद निर्मूलनाची पूर्तता संविधानामध्ये अन्य विशेष तरतुदींमध्ये देखील आढळते. कलम 15(4) आणि 16(4) राज्याला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदी करण्याची शक्ती देते. या तरतुदी जातिव्यवस्थेमुळे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना संधी उपलब्ध करून देतात.
 
२. विज्ञान आणि विवेकवादावर भर: सावरकर हे वैज्ञानिक विचार आणि विवेकवादाचे समर्थक होते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि अंधविश्वासावर मात करून वैज्ञानिक तत्त्वे स्वीकारूनच प्रगती साध्य होऊ शकते असे प्रतिपादिले आहे. यावर त्यांचे अनेक निबंध आहेत. विज्ञान आणि विवेकवादाच्या भूमिकेवर भर देणारे विचार संविधानाच्या प्रस्तावनेत आणि विविध तरतुदींमध्ये दिसून येतात. भारतीय संविधानाची प्रस्तावना भारताला "सार्वभौम लोकशाही गणराज्य" म्हणून घोषित करते आणि सर्व नागरिकांसाठी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची हमी देते. संविधानानुसार राज्यकारभार हा धर्माधारित नसून पूर्णपणे तर्कसंगत आणि वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असल्याची असणं अपेक्षित आहे. कलम 51a(8) मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचे वर्णन करताना, स्पष्टपणे नमूद केले आहे की प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे "वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे." ही तरतूद सावरकरांच्या सामाजिक दृष्टिकोनाला परिपूर्ण करते. संविधान वैज्ञानिक वृत्तीस मूलभूत कर्तव्य म्हणून प्रोत्साहन देते. नागरिकांना समस्यांचे समाधान करण्याच्या आणि कोणतेही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत तर्कसंगत दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रोत्साहित करते, यामुळे प्रगतीशील आणि प्रबुद्ध समाजाची निर्मिती होते.

३. शिक्षण आणि सामाजिक सुधारणा: सावरकरांचे मत होते की शिक्षण हे सामाजिक सुधारणा आणि जातीआधारित पूर्वग्रह निर्मूलनाचे एक प्रमुख साधन आहे. शैक्षणिक संधी सर्वांसाठी उपलब्ध केल्या पाहिजेत, जनतेची जात किंवा सामाजिक पार्श्वभूमी विचारात न घेता सर्वांना शिक्षण उपलब्ध असलं पाहिजे. भारतीय संविधान हे मत शैक्षणिक अधिकारांच्या तरतुदींमध्ये प्रतिबिंबित करते. कलम 21A सर्व मुलांना सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिकार देतो. या तरतुदीचे उद्दिष्ट हे आहे की प्रत्येक मूल, त्यांच्या सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी विचारात न घेता, शिक्षण घेऊ शकते. यामुळे एक सुशिक्षित समाज तयार होईल. याशिवाय, कलम 29 आणि 30 अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारांचे संरक्षण करते. या तरतुदी सुनिश्चित करतात की अल्पसंख्याक समुदायांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि व्यवस्थापनाचा अधिकार आहे. ही समावेशकता सावरकरांच्या शिक्षणाची आणि विवेकवादाची संस्कृती बाळगणाऱ्या समाजाची दृष्टिकोनाची पूर्तता करते. अर्थात यात आधुनिक शिक्षणही दिले जावे ही सावरकरांची अपेक्षा होतीच.

४. सामाजिक न्याय आणि आर्थिक सुधारणा: सावरकरांचे सामाजिक न्याय आणि आर्थिक सुधारणा यावरचे विचार संविधानाच्या तरतुदींमध्ये देखील प्रतिबिंबित होतात जे मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी बनवण्यात आलेल्या आहेत. कलम 38 राज्याला लोककल्याणासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्याचे निर्देश देते. ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय न्याय सर्व समाजघटकांना मिळावा हे अपेक्षित आहे. हे राज्य धोरणाचे निदेशक तत्व सावरकरांच्या न्याय आणि समानतेच्या समाजाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. कलम 46 राज्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि इतर मागास वर्गांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितांचा प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांचे सामाजिक अन्याय आणि शोषणापासून संरक्षण करण्याचे निर्देश देते. प्रत्येक व्यक्तीला, व्यक्तीची जात किंवा आर्थिक स्थिती विचारात न घेता, प्रगती करण्याची संधी आहे.

५. प्रशासनामध्ये धर्मनिरपेक्षता आणि विवेकवाद: सावरकरांचे प्रशासनामध्ये धर्मनिरपेक्षता आणि विवेकवादाचे महत्व संविधानाच्या धार्मिक आणि राज्यामध्ये वेगळेपणा दाखवण्याच्या दृष्टिकोनामध्ये स्पष्ट दिसते. संविधानानुसार सर्व नागरिकांना त्यांच्या धर्माचे अनुसरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. कलम 25 विवेकाचा स्वातंत्र्य आणि धर्माचे स्वतंत्रपणे अनुसरण, प्रचार, आणि प्रचार करण्याचा अधिकार सुनिश्चित करतो. तथापि, हा अधिकार सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, आणि आरोग्य यांच्या अधीन आहे. हे संतुलन धार्मिक आचरण इतरांच्या अधिकारांना बाधा आणत नाही किंवा सामाजिक समरसतेला व्यत्यय आणत नाही हेही बघते. कलम 26 प्रत्येक धार्मिक समुदायाला धार्मिक बाबींच्या व्यवस्थापनाचा अधिकार देतो. ही तरतूद धार्मिक समुदायांच्या स्वायत्ततेचा आदर करते, तसेच राज्याला धर्मनिरपेक्ष बनवते. धर्माचे स्वातंत्र्य आणि राज्यामध्ये धर्मापासून वेगळेपण हे स्पष्ट करून, संविधान सावरकरांच्या तर्कसंगत आणि धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जात्युच्छेदक आणि विज्ञानावर, विवेकवादावर भर देणारे विचार भारतीय संविधानाच्या प्रत्येक पैलूमध्ये खोलवर आहेत. समता, सामाजिक न्याय, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि धर्मनिरपेक्षता यांच्या विविध तरतुदींमधून संविधान सावरकरांच्या प्रगतीशील आणि सर्वसमावेशी समाजाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. भेदभाव निर्मूलन आणि तर्कसंगत विचारांना प्रोत्साहन देऊन, संविधान न्यायाधिष्ठित आणि समानताधारित समाजाच्या निर्मितीचे प्रयत्न करते. 

आता पुढील काही कोणता मुद्दा नाही, त्यामुळे क्रमांक देत नाहीये. सावरकरांनी संविधानकर्त्या डॉ आंबेडकरांना दिलेली वागणूक, दिलेला मान, अनेक लेखांमध्ये त्यांचा आदराने केलेला उल्लेख, जातीभेदविरहित समाज निर्मितीसाठी केलेले प्रयत्न एका बाजूला आणि डॉ आंबेडकर निवडणूक हरावेत म्हणून नेहरूंनी केलेले प्रयत्न, वर्णव्यवस्था कायम असावी यासाठी गांधीजींनी लिहिलेले अनेक लेख दुसऱ्या बाजूला. पण एवढं वाचेल कोण. त्यापेक्षा कोरं संविधान फडकवत सावरकरांना शिव्या देणं खूप सोप्पंय!

Thursday, July 25, 2024

पुस्तक परिचय - विनाशपर्व

 इंग्रज अतिशय म्हणजे अतिशय कायदेप्रिय होते. त्यांनी एकूणएक गोष्ट कायद्याच्या चौकटीत केली.
- भारतीय नौका उत्तम दर्जाच्या असल्याने त्यांनी भारतीय नौकांच्या वापराच्या विरोधात कायदा करून नौकानयन उद्योग बंद पाडला.
- भारतीय विणकारांचे अंगठे छाटणे ही सामान्य आणि कायद्याच्या चौकटीत बसणारी बाब असल्याने ती अमलात आणून विणकर उद्योगाला बंद केलं.
- जनसामान्य आरोग्य, सहज हाती असलेले उपाय करणारी मंडळी, वैदू, लसीकरण करणारे ब्राह्मण-माळी यांना तर सरळ सरळ कायद्याच्या चौकटीतून गुन्हेगार घोषित केलं. मग इंग्रजी औषधे आणि लसीकरण यांना मोकळं रान उपलब्ध करून दिलं.
- भारतातील अनेक भागात ८०% हून अधिक असलेली साक्षरता ही गावातील शाळांमुळे होती. ब्राह्मण विद्यार्थीसंख्या ११% ते ३०% असायची. म्हणजे बाकी ७०%-८९% ब्राह्मण नसलेले विद्यार्थी होते. ही सगळी आकडेवारी इंग्रजांच्याच सर्वेक्षणात आहे. शाळेला गावातील जमीन उपलब्ध होती आणि त्यातून शाळेचा खर्च भागत असे. या जमिनी कायद्याने सरकारने घेतल्या. स्थानिक भाषांमधून शिक्षण घेतलेले लोक हे अशिक्षित आहेत हेही घोषित केलं. केवळ इंग्रजी शिक्षण म्हणजेच शिक्षण हे लोकांवर ठसवलं. मग शाळा आपोआप बंद पडल्या. इंग्रज जाताना साक्षरता होती ३%. 
- दुष्काळ असो वा नसो महसूल हा कायद्याने मिळालाच पाहिजे. त्यातून कोट्यवधी लोक मेले तरी पर्वा नाही. कायदा महत्वाचा. इंग्रजांच्या राज्यात ३ कोटी सामान्यजन अशा दुष्काळात मेले. पण ते मरण्यात कोणताही कायदा आड येत नव्हता.
- इंग्रजांनी केलेल्या लूटीतून तर त्यांची कायद्याप्रती असलेली निष्ठा दिसते. जिथे लूट करायची असेल आणि जी लूट करायची असेल त्यासाठी योग्य असेच कायदे निवडले जायचे. नसतील तर तयार केले जायचे आणि मग लूट सुरू व्हायची. अगदी कायद्याने!
असं सगळं काही कायद्याने सुरू होतं. पण वायुसेना, नौसेना आणि थलसेना यांना सुभाषचंद्र बोस आपले (मृत घोषित असले तरीही) नेते वाटायला लागले. आझाद हिंद सेना ही आपली सेना वाटू लागली. त्यामुळे ज्या जीवावर आपण शासन करू शकतो ती सेनाच हाताबाहेर जाईल याची इंग्रजांना खात्री पटली आणि इंग्रजांनी जवळपास एक वर्ष आधीच भारताला अजून एक कायदा करून स्वातंत्र्य दिलं.
असं हे सगळं कायद्याच्या चौकटीत असलेलं इंग्रजांचं शासन संपलं!!!

हे कुठे वाचायचंय - प्रशांत पोळ काकांच्या "विनाशपर्व" या पुस्तकात! नक्की आवर्जून वाचावं असं पुस्तक 🙏

- ज्ञानेश

Friday, June 30, 2023

राजी २

बॉलिवूड उत्तम कथा सादर करताना माती खातात. अशीच एक उत्तम कथा, तीही सत्य घटना - सेहमत खान! त्यावरील पुस्तक Calling Sehmat आणि चित्रपट राज़ी.

जेव्हा मी सिनेमा बघितला तेव्हा मला तो खूप आवडला होता (त्यावर मी लिहिलंही होतं, http://dnyanamhane.blogspot.com/2018/06/blog-post.html?m=1) रजित कपूर, जयदीप अहलावत, विकी कौशल आणि अर्थातच आलिया भट. सर्वांनी उत्तम कामे केली होती. पण अशात Calling Sehmat वाचलं. त्यानंतर मेघना गुलजारने नेमकी कुठं माती खाल्ली ते ठळक दिसून आलं. कथा जवळपास जशीच्या तशी दाखवली होती. सेहमतच्या आयुष्यातील पाहिलं प्रेम गाळलं होतं. ते एकूण वेळ कमी असल्याने गाळलं असेल असं वाटलं. त्याबद्दल फार काही चुकीचं आहे असंही वाटलं नाही. तिच्या हिंदू आई आणि वडिलांचं प्रेमप्रकरण सुद्धा महत्वाचं वाटलं नाही.

पुढे ती लग्न होऊन पाकिस्तानात जाते आणि तिथे जी हेरगिरी करते ते मात्र अगदी जसंच्या तसं सिनेमात पण दाखवलं आहे. एकच बाब जरा बदलली ती म्हणजे सेहमतचा नवरा इकबाल हा मूळ कथेत फार काही हुशार नाहीये, इथे तो मूळ कथेपेक्षा जास्त हुशार दाखवला आहे. पण तेवढंच. 

सगळ्यात जास्त कथेला धक्का दिला तो शेवटच्या सीन मध्ये (ज्यावर बरेच मीम सुद्धा तयार झाले). सेहमत शेवटी मीर (जयदीप) आणि अन्य भारतीय हेर ज्या घरात आहेत तिथे जाते. मूळ कथेत सेहमत इथे अजिबात कोसळत नाही. तिला स्वतःच्या कामगिरीचा अभिमान वाटत असतो. या सगळ्यात तिला अब्दुल आणि तिच्या दिराला मारावं लागलं आणि शेवटी इकबालसुद्धा मेला याचं तिला कुठेतरी वाईट वाटलेलं असतं, मात्र देशहितासाठी ते आवश्यक होतं हे तिला अगदी पटलेलं असतं. मात्र घरी परत आल्यावर तिला ते दुःख छळू लागतं. त्यानंतर ती अब्दुलच्या मूळ गावी घर घेऊन तिथे राहू लागते. तिला मूल होतं. पण तरीही ती त्या दुःखातून बाहेर येऊ शकत नाही. ते मूल तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर सांभाळतो. नंतर अचानक एक फकीर त्या गावात येतो. तिचं दुःख समजावून घेतो. तिला कृष्णभक्तीमध्ये रममाण करतो. तिची आई मूळ हिंदू आणि कृष्णभक्त असल्याने या सगळ्यात सहजपणे सोबत असतेच. तो फकीर तिला उपनिषदांवर प्रवचने देतो. त्यांच्या घरात कृष्णभक्ती नांदू लागते. घर जवळपास मंदिरच होतं. नंतर हळूहळू सेहमत त्या दुःखातून बाहेर येते.

आता हा कथाभाग मोठा आहे. सव्वादोन तासात किती आणि काय दाखवणार... अगदी बरोबर. हे दाखवणं शक्य नव्हतं तर ज्या क्षणी सेहमत कोसळली नाही त्या क्षणी तिला कोसळलेली दाखवणं हे तिच्यावर अन्यायकारक होतं. तिला ज्यावेळी स्वतःच्या कामगिरीवर अभिमान वाटत होता तिथे मेघना गुलजारने तिला कोसळलेली दाखवून देशहिताला essential evil करून टाकलं. अब्दुल, सेहमतचा दीर आणि नवरा यांना बिचारं केलं. भारतीय गुप्तचर यंत्रणेला गुन्हेगार बनवलं. एकूणच सिनेमात आलिया भट्टने अप्रतिम काम केलंय आणि हा सीन तर तिने जबरदस्त दिलाय. त्याचा impact खोल रुतून बसतो. ज्यामुळे देशहित essential evil असतं हे मनावर बिंबवलं जातं. आणि इथेच मेघना गुलजारने भयंकर माती खाल्ली आहे!

Friday, July 29, 2022

धुरंधर - नानासाहेब पेशवे!

 आपल्या पाठ्यपुस्तकांनी मोगल इतिहास भरभरून सांगितला. शिवरायांचा इतिहास मोडून सांगितला. पुढे संभाजी महाराज ते दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांपुढे हार मानली हा कालखंड पूर्ण वगळला. मग हा इतिहास आपल्यापुढे अनेक इतिहासकारांनी तर मांडलाच पण कादंबरी रूपात लेखकांनी तो सोपा करून आपल्यापुढे आणला. त्यात छावा, राऊ, पानिपत आणि स्वामी ही पुस्तके विशेष गाजली. 
शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अंगार चेतवला, त्याचा वणवा केला बाजीरावांनी. त्यात मोगल पूर्ण भरडले गेले. पण दुर्दैवाने बाजीराव वयाच्या चाळीसाव्या वर्षी निवर्तले. नंतर नानासाहेबांनी पेशवाई सांभाळली, पण त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दोन वर्षात पानिपत झालं. तरीही पुढे माधवरावांच्या कारकिर्दीत केवळ दहा वर्षांत संबंध भारतभर मराठेशाही नांदू लागली. आजोबा बाजीराव आणि नातू माधवराव यांचं कार्य अतुलनीय होतं. त्या कार्याला सामान्यांच्या मनात पोहोचवलं राऊ आणि स्वामी या दोन कादंबऱ्यांनी. पण या दोघांच्या मधला वीस वर्षांचा कालखंड कुणी कादंबरी रूपात कधी मांडला नव्हता. ते काम तरूण इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे याने केलं आहे.
कौस्तुभचं हे पुस्तक जाहीर झालं आणि लगेच मागवलं. पण माझ्या हाती येऊन वाचून पूर्ण व्हायला जरा वेळ लागला.
अगदी खरं सांगतो - मला नानासाहेब हे याआधी केवळ पानिपत पुरते ठाऊक होते. त्यातही त्यांनी पानिपतच्या धामधुमीत केवळ ९ वर्षांच्या मुलीशी लग्न केलं आणि गोविंदपंत बुंदेल्यांना नाटकशाळा पाठवा म्हणून पत्र पाठवलं (दोन्ही गोष्टी पानिपत कादंबरीत वाचल्या) एवढं माहित होतं. याशिवाय त्यांनी कसं मराठा आरमार बुडवलं वगैरे गोष्टी ऐकीव माहित होत्या. पण त्यांच्यावर खूपच कमी लेखन झालं आहे आणि जे झालंय ते त्यांच्यावर अन्याय करणारं आहे... वाईट गोष्ट अशी की ज्या राघोबाने पानिपतची जबाबदारी टाळली, कोवळ्या माधवरावांना पेशवाई मिळाल्यापासून त्रासच दिला, नारायणरावांना मारेकरी घालून मारलं, अश्या माणसावर "राघोभरारी" ही ऐतिहासिक कादंबरी अनेक वर्षांपूर्वीच निघाली. पण नानासाहेबांवर एकही कादंबरी निघू नये हा त्यांच्यावर मोठा अन्याय होता. 
मागच्या वर्षी नानासाहेबांच्या कार्यावर श्री उदय कुलकर्णी यांचा इंग्रजीतून शोधग्रंथ आला आहे, त्याचं मराठी भाषांतरही अशात आलं आहे. खाली मध्ये दोन्ही पुस्तकांच्या लिंक्स आहेत.
असं असलं तरी आपल्यासारख्या सामान्य माणसांना ऐतिहासिक ग्रंथांपेक्षा कादंबरीतून लवकर कळतं. हे काम कौस्तुभने केलं आहे. 

नानासाहेबांना पेशवे म्हणून काम करताना सुरुवातीपासून अनेक प्रकारची संकटे/आव्हाने आली. त्यांनी ती आपल्या अतुल्य राजकीय आणि सामरिक बुद्धीने लीलया पेलली आणि परतवली. सुरुवातीला बाजीरावांना पेशवाई मिळताना जी राजकारणं झाली ती नानासाहेबांनाही चुकली नाहीत. उत्तरेत मोठी स्वारी झाली. ज्या माळव्याच्या सनदा बाजीरावांच्या वेळेपासून मिळायच्या बाकी होत्या त्या नानासाहेबांनी मिळवल्या. त्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ मुलुखगिरी केली. त्यातही रघुजींच्या विरोधात सेना उतरवली म्हणून अनेक प्रवाद निर्माण झाले. ते सगळे छत्रपती शाहूंच्या समोर खासगीत संपुष्टातही आणले. पुढे राजपुतांच्या गादीवरून शिंदे आणि होळकर यांच्यात सुद्धा काही काळ वितुष्ट आले. तेही राजपूत आणि शिंदे-होळकर यांना समजुतीत घेऊन संपवले. शाहू महाराजांनी अचानक पेशवाई काढून घेतली तेव्हा काही महिने नानासाहेब सातारच्या बाहेर राहुट्यांमध्ये राहिले. जोवर महाराजांचा पूर्ण विश्वास पूर्ववत होत नाही तोवर शांतपणे वाट पहिली आणि शाहूंनी घेतलेली परीक्षा उत्तीर्ण झाले. कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या न राहता एकच गादी असावी यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाहीत. कोल्हापूरचे संभाजी राजे बाजीरावांच्या काळात निजामाला जाऊन मिळाले होते. तरीही तो राग न धरता या दोन गाद्या एकत्र होऊन एक मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी शाहू महाराजांनी दत्तक विधान करताना संभाजी महाराजांना दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न केले. पण ते झालं नाही. नंतर सदाशिवरावांना कोल्हापूरची पेशवाई देऊन किमान या दोन गाद्यांमध्ये कोणतेही वितुष्ट येणार नाही ही तजवीज करून ठेवली. आपण छत्रपतींचे सेवक आहोत आणि थोरल्या शिवप्रभूंचे अनुयायी आहोत हे सतत दाखवून दिलं. त्यासाठी काशी, मथुरा आणि अयोध्या ही क्षेत्रे सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. काही प्रयत्न आपल्याच लोकांच्या घाबरण्यामुळे मागे पडले तर काही वेळा तेवढा वेळ देता आला नाही. मात्र "काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्तसिंधू मुक्त करा" हे महाराजांचे शब्द कधीच विसरले नाहीत. 
राज्यकारभारात आणि एकूण महसूल, मोजणी या सगळ्यात सुसूत्रता आणली. जे करायला बाजीरावांना कधी वेळ मिळाला नाही अश्या अनेक गोष्टी केल्या. शनिवारवाडा बिना तटबंदीचा होता. त्याची तटबंदी पूर्ण केली. दरवाजा मुद्दाम उत्तरेला ठेऊन दिल्लीवर आमची नजर आणि सत्ता दोन्ही आहे हे दाखवून दिले. कात्रजच्या तलावातून पुण्यात सर्व मोठ्या घरांमध्ये पाणी फिरतं ठेवलं. आजही तो नळ सुरु आहे.
कुटुंबात सदाशिवरावभाऊंना राज्यशिक्षणासाठी सातारला ठेवलं. गुरूंना सतत सन्मान दिला. बाजीराव आणि मस्तानी बाईसाहेबांचा मुलगा कृष्णा - समशेर बहाद्दर - याला कधीच अंतर दिलं नाही. त्याची वाढ आणि शिक्षण याकडेही लक्ष पुरवलं. विक्षिप्त राघोबांना सांभाळलं. विश्वासराव आणि माधवरावांवरही सतत लक्ष ठेऊन त्यांचंही शिक्षण सुरू राहील हे बघितलं. 

एक ना अनेक कित्येक गोष्टींनी त्यांचं आयुष्य भरलेलं आहे. अब्दाली पहिल्यांदा आला तेव्हा मराठा सैन्य तिथे पोहोचण्याच्या आधीच तो परत फिरला होता. दुसऱ्यांदा आल्यावर मात्र तो पुन्हा जिवंत जाऊ नये यासाठी पेशव्यांच्या घरातून कुणी जबाबदारी घ्यावी यावर ते ठाम राहिले. त्यांची स्वतःची तब्येत साथ देती तर तेच रणांगणावर असते. परंतु ते व्हायचे नव्हते. त्यांच्या जागी राघोबा जावेत म्हणून प्रयत्न झाला. मात्र राघोबा गेले नाहीत. ती जबाबदारी घेतली त्याच्या लाडक्या सदोबाने. पानिपत हारूनही अब्दालीने हिंदुस्थान मराठ्यांच्या हवाली केला. ही मराठ्यांची ताकद होती. ती कमावली बाजीरावांनी तर वाढवली नानासाहेबांनी. भाऊ आणि नाना ही जोडी अगदी चिमाजी आणि बाजीरावांचीच असावी अशी होती. त्यामुळे विश्वासराव गेले त्याहूनही अधिक दुःख त्यांना भाऊ गेल्याचं झालं. स्वतः विश्वासरावसुद्धा पत्रात म्हणाले होते की, "आमच्या सारखे पुत्र तुम्हाला पुन्हा मिळतील पण भाऊंसारखा भाऊ मिळणार नाही" भाऊ गेल्याने नानासाहेब खचले आणि त्यातच त्याची अखेर झाली.

कादंबरी रसाळ आहे. भाषा ओघवती आहे. त्यात सनावळ्या नाहीयेत. मात्र कौस्तुभ "पुराव्यानिशी शाबीत" करण्याजोगे नसेल तर लिहीत नाही. ही कादंबरीही त्याला अपवाद नाही. कित्येक ऐतिहासिक कागदपत्रे वाचून, समजून घेऊन, त्यांची संगती लावून ही कादंबरी लिहिली गेली आहे. केवळ तिशीत असताना कौस्तुभ ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहितो त्याला तोड नाही. त्याच्या अनेक कादंबऱ्या याव्यात, पुस्तके यावीत आणि आम्हाला वाचायला मिळावीत ही प्रार्थना. 

आज बाबासाहेब पुरंदरेंची जयंती! कौस्तुभला त्यांचे आशीर्वाद सतत मिळाले आहेत. बाबासाहेबांचं बोट धरून तो त्यांच्या वाटेवरून चालतोय. खूप शुभेच्छा!

- ज्ञानेश 

धुरंधर - पेशवा नानासाहेब
लेखक - कौस्तुभ कस्तुरे 
प्रकाशक - कौस्तुभ कस्तुरे बुक्स 
पाने - ४४०
किंमत - र ४५०

धुरंधर: https://www.amazon.in/Dhurandhar-Peshwa-Nanasaheb-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC/dp/9355932235/ref=sr_1_4?qid=1659104818&refinements=p_27%3AKaustubh+Kasture&s=books&sr=1-4

The Extraordinary Epoch of Nanasaheb Peshwa - https://www.amazon.com/Extraordinary-Epoch-Nanasaheb-Peshwa/dp/8192108058
भाषांतर - https://www.amazon.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1-Nanasaheb/dp/8192076911/ref=sr_1_1?qid=1659097948&refinements=p_27%3AUday+S.+Kulkarni&s=books&sr=1-1

Wednesday, July 27, 2022

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

जाणाऱ्यांचा वाटा साऱ्या मोजताना दिसं सारा
रिती अशी मातोश्री उते
अदू कसा हसू हसू राऊताला कसे पिसू
खोल खोल मी आता रुते
तरी नाही अळिमिळी
तुझीमाझी निष्ठा काळी
कुंथताना दुखावून रडशील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

कुणी नाही भवनातून सगळीकडे सामसूम
चिडीचूप सुनसान दिवा
अजून काही जातीलच आणि "पुन्हा येईन"च
तिकडून नाथा आणि देवा
वाझियाचे कोटी शत
थैल्यांचे लाखो थाट
रोज रोज आठवत राहतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

इथे वांद्र्याशी माझ्या वेड्या राऊताच्या पाशी
रोजरोज गप्पा झाडा
माझं माझं माझ्या माझ्या माझी माझी माझे माझे
सारा सारा माझा-माझा राडा
पडे माझ्या वाटेतून
आणि मग फुलांतून
जातानाही पायभर चिख्खल ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

आता फक्त बोलायाचे टोमणेच मारायाचे
धरूनिया माईकाचा दांडू
सामन्यात येऊ देत बाकी कॉपी करतात
राऊताच्या ष्टायलीत भांडू
जरा कोर्ट खुलू दे ना
धनुष्यही जाऊ दे ना
मग सेना बंद करून झोपूया ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

Thursday, July 7, 2022

जमिनीखालील अद्भुत नेटवर्क

आम्ही ४ वर्षांपूर्वी आमचं पाहिलं मियावाकी जंगल लावलं. तेव्हा संभाजीनगर मधील सर्वात जुन्या नर्सरीचे तरुण संचालक सागर साकला यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. ते म्हणाले होते की, "झाडांना कळतं!". त्यावर अर्थातच आम्ही विश्वास ठेवला आणि तीनच वर्षात स्वयंपूर्ण असं छोटंसं जंगल तयार झालं. पण झाडांना कळतं कसं? एकमेकांना काय हवं, नको ते समजून कसं घेतात? जंगलातील एखाद्या झाडावर रोग पडला तर तो जंगलभर न पसरता कसा थांबतो? एका झाडाला काय हवं आहे हे त्याच्या शेजाऱ्याला कसं कळतं? त्याच्यातील संवाद कसा चालतो?

काही दिवसांपूर्वी एक लेख वाचण्यात आला. जमिनीखालील अद्भुत नेटवर्क! मग त्यावरील अजून काही लेख बघितले. झाडांना एकमेकांची सुखदुःखे कशी कळतात ते उलगडण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. हे आहे झाडांचं www म्हणजे Woodwide Web. हे माती, जमिनीवर पडलेली पाने, झाडाच्या काटक्या आणि मोठ्या प्रमाणातील कार्बन मॉसच्या खाली विकसित होत राहतं. जंगलाच्या वर दिसणाऱ्या मातीच्या थराखाली, झाडांच्या मुळांशी गुंफलेले, विविध बुरशीचे हे एक जाळे आहे. याद्वारे झाडं एकमेकांशी बोलतात. आपल्या अडीअडचणी एकमेकांना सांगतात. 

आपण जेव्हा बुरशी म्हणतो तेव्हा आपल्याला फक्त मशरूम दिसतात. पण मशरूम म्हणजे बुरशीचे "फळ" आहे. बुरशीजन्य मायसेलियमचे (Mycelium) एक विशाल नेटवर्क झाडांच्या मुळांशी मातीत असतं. मायसेलियम म्हणजे बुरशीजन्य अतिशय लहान "धागे" असतात जे झाडाच्या मुळांभोवती गुंडाळलेले असतात. हे धागे एकमेकांना जोडलेले असतात. या मायसेलियमने विणलेल्या जाळ्याला "मायकोरायझल (Mycorrhizal) नेटवर्क" म्हणतात. या नेटवर्क मधून कोणत्या झाडाला पाणी, नायट्रोजन, कार्बन आणि इतर खनिजे हवी आहेत ते अन्य झाडांना कळतं आणि ते एकमेकांना मदत करतात. जर्मन वनमाळी (फॉरेस्टर) पीटर वोहलेबेन (Peter Wohlleben) यांनी या विशाल जाळ्याला "वुडवाईड वेब" असे नाव दिले. पीटर वोहलेबेन यांनी आपल्या "The Hidden Life of Trees" पुस्तकात या संशोधनाबद्दल लिहिलेलं आहे. एकूणच झाडांच्या सहजीवनाबद्दल आपल्याला जे काही ज्ञान आहे त्यात ही मोठी क्रांती आहे. झाडं सजीव असतात ही अशीच एक क्रांती जगदीश चंद्र बसूंनी केली होती. त्याच क्रांतीची ही बहुदा पुढची पावलं आहेत. वोहलेबेन यांनी झाडे आपल्याला वाटतात त्याहून कितीतरी अधिक सतर्क, सामाजिक, अत्याधुनिक आणि अतिशय हुशार असतात हे दाखवून दिलं आहे. लवकरच पुस्तक वाचेन तेव्हा कदाचित अजून माहिती लिहू शकेन.

निरोगी जंगलांमध्ये, प्रत्येक झाड या नेटवर्कद्वारे इतरांशी जोडलेले असते, ज्यामुळे झाडांना पाणी आणि पोषक तत्वे वाटून घेता येतात. विशेषतः सावलीच्या भागात वाढणाऱ्या रोपांपर्यंत प्रकाश संश्लेषण करण्यासाठी थेट सूर्यप्रकाश पोहोचत नाही. पण महाजन सर सांगतात त्याप्रमाणे हे "सूर्यप्रकाश संश्लेषण" नसून, "प्रकाश संश्लेषण" आहे. तरीही जर प्रकाश कमी पडला तर जगण्यासाठी, रोपटे मायकोरायझल नेटवर्कद्वारे आपली गरज उंच झाडांना सांगतात आणि उंच झाडांनी पाठवलेल्या पोषक द्रव्यांवर अवलंबून असतात. याशिवाय झाडे त्यांच्या नातेवाईकांची, म्हणजे आपल्या प्रजातीची, मुळं ओळखतात आणि बुरशीजन्य नेटवर्कद्वारे कार्बन आणि पोषक द्रव्ये पाठवताना ती आपल्या नातेवाईकांना जास्त अनुकूल कशी राहतील हेही बघतात.

अर्थात यात बुरशीचाही फायदा असतोच. या संदेशांचा देवाणघेवाणीत बुरशी पोषक द्रव्यातील ३०% कर्ब (साखर) स्वतः ठेवून घेते. फॉस्फरस आणि इतर खनिज पोषक द्रव्ये मायसेलियममध्ये जमा होतात, जी नंतर झाडांकडे सुपूर्द केली जातात आणि वापरली जातात. या नेटवर्कमध्ये अर्थातच जुनी-जाणती वृक्ष मंडळी जास्त मदत करतात. यांना mother-tree, मातृवृक्ष म्हटले जाते. अगदी आई बाळांना दूध पाजते, सांभाळते तशी ही मोठी झाडं रोपट्यांची काळजी घेतात. या अनुभवी झाडांची मुळं मातीत अतिशय खोल जातात. तेथील पाण्याचे स्रोत शोधतात आणि ते पाणी वर घेऊन येतात. त्यातीलच काही पाणी पोषकद्रव्यांसह जमिनीच्या वरच्या भागात पाठवतात. उंबराच्या मुळांतून पाणी येतं हे आपल्याला माहित आहेच. ते औषधी असतं. पण ते येतं कारण उंबरासारख्या भरपूर आयुष्य असलेल्या झाडाला अन्य झाडांना मदत करायची असते. झाडांच्या या मायकोरायझल नेटवर्कद्वारे, ही झाडे त्यांच्या शेजाऱ्यांना आजार झाला असेल तर ते संकेतांद्वारे ओळखतात आणि त्यांना औषधेही पाठवतात. आपण कधी पूर्ण तोडलेला वृक्ष बघतो. त्याचा बुंधाच उरलेला असतो. त्यावर प्रकाशसंश्लेषण करणारी पानं नसतात. पण तरीही तो जिवंत असतो, कारण त्या भागातील अन्य झाडं त्याला पोषक द्रव्य पुरवत राहतात. मग मधूनच त्याच्या वठलेल्या बुंध्यावर एक नाजूक गाठ येते आणि नवीन फांदी तयार होते. 

बऱ्याचदा ही झाडं एकमेकांवर खूप अवलंबून असतात. जर दोन झाडं एकमेकांसोबत वाढलेली असतील तर प्रकाश, पोषक द्रव्य हे एकमेकांचा विचार करत वाटून घेतात. त्यात जर दोघांपैकी एक झाड गेलं, तर बहुतेक वेळा दुसरं झाडसुद्धा काही काळात मरण पावतं असं निरीक्षण वोहलेबेन यांनी केलं आहे. डार्विनच्या काळापासून, आपल्याला असंच सांगितलं गेलंय की प्रत्येक सजीव प्रजातीमध्ये आणि म्हणूनच झाडांमध्येही स्पर्धा असते. झाडं पाणी, पोषक द्रव्य आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करणारे असतात. मग त्यात जे जिंकतात ते उंच होत जातात. हरलेले बिचारे सावलीत जातात आणि मरतात. आता त्या कल्पनेचे खंडन करणारे वैज्ञानिक पुरावे समोर येत आहेत. यातून हेच दिसून येतं की समान प्रजातींची झाडे तर एकमेकांना मदत करतातच शिवाय बहुतेकदा इतर प्रजातींच्या झाडांशी युती करतात. जंगलातील झाडं सहकार्य करत, परस्परावलंबी नातेसंबंधात राहण्यासाठी विकसित झाली आहेत. कीटकांच्या वसाहतीप्रमाणे एकत्रित बुद्धिमत्ता राखून आहेत. उंचच उंच झाडांच्या शेंड्याकडे आपली नजर खेचली जाते, पण खरं काम सुरु आहे ते जमिनीखाली, आपल्या पायाच्या काही इंच खाली.

झाडे पोषक द्रव्य वाटून घेतात. इतर प्रजातींच्या झाडांशी युती करतात. मग डार्विनचा नियम त्यांनी स्पर्धा करावी असे सुचवत नाही का? खरं तर त्या नियमाप्रमाणे, झाडांनी सगळी संसाधने स्वतः वा आपल्याच प्रजातींना मिळतील असा प्रयत्न केला पाहिजे. पण ते तसं करत नाहीत. खरंतर म्हणूनच जास्त काळ जगतात, शेजाऱ्यांना मदत करत निरोगी स्थिर जंगल जिवंत ठेवतात. शेजारची झाडं मरत राहिल्यास जंगल उघडं पडतं. वाढलेल्या सूर्यप्रकाशामुळे, उरलेली झाडं अधिक प्रकाशसंश्लेषण करू शकतात आणि वेगात वाढू शकतात. परंतु ते असुरक्षित आणि अल्पायुषी ठरतं. कारण उन्हाळ्यात, अधिक सूर्यप्रकाश जमिनीवर येईल आणि जमीन कोरडी करेल. जमिनीवर थेट सूर्यप्रकाश पडत गेला तर मायकोरायझल नेटवर्क कमकुवत होते. शिवाय वादळवाऱ्यामुळे जंगलाचा विध्वंस होईल. यातील काहीच होऊ नये म्हणून जंगलात झाडं केवळ स्पर्धा करत नाहीत तर सहजीवन जगतात.

रासायनिक आणि हार्मोनल संपर्कयंत्रणेशिवाय झाडं इलेट्रीकल सिग्नल, high frequency चा आवाज सुद्धा काढतात आणि त्याद्वारे संभाषण करतात. अर्थात यावरील संशोधन अजून सुरू आहे. हळूहळू झाडांचं हे संभाषण मानवाला कळेलही... त्याचा वापर माणूस कसा करेल हे मात्र सांगता येणार नाही... :( 

"एका काडातील क्रांती" मध्ये फुकुओका म्हणतात की पाश्चिमात्य संशोधक एका वेळी एक प्रक्रिया घेऊन अभ्यास करतात. त्यामुळे त्यांना जे ज्ञान मिळतं ते पृथक असतं. अगदी तेच या संशोधनांमधून पुढे येत आहे. हे संशोधन करणारे संशोधक म्हणतात की या प्रक्रिया एकेकट्या होत नाहीत. जेव्हा ते जंगलात फिरतात, तेव्हा त्यांना संपूर्ण गोष्टीचा एक आत्मा जाणवतो, सर्वकाही एकसंधपणे कार्य करते, परंतु त्यांच्याकडे हे मोजण्याचा कोणताही मार्ग नाही. ते मायकोरायझल नेटवर्क देखील मोजू शकत नाहीत. कारण समृद्ध जंगलातील एक चमचा मातीमध्ये अनेक किलोमीटर लांब बुरशीजन्य तंतू असतात.

झाडांनी त्यांच्यासाठी अतिशय सुंदर, समृद्ध असं सहजीवन विकसित केले आहे. मायकोरायझल नेटवर्क हा या सहजीवनाचा अविभाज्य भाग आहे. बुरशी आपल्या स्वतःच्या हितासाठी तर काम करतेच, ते करत असताना, लहान रोपट्यांपासून ते अगदी मोठ्या झाडांचे आरोग्य आणि जगण्याचीही सोय करते. माणसांमध्ये जशी संपर्कातून एकमेकांच्या गरजा पूर्ण करणारी, आरोग्यदायी आयुष्य देण्यासाठी काम करणारी यंत्रणा आहे तशीच, किंबहुना त्याहून अधिक सक्षम आणि परोपकारी यंत्रणा जंगलात झाडांनी आणि बुरशीने एकत्र येऊन, मायकोरायझल नेटवर्कने तयार केलेली आहे. ही यंत्रणा पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी महत्वाची आहे त्याद्वारेच जंगल निरोगी राहते. आता तुम्ही पुन्हा जेव्हा जंगलात जाल तेव्हा झाडांमधून फिरत असताना, तुम्ही चालताय त्या जमिनीखालच्या विकसित संपर्क यंत्रणेचा विचार नक्की करा. 

- ज्ञानेश

संदर्भ:
https://www.nationalforests.org/blog/underground-mycorrhizal-network
https://www.smithsonianmag.com/science-nature/the-whispering-trees-180968084/

Friday, April 29, 2022

निजाम, इंद्रेशजी आणि संघ

 साधारण तीन चार दिवसांपूर्वी इंद्रेशजींना भाग्यनगर (हैद्राबाद)ला बोलावले होते. उस्मानिया विद्यापीठात निजामाच्या मुलासोबत त्यांचं भाषण होतं. कार्यक्रमात साहजिकच स्थानिक मुसलमान होते. पेपरमध्ये बातमी आली की इंद्रेशजींनी निजामाची स्तुती केली. निजाम हा आधुनिक शिक्षणाला महत्व देणारा होता, सेक्युलर होता वगैरे वगैरे... हे वाचून मला आश्चर्य आणि वाईट वाटलं. मग नेहमी मी जे करतो ते केलं. काही स्वयंसेवक मित्रांना ती बातमी पाठवली आणि मूळ व्हिडीओ शोधला. साधारण तासाभराचं भाषण होतं.

भाषणात कुठेही निजामाला आधुनिक शिक्षणप्रेमी वगैरे म्हटलं नव्हतं. त्याला सेक्युलर म्हणण्याचा तर प्रश्नच नव्हता. मात्र उस्मानिया विद्यापीठ स्थापन करताना निजामाने जागा आणि त्याकाळी पाच हजार रुपये दिले होते. त्यामुळे निजामाच्या उस्मानिया विद्यापीठात आलोय हा एक आणि दान दिल्याचा दुसरा एक उल्लेख सोडला तर निजामाबद्दल ते काहीही बोलले नाही. ते खरंही आहे. त्यामुळे त्यावर माझा तरी काही आक्षेप नव्हता, नाही!

मग पूर्ण भाषण कशावर होतं, तर आपली ओळख ही राष्ट्र म्हणून आहे. धर्म म्हणून नाही. यावर एकूण सगळा भर होता. कुणी जपान मधून आलाय तर जपानी आला असं म्हणतात, बौद्ध आला असं म्हणत नाहीत. अरेबियातून आला तर अरबी आला असं म्हणतात, मुसलमान आला असं म्हणत नाहीत. त्यामुळे जी काही ओळख आहे ती धर्माधिष्ठित नसून राष्ट्राधिष्ठित आहे. तीच ओळख सर्वांनी जपली पाहिजे आणि मिरवली पाहिजे यावर संपूर्ण भाषणात जोर होता. हे करताना त्यांनी कुठेही कुराणातले दाखले दिले नाहीत मात्र आपल्याला ओळख "मालिक ने दियी हैं" हे सांगत राहिले.

याशिवाय दुसरा मुद्दा होता तो म्हणजे भगवान एक आहे त्याची उपासना अनेक मार्गांनी होऊ शकते. एकं सत् विप्रा: बहुदा वदन्ति| या भारतीय / हिंदू वाक्यानुरूप त्यांनी बरंच काय सांगितलं. एकूण श्रोतेही त्यांना बऱ्यापैकी सहमत आहेत असं दिसत होतं.

यापुढे त्यांनी एक गोष्ट केली ति म्हणजे घोषणा. सुरुवात केली मादरे वतन हिंदुस्थान जिंदाबाद जिंदाबाद. मग इंग्रजी Mother India Long Live. मग हिंदी भारत माता की जय आणि शेवटी संस्कृत वंदे मातरम्. सर्व उपस्थितांनी या घोषणांमध्ये सहभाग घेतला. कुणीही काहीही आरडाओरडा केला नाही. यामुळे कुणाचं इमान दुखावलं गेलं का असा प्रश्नही त्यांनी विचारला. हा सगळा भाग छानच झाला.

अर्थात खटकणाऱ्या बाबी होत्याच -
१. त्यांनी अयोध्येत दुसरा नबी झाला असं म्हणाले. रोख प्रभू रामाकडे होता की नाही ते काही कळालं नाही. पण याची काय गरज ते समजलं नाही.
२. पैगंबर जेव्हा पुन्हा मक्केत आले तेव्हा त्यांनी समोपचाराने मक्केत जाऊ म्हटल्याचा दाखला दिला. हा संदर्भ नक्कीच चुकीचा होता
३. कोणत्याही नबीने (पैगंबराने) त्या काळातील रीतीप्रमाणे लग्ने कितीही केली असतील पण तलाक कधीच दिला नव्हता. त्यांनी आपल्या बायकांना कधी सोडलं नाही. म्हणूनच ते नबी पदाला पोहोचू शकले. त्यामुळे तुम्हीही तलाक देऊ नका वगैरे... हे असले लॉजिक का देतात काही समजत नाही
४. मुहम्मद पैगंबराचं भारतावर प्रेम होतं म्हणे. ते स्वतः कधी भारतात आले नाहीत पण भारताच्या दिशेने सुकून वाले वारे वाहतात असं कायतर बोलले

अर्थात खटकणाऱ्या गोष्टी असल्या तरी संघाचे प्रयत्न भारतीय कोणत्याही धर्माचा असो त्याची पहिली ओळख ही भारतीय हीच असावी. धर्मनिष्ठा या राष्ट्रानिष्ठेनंतर याव्यात. धर्माचं मूळ कुठेही असलं तरी आपण सर्व हे भरतीय मूळ असलेलो आहोत हेच सर्वांनी ध्यानात ठेवावं. आणि अखेरीस मक्का किंवा व्हॅटिकन हे भारतीयांचे धार्मिक मुख्यालय न राहता ते भारतातील व्हावे या दृष्टीने प्रयत्न दिसतात. कट्टरता कमी करण्याचा हाही एक मार्ग असू शकतो. तोही संघ अजमावून बघतोय. मुळात हिंदू माणसाला कोण कशी वैयक्तिक उपासना करतोय याबद्दल आक्षेप नसतो तसा संघालाही नाही. मात्र माझाच मार्ग तो योग्य आणि बाकीचे चूक यावर आक्षेप आहे. तेच या सगळ्या प्रयत्नाचे मूळ आहे.

सर्वात आधी मी सांगितलं की, मी काही स्वयंसेवक मित्रांशी बोललो. त्यात एका मित्राचं उत्तर हे अप्रतिम उत्तर होतं. "जोवर संघाच्या दैनंदिन कामावर याचा प्रभाव पडत नाही तोवर या बातम्यांकडे लक्षही द्यावं असं मला वाटत नाही". संघटना शंभरीकडे जातानाही संघकाम वाढत आहे याचं हे प्रमुख कारण असावं!!!

आज परम पूजनीय आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार यांची जयंती आहे. त्यांनी चार - पाच लहान मुलं सोबत घेऊन सुरू केलेली शाखा, संघ असाच वाढला आहे. तो वर्धिष्णू राहिलंच आणि बलशाली भारताचं स्वप्न साकार होईल याची खात्री आहे.

भारतीय नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!

इंद्रेशजींचं भाषण - https://m.youtube.com/watch?v=-k_3C2kp3gc

बातमीची लिंक - https://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/rss-leader-all-praise-for-nizam-vii-rule/articleshow/90505480.cms

ब्रेनड्रेन की भारतदूत

 शीर्षटीप : आमचा सध्या परदेशात स्थायिक होण्याचा कोणताही विचार नाही!

आम्ही पहिल्यांदा जेव्हा परदेशात राहायला आलो त्याला आता १५ वर्षे होऊन गेली. त्यानंतर कधी भारतात कधी परदेशात असं करत एकूण जवळपास ८ वर्षे भारताबाहेर आहोत. पहिल्यांदा आलो तेव्हा एकूणच मित्रांमध्येही "इकडेच स्थायिक होऊ या" म्हणणारे फार कमी होते. तेव्हा एका भारतीयाने बेल्जियन नागरिकत्व घेतलं तेव्हा फार विचित्र वाटलं होतं. या माणसाला भारतीय नागरिकत्व सोडावंच कसं वाटलं याबद्दल त्याचा थोडा रागही आला होता. त्याला आता बराच काळ लोटला. गेल्या काही वर्षात इकडे स्थायिक होणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. आत्ताच्या घडीला दक्षिण अमेरिका सोडली तर उरलेल्या सगळ्या खंडांमध्ये प्रत्यक्ष ओळखीचे लोक स्थायिक झालेले, नागरिकत्व घेतलेले आहेत. त्यांचा आता अजिबात म्हणजे अजिबातच राग येत नाही. उलट ही सगळी मंडळी भारताबाहेर राहून छान काम तर करत आहेतच शिवाय भारतीय संस्कृती तिथे घेऊन जात आहेत याबद्दल आनंदच आहे.

साधारण दीड वर्षांपूर्वी माझ्या एका भारतीय, नेदरलँड्समध्ये स्थायिक होत असलेल्या सहकाऱ्याने मला विचारलं, बेल्जियन नागरिकत्व केव्हा घेणार? कारण आम्ही येऊन-जाऊन असलो तरी साधारण सहा वर्षे बेल्जियममध्ये होतो. माझ्या तोंडून अगदी सहजपणे निघालं - I would die as an Indian not of any other nationality! यात काही राग नव्हता, पण एक प्रकारची अभिमानाची भावना होती. त्याला वाईट वाटलं की नाही माहित नाही. तो पुढे ही घटना विसरूनही गेला. त्यानंतर साधारण ३-४ महिन्यांनी माझ्या एका जवळच्या मित्राने बेल्जियन नागरिकत्व घेतलं. छान कुटुंब आहे. तिथे जाणाऱ्या भारतीयांना मदत करतात. शेजारच्या बेल्जियन लोकांना त्यांचा आधार वाटतो. सगळे सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम छान करतात. लेकरांना एक दोन भारतीय भाषा येतात. तिथे राहूनही ते भारत आपल्या सोबत घेऊन फिरताहेत. सोबतच आणखी काही मित्रांशी गप्पा झाल्या आणि त्यापैकी काहींना युरोपात स्थायिक व्हायचे होते. एकूणच मी ज्या तोऱ्यात "die as an Indian" म्हणालो त्याबद्दल माझं मलाच वाईट वाटू लागलं. गेल्या महिन्यात त्याला फोन करून दिलखुलास माफी मागितली आणि माफी मागण्याचं कारणही सांगितलं. तो तर विसरला होता, पण त्याला बरं वाटलं.

इकडे स्थायिक होण्यात व्यावहारिक अनेक फायदे असतील पण सोबत काही जोखिमासुद्धा आहेतच. मित्रांसोबत बोलताना त्यातील बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. त्यातील काही मुद्दे - 
- लहानपणापासून आपण काही स्वप्न पाहिलेलं असतं. बहुतेक वेळा ते भारतातील बाबी ध्यानात घेऊन पाहिलेलं असतं. ते स्वप्न परदेशात कितपत साकारता येईल ते सांगता येत नाही. काही Bucket list असेल, कायमस्वरूपी परदेशात राहून त्या list मधील किती गोष्टी सोडण्यासारख्या आहेत, किती बदलण्यासारख्या आणि किती पूर्ण करण्यासारख्या आहेत हे कधी कळतं, कधी नाही. एकूणच बरीच स्वप्नं रीसेट होतात.
- एक मोठा मुद्दा येतो तो म्हणजे किती वर्षे अर्थार्जनाचं काम करत राहायचं. उदा: बेल्जियममध्ये ६७ वर्षांचं होइपर्यंत किंवा एकूण ४४ वर्षे काम केलं तरच पेन्शन मिळते. नाहीतर मिळत नाही. म्हणजे तुम्ही एवढी वर्षं पे-रोलवर पाहिजेत किंवा तुमचा व्यवसाय सुरू असला पाहिजे. भारतात माझ्या वर्तुळातील अनेक जण आज ज्या परिस्थितीत आहेत त्यानुसार पन्नासाव्या वर्षी निव्वळ अर्थार्जनासाठी काम करण्याची कदाचित गरज राहणार नाही. म्हणजे भारतापेक्षा जवळपास १७ वर्षे अधिक काम करावे लागणार आहे.
- कधीच होऊ नये, पण चुकून झालंच तर असा मुद्दा - साथीदाराचा (पती वा पत्नी) अकाल मृत्यू. शुद्ध व्यावहारिक मुद्दा आहे. भारतात सावरायला अनेक जण सोबतीला असू शकतात. इथेही चांगलं सर्कल होऊ शकतं, नाही असं नाही. तरीही काहीवेळा "जवळची नाती" अधिक मदत करू शकतात.
- मुलांच्या मनात भारताबद्दल प्रेम, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर आपोआप जय तोंडावर येणं या गोष्टी तुम्ही भारतात किंवा अन्यत्र, कुठेही असलात तरी होतीलच. पण भारतात इतक्या कमी वेळा जाणं होईल कि भारत म्हणजे केवळ ४ नातेवाईक आणि १० मित्र हा समज मुलांचा व्हायला नको यासाठी वेगळा वेळ काढून भारत त्यांना दाखवावा लागेल.

हे असं असलं तरी परदेशात भारतीय गेल्यामुळे होणारे भारताचे फायदे भरपूरच आहेत. सावरकरांनी ज्या शृंखला सांगितल्या होत्या त्यात एक "समुद्रगमन न करणे" ही होती. इस्लाम वा ख्रिस्ती धर्म हे जगभर पसरले कारण ते बाहेर पडले. युरोपीय लोकांनी जगावर काही काळ राज्य केले कारण ते आपल्या देशातून बाहेर पडले. भारतीय कित्येक वर्षं भारतातून बाहेर न पडल्याने हिंदू धर्म, संस्कृती अडकून पडली ही खरी गोष्ट आहे. जेव्हा भारत समर्थ होता तेव्हा भारतीय संस्कृती जगभर पसरली होती. त्याच्या अनेक खुणा आजही सगळीकडे दिसतात. आज हिंदू स्वयंसेवक संघ - सेवा इंटरनॅशनल, इस्कॉन अशा अनेक संस्था कुठेही आणीबाणीची परिस्थिती आली की मदतीला तत्पर असतात. कारण या संघटनांचं काम करणारे मूळ भारतीय जगभर आहेत. संघाच्या ४० पेक्षा अधिक देशात शाखा आहेत. हजारो कार्यकर्ते आहेत. आज कित्येक कंपन्यांच्या उच्च पदावर, संशोधनात, अगदी CEO सुद्धा मूळचे भारतीय आहेत. या CEOs मध्ये एक माझा भाऊ आहे याचा मला अभिमान आहे. जर भारतातून कुणी बाहेरच गेलं नसतं तर हे शक्य झालं नसतं. 

बऱ्याचदा भारतातील पालक त्यांच्या मुलांनी परदेशी जाऊ नये/स्थायिक होऊ नये या मताची असतात. त्यांना माझा एक "वात्रट" मित्र अशा पालकांना प्रश्न विचारतो. तुम्ही स्वतः तुमच्या गावातून बाहेर पडलाच ना? पुण्यात, मुंबईत स्थायिक झालातच ना? की तिथेच गावात राहिलात? मग मुलांनी परदेशात जाण्यात काय त्रास आहे? म्हणजे माझे वडील बुलडाण्यातील चांडोळ नावाच्या गावातून शिक्षणासाठी जालना / संभाजीनगरला आहे. नंतर नोकरीच्या निमित्ताने संभाजीनगरलाच राहिले. तेव्हाचा प्रवास गृहीत धरला तर त्यांना चांडोळला जायला किमान ६-७ तास लागायचे. त्यांच्या वडिलांनी त्यांनी संभाजीनगरला स्थायिक व्हायला नकार दिला असता तर चाललं असतं का? अर्थातच नाही ! मग माझ्या वडिलांनी मला बाहेर जायला नकार देऊ नये.

मी जेव्हा पहिल्यांदा परदेशी जायला निघालो तेव्हा एक मेडिकल टेस्ट मुंबईतच करावी लागायची. त्या डॉक्टरांनी काहीतरी विचारलं आणि मी "yes/no/हो/नाही" असं उत्तर न देता "हं" म्हणालो. खरंतर छोटी गोष्ट होती. डॉ एकदम "बुड्ढा पारशी"! डॉ म्हणाले की, "तू परदेशात जातोयस हे चांगलं आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तू परदेशात 'एक व्यक्ती' नसतोस तर 'भारतीय राजदूत' असतोस. तुझ्याकडे बघून भारतातील लोक कसे असतील याचा परदेशी लोक अंदाज बांधतील. त्यामुळे कधीही एक भारतीय म्हणून चुकीची प्रतिमा तयार होऊ देऊ नकोस!" आजवर ही गोष्ट बऱ्यापैकी पाळत आलोय. 

सांगायचं मुद्दा हा की जर कुणी नव्याने भारतातून बाहेर येणार असेल, आपली संस्कृती घेऊन येणार असेल, भारताचा राजदूत बनून राहणार असेल तर परदेशात जाणे, स्थायिक होणे हे चांगलंच आहे. स्थलांतरं कायमच होत आली आहेत. होत राहणार आहेत. ती चांगल्या दृष्टीने वापरता येणं आवश्यक आहे. त्यातील धोके आणि जबाबदारी याची जाणीव या घरट्यातून बाहेर पडणाऱ्या पिलांना करून दिली की त्यांच्यावर विश्वास टाकावा. तो विश्वास ते नक्कीच सार्थ करतील.

स्वशोध

 बाहेरचे दिवे घालवले आणि आतले दिवे लावले
की मधल्या काचेत
आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं!